जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, August 25, 2011

काजवे...

" जानू, अगं लक्ष कुठेय तुझे? काय सांगतोय मी... ऐकते आहेस का? "

" ह्म्म... "

" अगं ह्म्म काय... सांग बरं माझं शेवटचं वाक्य... "

" संध्याकाळी तयार राहा... गोसावींच्या नव्या फार्महाऊसची पार्टी आहे... हेच सांगत होतास नं? "

" जानू तू आणि तुझे मल्टिटास्किंग पुरे झाले. कानावर पडलेले रट्टा मारल्यासारखे माझ्या तोंडावर मारू नकोस... काय सारखी त्या खिडकीतून बाहेर पाहत असतेस गं? बरं ते सोड, आपल्याला... ऐकलेस नं... मला एकट्याला नाही तर दोघांनाही जायचेच आहे. तुझ्या सबबी चालणार नाहीत आज. मी शार्प सातला येईन. साडेसातला निघू आपण. तयार राहा. आणि ते तुझे जीन्स-खादी प्रकार नकोत. छानशी रेशमी साडी नेस. ती मोरपंखी नाहीतर कलकत्त्याहून आणलेली जांभळी... जानू, काय दिसतेस गं तू त्यात.... नुसते जळतील सगळे. अरे बापरे! आठ वाजत आले... चल मी पळतो. तयार राहा गं! "

खिडकीतून एकटक बाहेर पाहत जानू ऐकत होती. अजय घरात असला की एखाद्या धबधब्यासारखा अविरत कोसळत राहतो आपल्यावर. बरेच आहे म्हणा.... दिवसभर नुसत्या उसासत राहतात या भिंती.... आपल्यासारख्या. शांतता छेदायला उसना आवाजही सापडत नाही. फक्त सुरू असते ते घड्याळाचे एका लयीत श्वास घेणे... टिकटिक टिकटिक... तासागणिक लंबकावर पडणाऱ्या टोल्यांचे झंकारणे... काळाची लढाई अव्याहत सुरूच आहे. तो लढतोय म्हणून मला, अजयला, सगळ्यांनाच लढावे लागते. वेळेचे महत्त्व, गेलेला क्षण, प्रवाही काळ.... वर्तमान... या आत्ताच्या क्षणाचा भूतकाळ कसा असावा हे आपल्या हाती.... येणाऱ्याचे भविष्यही आपल्याच हाती..... टिकटिक टिकटिक.... आपल्यासाठी क्षण का क्षणांसाठी आपण.... भूत व वर्तमान नक्कीच आहेत पण भविष्य ही असेल हे चक्क गृहीत धरून चाललोय आपण. याची टिकटिक सगळी बॅटरीच्या जोरावर.... सेल संपला की नुसता शोपीस.... आपली धडधड कशाच्या जीवावर..... कोणासाठी.... कोण जाणे उद्या आपण फ्रेममध्ये.... आपलाही शोपीस.... त्यावर एक हार.... मागे उरेल तो फक्त भूतकाळ.... का आठवणींची भुतं... अजय घड्याळाचा सेल बदलेल... शेजारीच आपला मोरपंखी फोटो सुंदरश्या फ्रेममध्ये लावेल.... आणि मग सारखी या मेल्याची डोके उठवणारी टिकटिक.... दर तासागणिक ठाण ठाण.....

जान्हवी तिरमिरीत उठली. धुण्याची काठी घेऊन ताडताड पावले टाकत घड्याळासमोर येऊन उभी राहिली. कशाला सारखी टिकटिक... करत राहतोस? जरा म्हणून क्षणभर उसंत नाही कशी ती.... थांब तुला कायमचे गप्प करून टाकते. त्वेषाने तिने काठी उगारली तोच खाडकन दार उघडून हाती टोला घेऊन पाहरेदार बाहेर आला आणि त्याने पहिला घाव घातला... ठाण.. दुसरा... ठाण... एका मागोमाग एक घाव घालतच सुटला... तिच्या त्वेषाची लागण त्यालाही झालेली. आठवा घणाघाती घाव घालून आला तसाच तो खाडकन लुप्तही झाला. तिच्या हातातली काठी गळून पडलेली. त्या विरणाऱ्या आवाजासोबत तिचा आवेशही विरत गेला. स्वत:ला गोळा करत, सावरत ती किचनच्या खिडकीशी आली.

अजयने मुद्दामहून शहराच्या बाहेर दरीच्या टोकावर बंगली बांधली होती. तसे शहर फार लांब नव्हते... फार तर दहा मैल. कोणाला सांगून खरे वाटणार नाही इतके या दहा मैलात सृष्टी पटल बदलत असे. जणू एखाद्या कसलेल्या चित्रकाराने पांढऱ्या शुभ्र कॅनव्हासवर दिवसभर निरनिराळ्या छटांचे मनोहरी चित्र रेखाटत राहावे! खिडकीतून दिसणाऱ्या परमेश्वराने चारी हातांनी मन लावून रंगवलेल्या निसर्गाचे प्रसन्न, उत्फुल्ल, पहाटेच्या पहिल्या प्रहराच्या हलक्या रेघा, झुंजूमुंजू, पक्ष्यांची अखंड किलबिल, नभ कधी खेळकर, कधी अवखळ.. उनाड, तर कधी भरून आलेले. गदगदलेले, कधी उदासवाणा पिवळसर संधिप्रकाश... कधी हिमटी काढलेले ओठ अन गालावर ओघळलेला एक अश्रू.... कधी अविरत कोसळणारा तुफानी पाऊस, तर कधी हसरा, नाचरा पाऊस, उन्हात चमचमणारा पाऊस, धरतीला कुरवाळणारा पाऊस, कौलावर ताडताड वाजत शांततेला भेदणारा आक्रमक पाऊस.... कधी चराचराला डोलवणारा आल्हाददायक वारा तर कधी झोडपवणारा बेभान वारा.... तिन्हीसांजेला दूर मावळणारा सूर्य आणि जवळच भासणारा चंद्र, रात्र जशीजशी चढत जाईल तसतसा पडत जाणारा चांदण्यांचा सडा.... अमावस्येच्या रात्रीचा गूढ अंधार.... खिडकीबाहेर निरनिराळी निसर्गाची रुपे अन आत जानू.... दोघांनाही समीप आणणारी जानूची आवडती चौकट... खिडकी !

शहराच्या कोलाहलापासून दूर ही बंगली तिला आवडत असे आणि नसेही. फार एकाकी वाटे. जणू ग्लोरिफाईड तुरुंगच ! तिथे तरी सोबतीला कैदी असतात. असेत का खुनी-दरोडेखोर पण जिवंत असतात. तसा तिचा गोतावळा खूप होता. पण ते सगळे शहरात. तिच्याकडे यायचे म्हणजे त्यांना खूप लांब वाटे. अजय म्हणे, दिवसभर त्यांच्यातच असतो गं मी... संध्याकाळी तरी शांतता हवीच ! त्याचे बरोबरच आहे.

जानू आता अजयला, घड्याळाला विसरली होती. खिडकीतून दिसणाऱ्या चिरपरिचित कॅनव्हासवर कोणाचीतरी चाहूल दिसत होती. तिने निरखून पाहिले... कोणीतरी बाई दिसत होती. एकटीच... तीही इतक्या लांब. बापरे! जीव तर द्यायला आली नसेल. जानूचा श्वास कोंडला. छे ! काहीतरीच ! ती पुन्हा पाहू लागली. साधारण सत्तरीची असावी. शेलाटा बांधा, रुपेरी लांब वेणी, छानशी झुळझुळीत साडी..... जीवनावर-स्वत:वर प्रेम करणारी वाटत होती. अजून तीसपस्तीस वर्षांनी आपण अशाच दिसू कदाचित. पण अशा उत्साही असू का? काय हे कुठून कुठे पोचलीस तू जानू... ' भविष्य आहे ' असे गृहीत धरून पुन्हा क्षण गुंफू लागलीस नं.... मान झटकून जानूने विचारांची गर्दी पांगवली. डोळे तिचा पाठलाग करत ती फिरेल तसे फिरत होते. जणू तिच्या जीवाची जबाबदारी जानूचीच झालेली.

तासभर तरी ती होतीच. दोन्ही हात पसरून निसर्गाला गोळा करत होती. काही वेळ दरीच्या टोकाशी जाऊनही उभी होती. तो सगळा वेळ जानूने पापणीही लववली नाही. हलके हलके पावले टाकत, तृणालाही आपले ओझे होणार नाही याची खबरदारी घेत ती आली तशीच कॅनव्हासवरून नाहीशी झाली. बेडरूमच्या खिडकीतून रस्ता दिसत असे... जानू धावली.... कुठे गेली.... या खिडकीतून पाहा त्या खिडकीतून... ती कुठेच दिसेना. जणू आलीच नव्हती. म्हणजे निव्वळ भास होता का.... आता जानू थकली. सोबतीचा एक किरण अचानक समोर आलेला.... उद्याची वाट पाहू लागली.

दुसऱ्या दिवशी कालच्या पार्टीबद्दल बोलून नेहमीसारखाच घर दणदणवून अजय गेला. जानूचे सगळे चित्त तिच्याकडे लागलेले. एकीकडे कामे करत करत ती सारखी खिडकीतून डोकावू लागली. बरोब्बर कालच्याच वेळेला ती आली.... झुळझुळीत साडी, प्रसन्न चेहरा... शालीन सौंदर्य ! तासाभराने दिसेनाशी झाली.... रोजच येत राहिली... एखाद्या अदृश्य बंधासारखी जानू तिच्यात पूर्णतः गुंतली होती. जानू खिडकीत असते हे काही दिवसांनी तिच्याही लक्षात आले होते.... दरीच्या टोकावर जाण्याआधी ती जानूकडे एकटक पाही... हलकेच हात उंचावे आणि चालू लागे. पाहता पाहता महिना उलटला. जानूला रोज वाटे खाली जाऊन तिच्याशी बोलावे.... पण तिची तंद्री मोडायचे जानूच्या जीवावर येई. शिवाय तिनेही कधी आपणहून जानूची ओळख करून घ्यायचा प्रयत्न केला नव्हता.

दोन दिवस सरले..... ती आली नाही. असे कसे झाले? अगदी धुवांधार पावसातही ती छत्री घेऊन आली होती. बरे नसेल का? घरी कोणी असेल का तिच्या? का एकटीच.... एकाकी? का नाही आपण ओळख करून घेतली... आता ती आलीच नाही कधी तर? प्रश्नांची मालिकाच फेर धरून नाचू लागली. पाहता पाहता चार दिवस उलटले. जानू मरगळून गेली. अजयने विचारलेही, " काही बिनसलेय का? डॉक्टरकडे जायचे का? " पाचव्या दिवशी दिवेलागणी होऊन गेलेली... अजय दोन दिवस टूरवर गेलेला. काहीतरी पोटात ढकलावे म्हणून जानू किचनमध्ये आली. चहाचा कप हाती घेऊन खिडकीशी आली... पाहतच राहिली.

ती, तीच होती. नेहमीसारखीच प्रसन्न, आज काळी खडीची साडी नेसलेली. एक तर इतके दिवस गायब होती आणि आता आली तर इतक्या रात्री... हातात काय धरलेय तिने..... काचेची बरणी दिसतेय..... त्यात सोनेरी चमचमता लोळ. काळ्याभोर आकाशावर लक्ष लक्ष चांदण्यांच्या ज्योती उजळलेल्या तश्यांत तिच्या काळ्या चंद्रकळेवरच्या चांदण्या हातातल्या सोनेरी तेजाने लखलखत होत्या. नेहमीसारखीच हलकी अल्लाद पावले टाकत ती दरीच्या टोकाशी जावून पाठमोरी उभी राहिली. खिडकीकडे पाहत हातातल्या बरणीचे झाकण उघडले.... असंख्य सोनेरी तेजःपुंज ठिपके आसमंत उजळू लागले. बरणी रिकामी झाली. आभाळातली नक्षत्रे, तिच्या चंद्रकळेवरच्या चांदण्या अन चहुबाजूने लपेटलेले लखलखते काजवे.... पाहता पाहता त्या सगळ्यांचे वेगळेपण संपले...... चांदण्यांनी ती मढली आणि आसमंत काजव्यांनी.... पुढच्याच क्षणी तिने स्वत:ला झोकून दिले....

जानू जीवाच्या आकांताने धावली. काजवे सैरावैरा उधळले होते. चांदण्याही भयाने दूरवर पांगलेल्या.... जानू दरीच्या टोकावर उभी राहून वेड्यासारखी हाकारत होती... खाली होता केवळ मिट्ट काळोख आणि भयाण शांतता.... या वर्तमानाचा अर्थच तिला लागत नव्हता.... काही क्षणांपूर्वी सर्वांगी तेजाचा लोळ बनून तळपणारी ती भुतकाळ झाली होती.... जानू वळली तोच कशालातरी अडखळली. खाली वाकून पाहिले तर रिकामी बरणी होती. तिथेच बसून जानूने बरणी हातात घेतली. तिचा - तिच्या मनाचा स्पर्श झालेली बरणी.... एकुलता एक काजवा बरणीत चमचमत होता..... जणू तिची वाटच पाहत होता. जानूने हळूच फुंकर घातली तशी पटकन तो बाहेर आला... थेट आसमंताच्या दिशेने झेपावला.

जानूला वाटले, तिचा वर्तमान हळूहळू विझत असावा, रिक्त विरक्त झाली असावी..... आता नव्याने देण्याघेण्यासारखे काही उरले नसावे.... भविष्याचे ओझे तिच्या कुडीला पेलायचे नव्हते.... तिच्या अनेक बऱ्या वाईट अनुभवांचे, नात्यांचे, बंधांचे, रेशमी स्पर्शाचे, समाधानाचे, अत्यानंदाचे, सुखद-दु:खद, बोचरे, एकाकी क्षण तिने पकडून पकडून बरणीत भरलेले. तिच्यालेखी तिच्या आत्म्याची वस्त्रे बदलायची घटिका भरलेली.... तसेच असावे, म्हणूनच या जीवनातले सगळे क्षण इथेच उधळून निर्मोही होऊन ती प्रसन्न निघून गेली..... पुढच्या प्रवासासाठी !

बरणीचे झाकण लावावे म्हणून जानूने ते उचलले... त्यावर लिहिले होते.... " ही तुझ्या क्षणांसाठी.... माझ्याकडून सप्रेम !!! "

Monday, August 22, 2011

प्रिय...

सगळीच जातात तसाच तूही उज्ज्वल भवितव्यासाठी दूर गेलास. मी मात्र तिथेच.... तशीच! तुझ्या आठवणीत रमलेली, सदाचीच ! तुझ्या किंचित मिसुरडं फुटलेल्या ओठांची, ' दाढी येत आहे हो ' ची निशाणी दाखवणारे उगाच तुरळक तांबूस मऊ केस, तुझा फुटलेला.... घोगरा किंचित खरजांत जाणारा आवाज. फसफसून उतू चाललेला अपार, अधीर उत्साह. सोळाव्या वर्षीच गाडीचे चक्र कायद्याने हाती आल्याने कधी कानात वारं शिरल्यागत वेगाशी स्पर्धा करण्याची ऊर्मी तर कधी माझ्याजवळ येऊन अगदी जबाबदारीने तुझे विचारणे. " ममा, तुला वॉलमार्ट मध्ये घेऊन जाऊ का? तू आरामात बस शेजारी. आणि पिशव्या उचलेन गं मी. " असे म्हणत व्यायाम करून पीळदार होऊ लागलेले दंड दाखवणारा तू. अखंड पडणाऱ्या बर्फाचे ढीग उपसण्यासाठी जामानिमा करून बाहेर पडताच, " वेडाबाई, हो घरात. तू संध्याकाळपर्यंत बसशील टुकूटुकू करीत. त्यापेक्षा मस्त तिखट काहीतरी खायला कर. मी फडशा पाडतो या चमचमणाऱ्या थंड भुशाचा. " असे म्हणून कानात सुंकली अडकवून एका लयीत स्नो उपसणारा तू.

जात्याच गोड व कसदार गळा तुझा. पाचव्या वर्षीच स्वत:हून गाणे शिकायला जाऊन बसलास. तल्लीन होऊन तुझे एक एक राग आळवणे, माझ्या शेपटाला धरून हेलकावे देत ताना घेणे. " स्वरगंगेच्या काठावरती " मुळात तसे अवघडच गायला, त्यात तुझा सुटलेला मराठी वाचनाचा हात.... तरीही शब्द न शब्द माझ्याकडून वदवून तो अचूक उच्चारण्यासाठी घोटून पक्का होण्याची दक्षता घेऊन केलेली गाण्याची प्रॅक्टिस. पुढे पुढे तर तू एकाग्र होत गेलास त्यात. एकलव्यासारखा !

एक ना दोन.... अगदी जन्मलास तेव्हांपासूनच्या अनंत आठवणी..... पोतडी भरभरून.... निगुतीने एकावर एक ठेवलेल्या. नुसती निरगाठ उकलायचा अवकाश, उसळी मारून पृष्ठावर येतात... येतच राहतात.... डोळ्यांवाटे सांडत राहतात. त्याही तुझ्याच सारख्या... कधी अवखळ तर कधी तरल. भोवती फेर धरून एकदा का घुमायला लागल्या की मी माझीच राहत नाही..... तुझ्यातली मी... माझ्यातला तू.... पाहता पाहता दोघेही तादात्म्य पावतात. उरते ती आश्वस्त जाणीव!

कधीकधी मला भीतीच वाटते माझ्यातल्या तुझ्यावरच्या ओनरशिपची. तुला बोलूनही दाखवलेय मी अनेकदा.... त्यावर तुझे खळखळून हसणे.... " ममा, तू पण नं वेडीच आहेस. भीती काय वाटायची आहे त्यात. अगं तुझी ओनरशिप सदाचीच आहे माझ्यावर. तो तुझा सार्वभौमिक हक्क आहे. त्या ध्रुवपदासारखी तू माझ्यासाठी अढळ आहेस, असणार आहेस. भितेस काय! उलट तुझ्या या ओनरशिपच्या दादागिरीने अनेकदा माझे पाय मार्गावरून ढळले नाहीत. आजीची तुझ्यावरची ओनरशिप अजून तरी सुटली आहे का? मग? आणि ती फक्त तिलाच नाही तर तुलाही हवीहवीशीच आहे. कधीतरी तात्पुरता त्रास होतो, अगदी कटकटही होते पण काही वेळ गेल्यावर लक्षात येते की आईचे सांगणे योग्यच होते. अगं, उलट तू जर मी मोठा होतोय म्हणून.. मला स्पेस देण्यासाठी अंतर राखू लागलीस ना तर मात्र मी कोलमडेन. " किती सहज शांत करून जातोस तू माझे मन.... ही हातोटी तुला नेमकी साधलेली ! मी तुझी नस न नस ओळखते की तू माझी.... आताशा हा प्रश्नच संपलेला !

तू जात्याच लाघवी. जीव लावणारा, हळवा, समंजस. तसा थोडासा मनस्वीही आहेस पण तापट नाहीस. तुला राग खूप येतो, पण तू कधीच तांडव केल्याचे मला आठवत नाही. सुतारपक्ष्यासारखे एकसुरात तुझे म्हणणे मांडत राहतोस. तासनतास.... न थकता..... टक टक.... टक टक.... कधी गंमत वाटते तर कधी तुझ्या या एकसुरी सपाट आवाजातल्या टकटकीचा मनस्वी राग येतो मला. तू मात्र आपला हेका सोडत नाहीस... वाद घालणे तुला मनापासून आवडते. चर्चेच्या एकामागोमाग एक फैरी, कुठलेही आवाजाचे चढउतार न करता... तुला पटलेला मुद्दा समोरच्याला पटेपर्यंत केलेला अथक प्रयत्न... आणि एकदा का समोरच्याला मनापासून ते समजले-पटले की तुझ्या चेहऱ्यावर उमटलेली कळतनकळतशी स्मितरेखा. वादासाठी वाद तू कितीही वेळ घालू शकतोस. पण त्यात आक्रस्ताळेपणा, चिडचिड कधीच नसते. नवल वाटते मला.... इतका संयम तोही तुझ्या वयाला... असाच राहा बरं बाळा! या जगात संयमाची नितांत गरज आहे.

या सुट्टीत तुला घरी यायला जमले नाही. आताशा तुझ्यामाझ्या सहवासाचे गणित फक्त उन्हाळा व नाताळाशीच निगडित झालेय. बाकी सगळा वेळ असतो तो रखरखाट. तुझी आठवण प्रत्येक क्षणी मी काढते असा माझा दावा नाही.... माझ्यातूनच आलेला तू माझ्यापासून वेगळा असू शकत नाहीस म्हणूनही असेल कदाचित! परंतु माझ्या प्रेमाचं, मायेचं तुला ओझं होऊ नये म्हणून तारतम्याची सोबत हवी... सुसंवादाचे मळे अखंड फुलत राहण्यासाठी ओनरशिप धुक्यासारखी विरायला हवी. तुला आवडत असली तरीही....!

आज सकाळपासूनच जीवाला हुरहुर लागली आहे. कळतं पण वळत नाही.... तगमग वाढू लागलेली... वाटले लिहावे तुला... खरं तर तुला माहीत नसलेले असे माझ्यापाशी काहीच नाही.... म्हणूनच तुझ्यासाठी नाहीच रे, माझ्यासाठी...!

बाळा, तू खूप दूरवर जा. अगदी जाता येईल तितकं! अनोळखी वाटा शोधण्यातला आनंद तुला अपरंपार मिळू दे. बळकट पाय आणि तरल मनाचे पंख यांची साथ तुला मिळू दे. माझे डोळे तुझ्या मागोमाग येतच राहणार, पण मागे वळून तू त्यांच्याकडे बघू नकोस. काळजीच्या काट्यानं, तुझ्या चैतन्यावर मला चरा देखील उमटवायचा नाहीये!

तू पुढे पुढे जा. तुझ्या आनंदाचं चांदणं वाटेवर पडलं असेल ते मी वेचत राहीन. तुझ्या यशाचा उत्सव माझ्या मनभर साजरा होईल. तू कितीही दूर असलास तरी माझा हात तुझी पाठ थोपटू शकेल. तेवढ्यापुरतीच माझी आठवण ठेव; कारण पराक्रमाच्या वाटेवर, अगदी जिवलगाच्या शाबासकीची सम फार आवश्यक असते. तेवढ्यापुरताच आठवणींच्या समेवर ये. मधल्या तलवलयांत तू मनमुक्त ताना घे. स्वत:ला कौल लावून.

स्वत:चा आतला आवाज, गर्दीच्या कोलाहलातही जपू शकलास, तर तुला स्वत:ची फार सुंदर सोबत मिळेल. त्यात मीही सामावलेली असेन. तुझा आवाज ही माझ्या आतल्या आवाजाची हाक असेल. तुझ्या माझ्या आवाजांच्या या दोन बिंदूंत एक आपलं दोघांचं आयुष्य सामावलेलं असेलं. हातामधली तेजाची ज्योत विझू न देता, उलट आपल्यातल्या सत्वाचं तेज त्यात ओतायचं. ज्वाला प्रज्वलित ठेवायची. वाट पुढे पुढे जातच असते; आणि त्या धुक्यात हरवलेल्या वाटेवर पळायला उत्सुक अशी तुझी दमदार पावलं आणि त्या पावलांच्या ठशात माझे पाय हलकेच ठेवत तुझ्या गतीला गाठायचा आटोकाट प्रयत्न करणारी माझी पावलं.

प्रिय, हे पत्र मी तुला उद्देशून लिहिलं असलं तरी ते मी तुला पाठवणार नाही. ते या कागदावर असंच पडून राहील. कोशात झोपलेल्या फुलपाखरासारखं. हे पत्र खरं तर मी माझ्यासाठीच लिहितेय. जे मी तुझ्याशी कधी बोलले नाही ते बोलण्यासाठी.

कधीमधी तू हे पत्र जाणू शकशील या कल्पनेनंच हा एकतर्फी संवाद मला दुतर्फी वाटायला लागतो. तू ऐकतो आहेस या भासानंच बंद दरवाज्याची कुलुपं निखळून पडायला लागतात.

ह्या ओळी तुझ्या डोळ्यांची खूप वाट पाहतील. डोळ्यांतून मनात झिरपायची वाट सापडली तर हे पत्र तुला पोहोचेल. पण हे पत्र तू कधी वाचलंच नाहीस, तर या बलाकमाला अनंत आकाशात उडून जातील. कागद रिकामा होईल. इथं हे पत्र नांदत होतं याचा पायरव सुद्धा कोणाला ऐकू येणार नाही!

Thursday, August 18, 2011

भरलेल्या लाल मिरचीचे लोणचे

पानात डाव्या बाजूला तोंडीलावणे म्हणून लोणचे, चटणी, कोशिंबीर प्रकार सगळ्या घरांमधे हटकून आढळतात. कोशिंबीरीचेही मी समजू शकते परंतु भाजीला पर्याय म्हणून भाजीसारखे लोणचे खाणारी बरीच जण आहेत. कच्च्या करकरीत कैरीचे ताजे लोणचे, करवंदाचे, भोकराचे, उसळी मिरची, लिंबू+मिरची, उपासाचे गोडाचे लिंबाचे लोणचे, आंबोशी आंब्याचे बेगमीचे लोणचे, ताज्या भाज्यांचे चटकन संपणारे फेसून मोहरी लावलेले लोणचे ( फारच सुंदर लागते हे चवीला... आणि मस्तकात चढतेही झकास ), मिठाच्या पाण्यात मुरवत घातलेल्या बाळकैर्‍या, आवळे अती उत्साही कोणी असल्यास व प्रचंड आवडते म्हणून कार्ल्याचे, माईनमुळ्याचे, अखंड रायआवळ्य़ांचेही. लहानपणी केव्हांतरी मामाने तिवारीकडच्या भरल्या लाल मिरच्यांचे लोणचे आणले होते. तसे माझे व लोणच्यांचे फारसे सख्य नाही. भाज्यांचे ताजे लोणचे वगळता आंबट लोणची प्रकार भावत नाही मला. कसे कोण जाणे पण या मिरच्या मात्र खूप आवडल्या, मनात घर करून राहील्या. गेल्यावेळी कोरम मॉल ( ठाणे ) मधे तिवारीचे ( गिरगावातल्या ) दुकान आले आहे कळताच धाव घेतली. बरीच गर्दी होती, नेहमीचे पदार्थ दिसत होते पण लोणची दिसेनात. म्हणून तिथे असलेल्या दोघांना विचारले तर त्यांनी कानावर हात ठेवले. खरे तर त्यांना फारशी माहीतीच नव्हती आणि इंटरेस्टही नव्हता. गिरगावात जाऊन आणायचा मोह होत होता पण तितका वेळ नव्हता. पुढच्यावेळी पाहू म्हणून नाद सोडला खरा पण इथे आल्यावर ’ एशियाना ’ ( एशियन मार्केट ) मधे अचानक लाल मिरच्या दिसल्यावर मात्र राहवले नाहीच.

साहित्य :
दहाबारा ताज्या लाल मिरच्या
चार चमचे बडिशोपेची पूड
तीन चमचे लाल तिखट
चार चमचे गरम मसाला
दोन चमचे मोहरीची पूड
दोन चमचे मेथीचे दाणे भाजून पूड करून
दोन चमचे धण्याची पूड
पाच चमचे मीठ ( कोरडे )
दोन मध्यम लिंबाचा रस
दोन चमचे आमचूर
गरम करून थंड केलेले तेल एक कप







कृती :

लाल मिरच्या स्वच्छ धुउन पुसून कोरड्या कराव्यात. देठ काढून चमच्याच्या मागच्या टोकाने आतल्या बियाही काढून टाकाव्या. एका ताटात बडिशोपेची पूड, लाल तिखट, गरम मसाला, मोहरी, मेथी, धण्याची पूड, मीठ, आमचूर घेऊन त्यात लिंबांचा रस व चमचाभर तेल घालून सगळे मिश्रण चांगले एकजीव करावे. नंतर मिश्रण मिरच्यांमधे घट्ट ( ठासून ) भरावे. एका कोरड्या बरणीत या भरलेल्या मिरच्या ठेवून वरून गरम करून थंड केलेले तेल ओतावे. मसाला थोडासा उरलेला असेल तर तोही वरून त्यात घालून बरणीचे झाकण लावून हलवून ठेवावे. दर दोन दिवसांनी बरणी हलवावी म्हणजे तेल चांगले मूरत जाईल. साधारणपणे महिनाभराने मिरच्या खाण्यायोग्य होतील. या मिरच्या करायला फारच कमी वेळ लागतो मात्र नंतर महिनाभर धीर धरायला हवा. अर्थात या धीराचा मोबदला पुरेपूर मिळतोच. अतिशय चविष्ट लागते हे लोणचे. बडिशोपेचा एक वेगळाच स्वाद, मधूनच मेथीचा किंचित कडवटपणा, आमचूर व लिंबामुळे आलेली चटकमटक चव... नेहमीच्या लोणच्यांपेक्षा एकदम हटके व चविष्ट.



टीपा :
कच्च्याचं बडीशोपेची पूड करावी. भाजून करू नये. लगेच स्वाद बदलून जाईल. मोहरीचीही पूड न भाजताच करावी. मात्र धण्याची पूड धणे भाजून घेऊनच करावी. मेथीची पूड चुकूनही न भाजता करू नये. प्रचंड कडू होते.
गरम मसाला आयत्यावेळी करून घालायचा झाल्यास लवंगा, मिरी, दालचिनी, तमालपत्र, दगडफूल, चक्रीफूल, जिरे, शहाजिरे वेगवेगळे भाजून घेऊन कोमट झाल्यावर त्याची पूड करावी.
संपूर्ण कृतीत पाण्याचा अंश बिलकूल असता नये. लोणच्याला त्यामुळे बुरशी धरू शकते.
सगळे जिन्नस हाताने कुस्करून चांगले एकजीव करावेत. दोन लिंबाचा रस या सगळ्यात जिरून जातो.
दोन तीन दिवसांनी बरणी हलवायला विसरू नये.
’ चहाचा चमचा ’ हे प्रमाण घ्यावे.