Friday, November 6, 2009

खरेच का मी प्रेमात पडलोय.......

प्रेमविवाह करून घरात आलेल्या सुनांचा उल्लेख कालच्या पोस्टमध्ये आला आणि अनेक घटना डोळ्यासमोर आल्या. कुठल्याही संबंधांच्या अबाधित राहण्याच्या मुळाशी जर ' प्रेम ' असेल तर कितीही प्रतिकूल परिस्थितीतही ते रुजते, वाढते, टिकते.... खंबीरपणे स्वतःचे विश्व तयार करते. प्रेम विवाह हा आज आपल्या समाजात बराचसा रुळतो आहे. काळानुरूप विरोधाची धार सर्वसाधारणपणे किंचितशी कमी झालीये. किमान केवळ विरोधासाठी विरोध ही प्रवृत्ती मावळत चालली आहे. मान-अपमान, उच्चनीच, जातपात भेदाभेदही कमी होऊ लागलेत. दोन्ही बाजूने तडकाफडकी एक घाव दोन तुकडे असे न घडता मुलाची/मुलीची बाजू निदान ऐकून घेतली जाते. त्यावर विचार केला जातो. कधी आनंदाने तर कधी एवीतेवी पण ते लग्न करणारच आहेत त्यापेक्षा आपण पुढे होऊन करून देऊयात हा दृष्टिकोनही घेतला जातो. तर कधी, त्यांनी परस्पर जमवलेय ना मग जे काही पुढे घडेल त्याला तेच जबाबदार. असे म्हणून स्पष्ट जाणीव करून देऊन लग्न लागले जाते. पण ही झाली मुलामुलीच्या घरच्यांची मानसिक बाजू.

प्रत्यक्षात मुलगा व मुलगी यांनी किती सखोल विचार केला आहे यावर प्रेमविवाहाचे संपूर्ण यश - आयुष्य अवलंबून असते. प्रेम होणे हे सहज आहे. अगदी पाचवीपासून आमचे प्रेम होते असे म्हणणारेही मित्र-मैत्रिणी पाहिलेत. पुढे मात्र ते वेगळ्या प्रेमात गुंतलेले सापडलेत. मग त्या आधीच्या प्रेमात खरेपणा नसतो का? असतो ना-तेवढ्यापुरता. पण मग शेंबूड धड पुसता येत नाही की मेली चड्डीची नाडीही अजून नीट बांधता येत नाही. पाहावे तेव्हां गाठ बसतेय. ती गाठ आधी सोडवायला शिका. प्रेमं करता आहेत. हे ऐकत खाल्लेले धपाटे. मग सोडलेला तात्पुरता नाद. की पुढच्या वर्गात गेले की पुन्हा नव्याने झालेला प्रेमाचा साक्षात्कार. असे करता करता ते एका मुलीपुरते/मुलापुरते न राहता वारंवार होत राहते व वारंवार तुटत राहते. पुढे हे अंगवळणी पडते. अनेकदा शाळा-कॉलेजमध्ये इतर मित्र-मैत्रिणी उगाचच दोन जणांची नांवे एकत्र जोडून टाकतात. त्या बिचाऱ्या दोघांच्या मनात कधीही हा विचार आलेला नसतो. येता जाता सारखी केलेली चेष्टा, विचारणा इतकी अती होते की त्या दोघांनाही वाटू लागते की आपण प्रेमात पडलोयं- खरे तर पाडलो गेलोयं. पण हा आभास फार काळ टिकत नाही. आणि नाही तेच बरे आहे. मात्र कधी कधी या लादलेल्या प्रेमाची परिणिती फार दुःखदायक होते. मित्र मैत्रिणी नामानिराळे होतात अन भोगावे लागते यातील कमकुवत जीवाला.

लहानपण चाळीत गेल्यामुळे अठरापगड जातींचे लोक एकत्र नांदताना पाहत होतो. त्यात प्रेम जमणे व नंतर ते मोडणे/मोडले जाणे/मारले जाणे या म च्या बाराखडीतील सगळे हातखंडे त्यातली भीषण दाहकता व दर्शनी सौम्य-प्रेमळ दिसणाऱ्या माणसांच्या मनातील जळजळ अतिशय जवळून अनुभवली. माझा व्यक्तिशः काडीचाही संबंध नसला तरीही प्रत्येक घटनेत माझाच बळी जातोय इतके खोलवर आघात झाले. एके दिवशी पहाटे आमची सगळी चाळ खडबडून जागी झाली ती एका घरातील माउलीच्या हंबरडा फोडण्याने. त्यांची सतरा वर्षांची तरणीताठी लेक एकाएकी गेली होती. काय झाले हो अचानक? काल तर चांगली होती. असे आजूबाजूचे लोक बोलत होते तोच पोलीस आले. मग कळले की तिचे ओठ, अंग काळेनिळे झाले होते. मग चर्चा-तर्कवितर्कांना उत आला. घरी कळले हो तिचे प्रकरण. मग काय बाप व भावाने पाजले काहीतरी. कसे हो उलट्या काळजाचे लोक हे. शेवटपर्यंत कोणालाही सत्य कळले नाही आणि पोलिसांनी कोणालाही पकडून नेल्याचे पाहिले नाही. तो जो कोण मुलगा होता तो ही कधीही आला नाही. हसतीखेळती एक मुलगी अचानक गायब झाली. कोणाचे काय गेले हो तिच्याव्यतिरिक्त?

एक घर असे होते की जिथे मेरा भारत महान- हम सब एक हैं ही संकल्पना त्यांनी अगदी मनापासून राबविली होती. दक्षिणी, मुसलमान, पंजाबी, सिंधी व गुजराती असे सगळे एकमेकांबरोबर नांदत होते. मग ओघाने जोरदार हाणामाऱ्या येणारच. बरे हे सगळे चाळीतलेच. म्हणजे एकाच घरात इतक्या विविध प्रांतीय सुना-जावई आलेले. जेव्हां हा येण्याचा प्रोसेस चालू असे तेव्हां अगदी पळून जाण्यापासून ते जीवे मारण्याच्या धमक्यांपर्यंत सगळे प्रकार घडत. एकदा तर मुलीकडच्यांनी मुलालाच पळवून नेले व आठवडाभर डांबून ठेवले. पोलिस आणि घरचे शोधून शोधून थकले पण पत्ता लागला नाही. गंमत म्हणजे मुलगी घरातच असून तिलाही कळले नाही की आपल्याच लोकांनी त्याला पळवलेय.

हा तिढा सुटला तीही गंमतच झाली. ती मुलगी खरेच शूर होती. एक दिवस मध्यरात्री ती सरळ पहिल्या मजल्यावरील स्वतःच्या घरातून उठली आणि तिसऱ्या मजल्यावरील मुलाच्या घरी आली व म्हणाली आता मी इथेच राहणार. सगळे गडबडले. अरे जिथे मुलाचा पत्ताच नाही, अजून लग्नही झालेले नाही आणि ही म्हणते मी काही घरी परत जाणार नाही. मग त्यादिवशी दिवसभर पहिला मजला ते तिसरा मजला पकडापकडी सुरू होती. पण ही बया हटली नाही. मला जबरीने नेलेत तर चौकात उडी मारून टाकेन असे म्हणत चक्क मोरीवर चढलीही. मग मात्र कसे कोण जाणे पण तिच्या वडिलांनी तू आजपासून आम्हाला मेलीस असे म्हणून माघार घेतली व थोड्यावेळाने मुलगा परत आला. दोन दिवसात लग्नही लागले. या घराचे एक वैशिष्ट्य म्हणजे एकदा लग्न झाले की पुन्हा हाणामाऱ्या होत नसत. काही काळाने सगळ्या सुनांच्या माहेरचे लोकही येजा करू लागत. एकदा का लेकुरवाळ्या झाल्या की मग तर प्रेमाला पूर येत असे. पण लग्नाआधीचा विरोध मात्र भयंकर होता.

प्रेम विवाहात मुलगा व मुलगी दोघांनीही तितकेच खंबीर असणे व एकमेकांसाठी संपूर्ण जगाशी टक्कर घेण्याची मानसिक तयारी ठेवणे या दोन्ही बाबींना अनन्य साधारण महत्त्व आहे. अन्यथा प्रेम करूच नये. जे निभावण्याची ताकद नाही ते केवळ मजा किंवा नाईलाज आहे माझा या सदराखाली संपणार असेल ते करण्याचा षंढपणा ( दोघांनीही ) बिलकुल करू नये. परंतु अनेकदा हे घडताना आपण पाहतोच.

कॉलेजमध्ये एक मैत्रीण होती, तिचे आडनाव लेले होते. एकारान्ती कोकणस्थ. गिरगावात राहायची. घरचे वातावरण खूप कडक शिस्तीचे होते. कसे कोण जाणे पण ती त्यांच्याच बिल्डिंगमधल्या एकांच्या घरी येणाऱ्या मुसलमान मित्राच्या प्रेमात पडली. तो कुर्ल्याला राहत होता. मुलगा चांगला होता. तेव्हां तो सीए करत होता. आजही मला आठवतेय या प्रकरणामुळे आम्हीच घाबरून गेलो होतो. एकदम मुसलमान म्हणजे फारच धाडस होते. शिवाय त्याच्या घरी जाऊन तिच्या नशिबी काय वाढून ठेवलेले असेल हा प्रश्न आमची सगळ्यांची झोप उडवीत होता. आम्हाला तरी काय कळत होते फारसे पण इतके टोकाचे लग्न करू नये असेच मन म्हणत होते. शेवटी एकदा तिच्या घरी कळलेच. मग मोठे महाभारत झाले. मारले काय, कोंडून घातले. मामाकडे गावाला पाठवून दिले. मुलाच्या घरातूनही प्रचंड विरोध होता. म्हणजे जर लग्नानंतर त्याने घरच्यांच्या दबावाला बळी पडून हिची साथ सोडली अथवा ’ तलाक तलाक तलाक ’ म्हणून हिला सोडूनच दिले वा अजून दोन लग्ने केली तर हिचे काय होणार? अम्मीजान व अब्बूजान बहोत अच्छे हैं असे तो नेहमी म्हणे पण ते तर हिला घरात घ्यायलाही तयार नव्हते. इतके मोठे रामायण होऊनही हे दोघे डगमगले नाहीत. एक दिवस दोघेही आपापल्या घरातून पळून गेले आणि रजिस्टर लग्न करून मोकळे झाले. दोघेही पुन्हा कधीच आपल्या घरी गेले नाहीत व त्यांच्या घरच्यांनीही कधीही संपर्क साधला नाही. होता होता माझा संपर्क कमी झाला व कालांतराने तुटलाच. आशा आहे हे दोघे आजही बरोबर असतील.

ऑफिसमध्ये नुकतेच लागले होते. शेजारीच बसणारा स्नेही जागेवर नसताना त्याच्या बायकोचा फोन आला. मी निरोप घेतला व नंतर तो आल्यावर त्याला सांगितले. तो पटकन म्हणाला की तिचे दीक्षित आडनाव ऐकून तू गोंधळली असशील ना. मी नुसतेच स्मित केले. त्याचे आडनाव पगारे, शेड्यूल कास्ट आणि ती ब्राम्हण. मग त्याने सगळी हकीकत सांगितली. या लग्नाला दोन्ही बाजूने अतिरेक विरोध झाला होता. स्वतः हा माझा स्नेहीही थोडा साशंक झालेला. आपले आई-वडील, घरातील माणसे, चालीरीती, समाज यात कसे निभणार हिचे. माझ्यामुळे तिला फार भोगावे लागेल. तिला माझ्या घरी यायचे आहे म्हणजे रोजच्या घटनांना तिलाच तोंड द्यावे लागणार. तिच्या घरी मी कधीच जाणार नसल्याने मला काहीही सोसावे लागणार नाही. या जाणीवेने मी मागेच सरकत होतो. ज्या प्रेमामुळे माझ्या प्रेमालाच त्रास होणार आहे ते प्रेम म्हणायचे की ते करणे हा स्वार्थ आहे ही भावना वाढू लागली होती. पण शालिनीने कधीही माघार घेतली नाही. तिला खूप त्रास झाला पण तिने सोसला. आणि मी तिची साथ कधीही सोडली नाही. आज अतिशय सुखाने आम्ही संसार करतो आहोत आणि याचे पाऊण श्रेय तिलाच जाते.

अशीच अजून एक सखी होती. ती मराठा. प्रेम जमले ब्राम्हण मुलाबरोबर. दोघेही आमच्याच ऑफिसमधले. नोकरी करणारे असल्याने खरे तर त्यांना तशी पैशाची अडचण नव्हती. पण त्या दोघांना घरच्यांना मनवूनच लग्न करायचे होते. दोन्ही बाजूने भयंकर विरोध . सगळेजण सांगत होते की तुम्ही लग्न करून टाका. मग कालांतराने घरचे निवळतील. हे दोघेही हट्टाला पेटलेले. दोन वर्षे दोघेही झगडत होते घरच्यांशी. घरच्यांनी सहा महिने तुम्ही एकमेकांशी बोलायचे नाही, भेटायचे नाही अशी अगदी सिनेमा स्टाइल अट घातली होती त्यालाही पुरे पडले. शेवटी जिंकले. दोन्ही बाजूंनी मोठा गोतावळा येऊन समारंभ करूनच लग्न केले. हे सगळे ते दोघे ठाम होते म्हणूनच साधले. नाहीतर.....

हे पाहिले आणि वाटले खरेच हिंमत हवी व तितकाच विश्वास हवा. जात पात, कूळ, उच्चनीच वगैरे मी कधीच मानत नव्हते आजही मानत नाही. परंतु अशी लग्ने करताना जे मुद्दे विचारात घ्यायला हवेत तेच मुद्दे नेमके दुर्लक्षिले जातात. अरे जिथे देशस्थ कोकणस्थ यातही राहणीमान-खाणेपिणे-वागणे, विचारसरणीत तफावत दिसते व त्याचा प्रसंगी त्रासही होतो तिथे एकदम मुसलमान, पंजाबी व आपल्यातच एकदम दोन टोकाची लग्ने करणे व ती निभावणे फार कठीण आहे. एकदा लग्न केले की झाले असे नसते ना. ती तर सुरवात आहे. तासभर बरोबर राहणे, एकमेकाला आवडेल तेच बोलणे, वागणे आणि कायमचे बरोबर राहणे तेही सगळ्या विरोधाला तोंड देत सोपे नाही. आजच्या शहरातील जीवनमानावर किंवा आधुनिकीकरणामुळे झालेल्या बदलांवर जाऊ नका. हे बदल फार मोजक्या मूठभर लोकांत झालेत. त्यांच्यातही अंतर्गत घोळ असतातच. वरकरणी तरी आनंदाने स्वीकारलेले दिसून आले तरी येताजाता उद्धार होत असतात. पण एकंदर समाजात अजूनही फारशी मानसिकता बदललेली नाही. गावाकडे तर फार धार दिसून येते. काही गावांमध्ये प्रेमविवाहाला मान्यताच नाही. कोणी केल्यास चक्क मुडदे पाडले जातात. घरेच्या घरे संपविली जातात. गाव असो शहर असो आजही मुलींना मारहाण करणारे व प्रसंगी जीवे मारणारे लोक आहेतच.

कोणाच्याही प्रेमात पडण्यापूर्वी स्वतःला तपासा. आपली क्षमता पारखा. प्रेमात पडणे सोपे पण निभावणे कठीण हे अनेकदा ऐकलेले असते. त्यात काय मोठेसे असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष होता नये. मुलगा असो वा मुलगी कोणीही एकमेकाला त्या त्या वेळेपुरते/गरजेपुरते वापरू नये. टाईमपास म्हणून प्रेम करू नये. हा खेळ अंगाशीही येऊ शकतो. एखाद्याचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते. मानसिक पंगुत्व येऊ शकते. देवदास म्हटले किंवा मजनू म्हटले की आपण सगळे हसतो. काय वेडा आहे म्हणतो परंतु ह्यामागे किती दारुण पराभव दडलेला आहे तो दिसला की मन विषण्ण होते. एखादे उमदे जीवन अकाली संपू शकते. असे दुसऱ्याचे जीवन बरबाद करण्याचा हक्क कोणालाच नाही. म्हणून मुळातच स्वतःला विचारायला हवे मी खरेच का प्रेमात पडलोय? आणि उत्तर हो आले तर वाटेल ते घडले तरी मी ते निभावणारच. प्रसंगी घरच्यांची साथ सोडावी लागली तरी. पण माझ्या प्रियकराला/ प्रेमिकेला दगा देणार नाही. लग्नानंतरही पाठीशी ठाम उभा राहीनच. मग कोणीही तुमचे भावविश्व रौंदू शकणार नाही.

Thursday, November 5, 2009

वा ग वा! तुझा की माझा.......

सकाळी सकाळीच नम्रताचा फोन आला..... तिने जी पंजाबमेल सोडली ती शेवटी तिच्या स्वरयंत्राने तिच्या संतापाची-त्राग्याची साथ सोडल्यावर नुसताच फुसफुसाट होऊ लागला तशी जरा कुठे ती थांबली. " अग, हो हो... जरा हळू गं. किती संतापशील? आणि हा असा त्रागा करून तुझ्या जीवाला होणाऱ्या त्रासात फक्त भर पडतेय. तेव्हा दम खा आणि शांतपणे सांग मला. " हे माझे वाक्य ऐकले अन पुन्हा ही उसळली, " म्हणे शांतपणे.... तुझे काय जातेय गं हे सांगायला. ज्याचे जळते ना त्यालाच कळते. तू चुपचाप ऐकायचे काम कर. उगाच मध्ये मध्ये बोलू नकोस." आता इतका सज्जड दम मिळाल्यावर मी अळीमिळी गुपचिळी चा अवतार धारण करून तिचा धोधो कोसळणारा धबधबा अंगावर झेलत ऐकत राहिले. " अगं ऐकते आहेस ना? मग बोल की काहीतरी. माझेच चुकतेय का ते तरी सांग मला. रोजची मेली कटकट. तेच तेच ऐकून कान किटलेत माझे. जणू माझ्या उपकारालाच जन्माला घातला ना यांनी दिनेशला. " एकीकडे मला हसू आवरत नव्हते पण हसून चालणार नव्हते. नाहीतर नम्रताने घरी येऊन मला धोपटून काढले असते. कसेबसे तिला थोडा धीर देऊन, समजावून मी फोन ठेवला. आणि प्रथम मस्त हसून घेतले.

डोक्यात नम्रताचा विचार असतानाच पुन्हा फोन वाजला. अरे बापरे! पुन्हा नम्रताच की काय? आज ही बया अगदी पेटलीये बहुतेक. " अग काय हे नम्रता, जरा शांत हो म्हटले तर..... " " हं, मला वाटलेच होते. ही बयाबयी तुझ्याच कानाशी लागली असणार. स्वयंपाकघरातून पाहत होतेच, शिवाय तुटक तुटक कानावरही पडत होतीच हिची मुक्ताफळे.... जीवाला काही वाटतही नाही. खुशाल माझी गाऱ्हाणी करते सगळ्या दुनियाभर. " मी नम्रता समजून बोलायला सुरवात केली आणि नेमके आगीत तेल ओतले गेले होते. नम्रताच्या सासूबाईंचा फोन होता. बाकी त्यांचा तर्क एकदम बरोबरच होता. माझ्या मनात लागलीच आले, खरे पाहू गेल्या या सासू-सुनेची मने किती जुळलेली आहेत पाहा. कसे बरोबर कळते एकमेकीच्या मनातले. आता नम्रता माझ्याच कानाशी लागणार हे जर यांना ओळखता येते तर तिच्या मनातलेही येत असेलच ना. मग हा सगळा घोळ म्हणा किंवा काय जो रुसवा-फुगवा-कुरबूर बोलून सुटण्यासारखी आहे हे कळत नसेल का? पण कळून घ्यायचेच नाहीये ना ....

मला सावरून घेणे भागच होते. नम्रता माझी अगदी जवळची मैत्रीण आणि तिच्या सासूबाई या माझ्या आईच्या ओळखीतल्या. इकडे आड तर तिकडे विहीर. जरा काही झाले की या दोघीजणी माझा बकरा करून टाकतात आणि मग निवळले की जोडीने जाऊन--आता गळ्यातगळा घालून म्हणणे शक्य नाहीये
पण प्रकार त्यातलाच, टेंपटेशन मधले सीताफळाचे-शहाळ्याचे आइसक्रीम चापतात तेव्हा मात्र एकीलाही माझी आठवण येत नाही .

" मावशी अहो उगाच कशाला नम्रताला नावे ठेवताय. ती काही तुमची गाऱ्हाणी करत नव्हती, फक्त तिला कशामुळे त्रास होतोय ते सांगत होती हो. बरं ते राहू दे, कशा आहात तुम्ही?" मी आपला सावरायचा प्रयत्न करीत होते पण तो हाणून पाडत, " कळतंय हो मला... तू मैत्रिणीचीच बाजू घेणार. मी कोण... ’ सासू ’ नां? म्हणजे मी वाईटच. सासू म्हणजे दुष्ट-खाष्ट-कुचकट-कांगावखोर आणिक काय काय विशेषणे आहेतच या नात्याला..... पण सुनाही काही कमी आहेत का? आणि आजकाल खरं म्हणजे सास्वाच बिचाऱ्या झाल्यात. अगदी धाकात ठेवतात हो आजकालच्या सुना. पण मी हे तुला काय सांगतेय, तू ही सूनच. ह्म्म्म्म...... " एक मोठठा सुस्कारा सोडून मावशी जरा क्षणभर थांबल्या तशी मी पटकन संधी साधली, " मावशी अहो कुठून कुठे जाताय एकदम? आणि कोणी काही विशेषणे लावलेली नाहीत. उगाच तर्क करून डोक्याला ताप करून घेऊ नका. आता मी जरा घाईत आहे, पळते. एकदोन दिवसात फेरी मारते तुमच्याकडे मग बोलू आपण. चालेल ना?" त्यांनी हो नाही म्हणायच्या आत मी फोन ठेवूनच दिला. घाबरूनच ठेवला कारण आता या दोघींच्या त्रांगड्यात मावशी माझ्यावर- यच्चयावत 'सून' वर्गावरच घसरल्या होत्या ना.


' सासू - सून ' या प्रकरणातले खरे ' कल्प्रेट- नवरा(
यच्चयावत नवरेजमातीची आधीच माफी मागतेय ) तो मात्र यातून हमखास सहीसलामत असतो. अगदी लोण्यासारखा अल्लाद तरंगत असतो. आता बरेचसे नवरे म्हणतीलच, " ऐका. एकतर दोघी मिळून घुसळत असतात ते कोणाला दिसत नाही. वैताग नुसता. प्रेम प्रेम म्हणायचे आणि नुसती खेचाखेची करायची. त्या आमदारांना पार्टी बदलायचे पैसे तरी मिळतात इकडे पैसे मरो साधे सरळ संभाषण तरी करा पण नाही..... येताजाता शालजोडीतले चालूच असतात. हे कसले प्रेम? नुसता अधिकार गाजवायला हवा. अरे मी काय म्हणतो, एकदा समोरासमोर बसा आणि काय ती हाणामारी करून मोकळे व्हा. पण नाही.... नुसते धुमसत ठेवायचे. आणि मिळेल तेव्हां तेल ओतत राहायचे. आणि भडका उडालाच तर पुन्हा दोघींना आशा काळे व्हायला वेळ लागतच नाही. "

जरा लाडात आलो की ही लागलीच अंगावर येते, " आता कशाला? जा की मातोश्रींकडे." आता मातोश्री काय प्रत्येक गोष्ट देऊ शकतील का? पण तेवढी अक्कल असेल तर ना. खरे तर खूश व्हायला हवे पण रेमे डोके. आणि आईला खुश करावे म्हणून कधी म्हटले, " आई, अगं तुझ्या हातच्या बटाट्याच्या भाजीसारखी भाजी कोणाचीच होत नाही. कर ना आज." बस हे कानावर पडायचा अवकाश...... कुठून बोललो असे होऊन जाते. मातोश्री अगदी संधीची वाट पाहत असल्यासारख्या उसळतात, " असं का? एरवी आई नाही दिसत ती. सारखा अगं अगं करत तिच्या मागेमागे गोंडा घोळत फिरत असतोस. जा आता तिलाच सांग करायला. मग अर्धीकच्ची भाजी काय मस्त झाली आहे गं असे म्हणत गीळ हो. "

आईपण अतीच करते हं. नाही म्हणजे आता अनुभवाने व सारखे तेच करून करून आईच्या भाजीची सर हिच्या भाजीला येत नाही हे खरेयं पण इतकी काही वाईटही करत नाही ...... आई विसरतेय पण जर गिळावी लागेल अशी होत असती तर आईने खाल्लीच नसती ना कधी. चांगली नीट जेवते की दररोज. पण हे बोलायची सोय नाही. म्हणेल, " मेल्या, माझ्या जेवणाकडे तुझे लक्ष. बाई बाई काय म्हणू आता. माझाच पोर माझे खाणे काढतो म्हटल्यावर ती तर परक्याची पोर......... " त्यापेक्षा घरी कमीतकमी थांबावे म्हणजे बरे. " अग, कुठे गेलाय गं. खूप वेळ झाला. अजून कसा नाही आला? " म्हणत दोघी काळजी करत बसतील हे उत्तम.

" अहो तुम्ही कशाला मध्ये मध्ये नाक खुपसताय? मी आणि माझा नवरा बोलतोय ना. आमचे आम्ही पाहून घेऊ. तुमच्याकडे सल्ला मागितला तरच द्या. "इति सून. " हो का? तू आणि तुझा नवरा का? हा नवरा कुठून आला गं? नाही म्हणजे माहेरून येताना घेऊन आलीस का तू बरोबर त्याला? कसा आणशील म्हणा? अगं मी जन्माला घातलाय, हाडाची काडं करून वाढवलाय म्हणून तुला तो मिळालाय बरं का. " किंवा ते अनेक सिनेमांमध्ये-सिरियल्समध्ये तांडव चालते ना, " एकतर मी तरी या घरात राहीन नाहीतर ह्या तरी/ ही तरी ". नाहीतर, " असं का, तुम्ही माझ्यासाठी जन्माला घातला का? ( इथे सुनेचे फिसकन हसणे व नवऱ्याकडे पाहून छान छान म्हणून वेडावणे ) तुम्हाला नकोच होता जणू? मग आता कशाला हवा झालाय? कमाल आहे, नाही म्हणजे तुमच्या बोलण्याचा आणि वागण्याचा काही ताळमेळ जुळत नाहीये. " अशी वाक्ये कानावर पडली की समजून जावे, युध्द पेटलेय आणि नॉर्मल घर आहे. लागलीच मला या दोघींच्या मध्ये उभा राहिलेला नवरा व त्याचे थपडा खाऊन रंगलेले गाल दिसू लागतात. काळानुरूप हा प्रश्न मांडण्याचे व त्यावर आपापल्या परीने मात करण्याचे हातखंडे बदलले असले तरी मूळ प्रश्न अजूनही तितकाच गहन आहे. खरं तर उत्तर एकच आहे फक्त दृष्टिकोन दोन.

मुळात जर सासूबाईंना मुलगा झालाच नसता तर सुनेला नवरा कसा बरे मिळाला असता? शिवाय ज्येष्ठतेनुसारही सासूबाईंचा हक्क प्रथम येतो. आणि ' आई ' चा मुलाचे जीवन घडवण्यात, वाढवण्यात, चांगला माणूस बनवण्यात, शिक्षणात फार मोठा हात असतो. आई सांगेल तीच पूर्वदिशा हे समीकरण लग्न होईतो बहुतांशी मुलांचे असते. आईने स्वतःची अतिशय मोलाची वर्षे मुलांसाठी दिलेली असतात. म्हणजे काही उपकार केलेले नसतात. सुनांचे आवडते वाक्य आहे हे," अग बाई म्हणजे उपकारच केलेत म्हणायचे त्याच्यावर आणि आता ते मी फेडू असेच ना?" त्याच्या बदल्यात नव्हे पण आता आईलाही वाटत असते की मुलाने आपल्याकडे आवर्जून लक्ष द्यावे. म्हणजेच थोडक्यात - मुलगा माझा आहे हे आईचे म्हणणे रास्तच आहे.

आता सुनेला हे कसे पटणार. मुळात जर तो माझा असू नये असेच तुम्हाला वाटत होते तर तुम्ही त्याचे लग्नच कशाला करून दिलेत? सासरे तुमचे- मुलगा तुमचा अन संसारही तुमचाच. तो मात्र तुमच्या सासूबाईंचा नाही. तेच माझ्यावर आले की मात्र लागलीच बदलते का? आणि काय हो, माझी सगळी माणसे- आई-वडील, माझे घर सोडून मी या तुमच्या घरात आले ती कोणासाठी व कोणाच्या भरवश्यावर? नवऱ्याच्या ना? आणि तोच जर माझा नाही तर मग मी इथे काय करतेय? म्हणजे हा सगळा त्याग, तडजोड फुकटच म्हणायची की. ज्याच्या बरोबर व ज्याच्या साठी उभं आयुष्य काढायचं तोच मुळी माझा नाही.


आता खरं तर ही दोन्ही नाती परस्पर पूरक आहेत. एकच माणूस आणि भूमिका दोन. गंमत म्हणजे सासू-जावई/ सासरा-जावई/ सासरे-सून या नात्यात ही अशी रस्सीखेच कधीच दिसून येत नाही. अगदी क्वचित सासू-जावई यांच्या मध्ये ’ लेक-बायको ’ तारेवरची कसरत करताना दिसते. पण ती फार कुरकूर करत नाही कारण दोन्हींबाजूंनी तिला महत्त्व मिळत असते.
बरेचदा ही माझी वस्तू- माझ्या मालकीची वस्तू आहे हेच मोजमाप मुलाला-नवऱ्याला लावून त्याच्यावर माझाच अधिकार आहे ही धारणा असते. परंतु अशी वाटणी करायला तो काही स्थावर जंगम मालमत्ता आहे का? की कापला व हा माझा तुकडा आणि हा तुझा तुकडा असे म्हणता येईल. त्यापेक्षा तो तुझा की माझा ही रस्सीखेच न करता आपल्या दोघींचाही कसा राहील हे संगनमताने पाहणे जास्त चांगले होईल. मला यात आणखी एक मजेशीर भाग दिसतो तो म्हणजे सासूला काय किंवा सुनेला काय ’ मुलाच्या-नवऱ्याच्या ’ मनात आपल्याविषयी काय आहे ते कधी जाणून घ्यायची गरजच वाटत नाही. ते घेतले तर खरं तर हा वादच निर्माण होणार नाही. थोडक्यात त्या दोघींचा स्वतःवरही विश्वास नाही आणि त्याच्यावरही नाही. सासरेबुवांची मात्र याच्यात चंगळ. ते मस्त निवांत. काहीही झाले तरी त्यांच्यावर यातले काहीही बेतणार नसते. उलट दोन्ही पक्ष मधूनमधून त्यांची साक्ष मात्र काढत असतात.

मला नेहमी वाटते हा प्रश्न खरे म्हणजे ज्या माणसामुळे निर्माण झालाय त्यानेच मुळात तो निर्माणच होणार नाही या प्रयत्नात असावे आणि दुर्देवाने ( बहुतांशी थोड्याफार प्रमाणात तो होतोच ) झालाच तर आई व बायको यांच्यात स्वतःला भरडून न घेता त्या दोघींनाच एकमेकींच्या जवळ कसे आणता येईल हे पाहायला हवे. ज्या आईला सतत मुलगा तिच्याजवळ असण्याची- प्रत्येक गोष्ट प्रथम आईला सांगण्याची सवय असते तिला अचानक तो नवरा झालाय म्हणून त्याने एकदम बदलून जावे हे झेपण्यासारखे नसते. आईला हे कळत असतेच की बायको आलीये म्हणजे आता तो तिच्याशी जास्त बोलेल- तिला वेळ देईल. इतके दिवस त्याच्यालेखी सगळे काही मीच होते पण आता तितक्याच जवळचे माणूस मीच त्याच्या सुखासाठी घरात आणलेय तेव्हां तिलाही तितकेच भावनिक महत्त्व त्याच्या मनात असणारच. पण ही कळणारी गोष्ट अंगवळणी पडायला थोडा वेळ द्यायला हवाच ना. सुनेनेही जरा गोड बोलून, सासूबाईंचे मन राखून ( त्यासाठी काही हाँजी हाँजी करायला नको की उगाच ढोंगीपणाची नाटकेही नकोत ) चतुराईने वागले तर हा तिढा बसणारच नाही. दोघींनी त्यांच्या आनंदाचे कारण असलेला माणूस घरात आनंदी कसा राहील हे पाहिले तर तो आईला व बायकोला एकाच वेळी तृप्त ठेवू शकेल. नाहीतर या रोजच्या कटकटीला वैतागून काहीतरी दुसरेच खरे दुःख घरात निर्माण व्हायला वेळ लागणार नाही!

Wednesday, November 4, 2009

वडील व मुलगा.....

एके दिवशी, मुलाने वडलांना विचारले, " बाबा, तुम्ही माझ्याबरोबर मॅरॉथॉन मध्ये धावाल का? "
वडील म्हणाले, " हो ". आणि ते दोघेही पहिली मॅरॉथॉन बरोबर धावले.....

पुन्हां एकदा, मुलाने वडिलांना विचारले, " बाबा, तुम्हाला माझ्याबरोबर मॅरॉथॉनमध्ये धावायला आवडेल? "
वडील म्हणाले, " हो बेटा ".
आणि ते दोघेही पुन्हा एकदा मॅरॉथॉन बरोबर धावले....

एके दिवशी, मुलाने वडिलांना विचारले, " बाबा, तुम्ही माझ्याबरोबर Ironman धावाल का? "

' Ironman ' ही अतिशय कठीण ट्रॅथलॉन-Triathlon आहे.

४ किमी पोहणे
१८० किमी सायकल चालवणे
४२ किमी धावणे..... हे सगळे म्हणजे ट्रॅथलॉन.

वडील म्हणाले, " हो बेटा ". आणि ते दोघेही ' ट्रॅथलॉन ' धावले....

सोबत जोडलेल्या दोन्ही चित्रफी्ती जरूर पाहा म्हणजे या वरवर साध्या भासणाऱ्या गोष्टीमागचे भाव दिसतील... हृदयाला भिडतील.... डोळ्यांवाटे झरतील.... आपल्या मुलाच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी वडील कुठवर जाऊ शकतात. वडिलांच्या या तळमळीला जगासमोर मांडताना अतिशय आर्ततेने गा्यलेल्या या दोन्ही गाण्यांचे बोल, स्वर व संगीत तितकेच भिडणारे आहे.

Rick and Dick Hoyt - The Father and Son





Tuesday, November 3, 2009

भन्नाटच.....

मला विरोपातून काल आले .... भन्नाटच आहे. अतिशय आवडला. टेक्नॉलॉजी सहज होते आहे का हाताळायला जास्ती नाजूक? कोण जाणे, आहे मात्र आकर्षक. दिसायला एकदम मस्तच असला तरी वापरताना जेवढे सोपे तेवढे बरे असे मला वाटते. शिवाय विचार करत होते..... याची किंमत काय असेल बरं? मुळात ही नुसतीच कल्पना आहे की प्रत्यक्षातही उतरणार आहे? कदाचित अजून २५ वर्षांनी......

आधुनिक संगणक :


video

Monday, November 2, 2009

हुशशश........ सुटलो एकदाचे.....

कधी कधी अगदी सहज-सोप्या गोष्टीही कशा त्रास देतात. नाही नाही गोष्टी त्रास देतात म्हणण्यापेक्षा रोजच सहजपणे करणारी एखादी गोष्ट आपण अचानकपणे कशी अवघड करतो. सरळपणे घास तोंडात घालावा ना पण नाही तो उगाचच उलटा-मागून घालायचा प्रयत्न. बरं हे जेव्हां घडायला सुरवात होते तेव्हा दोन मिनिटातच कळत असते की अरे काय मूर्खपणा करतोय आपण. पण मग संचारतो ' हट्टीपणा ' ....... जमत नाही म्हणजे काय. मी करूनच दाखवतो. आणि मग करू पाहणाऱ्याची चाललेली कसरत व पाहणाऱ्याला येणारी गंमत नंतर नंतर अस्वस्थपणा. शेवटी त्या पाहणाऱ्याचा संयम संपतो. " अरे राहू दे, तू थांब. मीच करून टाकतो. हुशशश........ सुटलो एकदाचे, तू - मी- अन आम्हीही. '

( नंबर दोनच्या चित्रफीतीतील घड्याळही काय दाखवते ते पाहा. )

video video