जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, June 28, 2009

काळ आला होता पण वेळ.....

मायदेशात असताना बरेचदा तसेच आताही जेव्हा मायदेशात येतो त्या प्रत्येकवेळी आम्ही पुण्यात ' शंकर ' महाराजांच्या मठात जातोच. पुणे-सातारा रोडवर-धनकवडी येथे मठ आहे. महाराजांना पाहिले की एक वेगळीच अनुभूती मिळते. शांत, समाधान मनात भरून राहते. महाराज आपल्याकडे कधीतरी पाहतील याची ओढ सतत मनाला लागलेली असते. काही वेळा ती पूर्णही होते. आता हे मनाचे खेळ आहेत असेही काहीजण म्हणतील. असतीलही कदाचित. मात्र मला अतिशय आनंद होतो. साधारण तासभर थांबून, खिचडीचा प्रसाद घेऊन आम्ही महाराजांचा निरोप घेतो. २००१ साली असेच आम्ही सगळे महाराजांना भेट देण्यास निघालो.

मी व शौमित्र, माझे आई-बाबा, भाऊ-वहिनी व माझ्या दोन्ही भाच्या. धाकटी यशदा तेव्हा फक्त सात महिन्यांची होती. तिला अजून ठाण्याच्या बाहेर नेलेच नव्हते. तिचा पहिला प्रवास महाराजांच्या दर्शनाने व्हावा असे सगळ्यांनाच वाटत होते. आम्ही सुमो ठरवली व अगदी ठरल्यावेळी आवरून सकाळीच बाहेर पडलो. ठाणे-पुणे प्रवास मस्त मजेत झाला. गाणी, गप्पा, निघताना करून घेतलेली सॅंडविचेस, वेफर्स...खाऊन होईतो वेळ कसा निघून गेला कळलेच नाही. शिवाय जुलै महिना होता त्यामुळे त्या दिवशी पाऊस कोसळत नसला तरी सगळीकडे हिरवळ, थोडा थंडावा, आल्हाददायक हवा होती. तापलेली धरणी निवली होती. हिरवाई डोळ्यांना सुखावत होती. एसी लावावा लागलाच नाही.

साधारण बाराच्या सुमारास आम्ही मठात पोचलो. आरती मिळाली. खूपच बरे वाटले. जवळजवळ तासभर मठात बसलो. यशला व आम्हा सगळ्यांनाच महाराजांचा आशीर्वाद मिळाला. मग प्रसाद खाऊन आम्ही तिथून निघालो. मठाला लागूनच असलेल्या हॉटेलमध्ये पोटपूजा झाली. आधीच्या बेताप्रमाणे थोडेसे पुण्यात भटकून आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासास लागणार होतो. पण एवीतेवी इथवर आलोत आणी फक्त तीनच वाजलेत तर अजून कुठेतरी भटकावे असा विचार मनात डोकावला. झाले, चर्चा जोरात सुरू झाली. कुठे जावे..... महाबळेश्वर.... नको बुवा, अनेक वेळा झालेय...... शिवाय आपल्याला राहायचे नाहीये. अमुक तमुक करत करत माळशेज घाट पाहायला जायचे का? आमच्यापैकी कोणीही माळशेजला गेलेले नव्हते. पावसाळ्यात माळशेज घाट म्हणजे अप्रतिम सृष्टीसौंदर्य असे अनेक जणानं कडून ऐकलेले त्यामुळे सगळेजण टेम्प्ट झाले. ठरले.

आमचे ड्रायव्हर पाटील यांना विचारले की माळशेजला आपल्याला जाता येईल का? ते म्हणाले येईल की. अमुक अमुक फाटा घेऊन गेले की जवळ पडेल वगैरे.... किती वेळ लागेल अंदाजे...... तर म्हणाले साधारण सहा-साडेसहा पर्यंत पोचून जाऊ आपण. आमचे बाबा म्हणाले की साधारण १३०-१४० किलोमीटर इतके अंतर असेल तेव्हा जायला हरकत नाही. मला स्वत:ला असे अंदाज बिलकूल नाहीत. आमच्याकडे मॅपही नव्हता. त्यामुळे नुसते तर्क व आमचे बाबा व पाटील यांच्यावर सारी भिस्त. अगदी साताला जरी माळशेजला पोचलो तरी साधारण तास-दिडतास तिथे थांबू व निघू म्हणजे वेळेत घरी पोचता येईल. ठरले..... साडेतीनला पुणे सोडले. मुलांसाठी थोडा खाऊ व सगळ्यांसाठी पुरेसे पाणी होतेच. यश छान खेळत होती त्यामुळे उत्साह वाढला.

साडेपाच झाले तरीही आम्ही माळशेजच्या रस्त्याला लागलोय असे वाटेना. पाटील चाचपडत होते. आमचे बाबाही गोंधळलेले दिसत होते. आम्ही चुकलो होतो हे नक्की होते. पाहता पाहता सहा वाजले तेव्हा मात्र थोडे अस्वस्थ वाटायला लागले. पुण्यावरून माळशेज हा घोळ घालायला नको होता का? पण आता परत फिरणे शक्यच नव्हते. त्यात पाटील सारखे म्हणत की आता आपण पोचूच. भावाला त्यांचा थोडा राग येऊ लागला होता..... नीट माहीत नव्हते तर आधीच सांगायचे ना.....लहान बाळ बरोबर आहे. म्हणणे बरोबरच होते पण आता उशीर झाला होता. शेवटी एकदाचे कसेतरी चुकत चुकत आम्ही आठच्या आसपास माळशेजला पोचलो. इतका घोळ होऊनही आम्ही सगळे खूश झालो.

माळशेज घाटात खूप छोटे धबधबे आहेत. सृष्टीसौंदर्य अप्रतिम आहे वगैरे अनेक गोष्टी ऐकलेल्या........पण कसले काय हो. हे सगळे कधी दिसेल...... उजेड असेल तर ना? आम्ही पोचलो तेव्हा अंधार पडलेला. त्यात इतके प्रचंड धुके होते की घाटात पोचण्या आधीच ते चांगलेच जाणवत होते. मुंबईकडे जायचे म्हणजे घाट पार करायलाच लागणार दुसरा मार्ग नाही म्हणजे जवळचा मार्ग नाही. त्यामुळे आम्ही तसेच पुढे निघालो. थोडे अंतर गेलो नाही तोच बरीच गर्दी दिसू लागली. अनेक गाड्या उभ्या होत्या. सगळीकडे मुले... मोठे.. ..... गाड्यांवर चढून बसलेले. बरेच जण सकाळपासून आलेले असावे. भरपूर मजा..... दारू प्यायलेले होते. मोठ्यामोठ्याने ओरडणे, दंगा...... गाणी लावून नाचणे वगैरे सुरू होते. धबधब्यांखालीही बरेच जण बसले होते.

ह्या सगळ्यांनाही घाट पार करायचा होताच पण ह्या प्रचंड धुक्यामुळे सगळे अडकून पडले होते. आम्ही या गोंधळातही एकीकडे माळशेज घाटाचे सौंदर्य पाहण्याचा प्रयत्न करत होतो. हळूहळू करत अगदी पहिली गाडी जिथे होती तिथवर आम्ही येऊन पोचलो. साडेनऊ वाजले होते. आतापर्यंत इतर गाड्यांचे दिवे असल्याने थोडे दिसत होते खरे. पण धुके इतके प्रचंड दाट होते की पहिल्या गाडीपासून एक फुटावरचेही दिसेना. पाटील म्हणाले आपण इथे थांबूया मी जरा उतरून विचारतो. त्या गाडीतल्या पोरांशी बोलून आले आणि म्हणाले, " या लोकांचा काही उपयोग नाही. गेले दोन-तीन तास हे सगळे इथेच अडकून पडलेत. एकतर सगळे फार दारू प्यायलेत आणि आता त्यांची हिंमतच नाहीये गाडी पुढे नेण्याची. ( त्यांनी हे वाक्य थोडे वेगळ्याच पद्धतीने सांगितले......
)

पाटील यांचे ड्रायव्हिंग उत्तम होते. एकदाही आम्हाला भिती वाटली नव्हती. पण हा प्रसंग बाका होता. दरी कुठल्या बाजूला आहे हे कळणे सोडाच फुटावर कोणी उभे असेल तर तेही दिसत नव्हते. थोडी जरी चूक झाली असती तर आम्ही सगळे दरीत कोसळलो असतो. अजून अर्धा तास गेला. गाडीत एकूण माणसे नऊ. त्यात तीन लहान मुले. रात्रभर इथे थांबणे शक्यच नव्हते. यशचे दूध संपत आले होते. काय करावे.... शेवटी मी म्हटले की मी गाडीच्या पुढे चालते. बॅटरी आहेच तुम्ही माझ्या मागेमागे गाडी आणा. पण असा फार वेळ लागला असता..... शेवटी पाटलांच्या काय मनात आले कोण जाणे. ते म्हणाले, " मी आधीही बरेचदा ह्या घाटातून गेलोय. रेडीयमच्या पट्ट्यांवरून अंदाज घेत घेत गाडी नेतो. घाबरू नका.

नको असे करायला हा पर्याय नव्हताच.... आम्ही निघालो. अतिशय हळूहळू........ तोच मागे बरेच आवाज ऐकू येऊ लागले म्हणून थांबून उतरून पाहिले तर खोळंबून राहिलेले सगळे आमच्या गाडीचे टेललाईट्स पकडून निघालेले. पाटील म्हणाले, " पाहा..... कोणात दम नाही..... आता आपल्या मागे निघालेत. " मी मनात म्हटले, " देवा, निभावून ने रे. " हे इतके सगळे घडत असताना आश्चर्य म्हणजे बाळ यशदा बिलकूल रडली नाही. तिचे हसणे, वेगवेगळे आवाज काढणे--उड्या मारणे अव्याहत सुरू होते. शौमित्र व शारिवाही अजिबात रडले-घाबरले नाहीत. उतरायला सुरवात केली तसे आईने स्वामी समर्थांचा जप सुरू केला..... दोनच मिनिटांत आम्ही सगळे स्वामींचे नाव मोठ्याने घेऊ लागलो. आमचा आवाज मागच्या गाडीतही जात होता. त्यांनीही आवाज मिळवला. अवघ्या दहा मिनिटांत जवळजवळ तीस-पस्तीस गाड्यांत असलेल्या दीडशे-दोनशे लोकांनी नाम:स्मरण सुरू केले.

पंधरा मिनिटे गेली.......... आणि काय आश्चर्य धुक्यात किंचित फरक दिसू लागला. दोन-तीन मीटरवरचे दिसू लागले. अवघ्या पंचवीस मिनिटात आम्ही सुखरूप घाट उतरलो. हा सगळा वेळ घाटात स्वामींच्या नामाचा गजर स्पष्ट ऐकू येत होता. सगळी भरपूर दारू प्यायलेली पोरे, माणसे........ यातील एरवी किती जण असे नाम:स्मरण करत असतील कोण जाणे पण त्या जीवघेण्या धुक्यात सापडून मनापासून देवाला हाका मारत होती.
मुंबईच्या रस्त्याला लागलो. तसे मागच्या गाड्या आमच्या पुढे निघाल्या. प्रत्येकजण आम्हाला थॅंक्स देत स्वामींचे नाव घेत घेत जात होते. कुठलीही भयंकर घटना न घडता इतके सगळे लोक सुखरूप घाट उतरले होते.

दोन तासात आम्ही घरी पोचलो. पाटील यांचे आभार मानले. प्रसंग मोठा बिकट ओढवला होता खरा....... स्वामींनी निभावून नेले. अजूनही मी माळशेज घाट पाहिला नाहीये. आता पुढच्या मायदेशाच्या भेटीत जायचा विचार आहे...... यावेळी मात्र सकाळी निघून डायरेक्ट माळशेजच गाठणार........
.


5 comments:

  1. खरच स्वामिंचिच क्रुपा म्हणावी..!
    बरेचदा गेलोय मी त्या घाटातुन जितका सुंदर आहे, तितकाच भयानक.. आधी सायंकाळी ७ नंतर त्या घाटात पोलिस बंदोबस्त असायचा, आता बरिच वर्ष झालित जाउन..!

    ReplyDelete
  2. माळशेजचा घाट अगदी निसर्गरम्य असतो पावसाळ्यात . म्हणुनच तरुणांचं आवडिचं ठिकाण आहे ते , धबधबयात डूंबायला आणी मस्ती करायला.
    बरेच दिवसात गेलेलो नाही. एकदा जायला हवं असं वाटतंय ही पोस्ट वाचल्यानंतर.

    ReplyDelete
  3. अजय स्वागत व आभार.

    महेंद्र...:)

    ReplyDelete
  4. Swaminchi ch Krupa :)

    Shri Swami Samarth :)

    ReplyDelete
  5. प्रसन्न, खरेच स्वामींचीच कृपा.
    आभार.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !