जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, April 13, 2013

अचानक कुठल्याश्या वळणावर भेटलेल्या व्यक्तिमत्वास.........


जखम संपते तिथे शब्द सुरू होतात. शब्द संपले की स्वर साकारतातस्वर नेहमीच धावतात शब्दांपाठी. वेडे अर्थ शोधण्यासाठी. अर्थ गवसताच आरोह-अवरोह ज्ञात होतो....

आणि मग सुरू होतं एक आक्रंदन!


शब्द हरवताना सूर उगवतातमनाच्या सर्व व्यथा, स्वरांच्या एवढ्या समर्थ वैभवातही असतात पराधीन, पोरक्या आणि सर्वस्वी अनाथ

तुला वाचलं आणि मन विषण्ण झालंकाळाच्या गर्तेत जिवानीशी गाडलेले माझे कोवळे स्वर, अचानक थडग्यातून उठलेल्या आत्म्यासारखे माझ्या पुढ्यात उभे राहिलेविजेसारखी लख्ख चमकून गेलीस क्षणभर माझ्या ढगाळ आभाळातअंधाराला विजेचीच जखम व्हावी तसे आतल्या जखमेचे सांकळते रक्त तुझ्या शब्दातून क्षणभरच टपटपले

जशी जशी ओळ येत गेली, तशी तशी तू लिहीत गेलीस. रोजच्या प्रवाहातून काहितरी टिपत गेलीस...

का ही उदासिनता?

का ही अस्वस्थता?

का हा प्रक्षोभ?

का?

स्वतःतच गुरफटलेल्या तुझ्या दूरच्या यातनापथावर माझे डोळे वळण्यासाठी तुझ्या शब्दांची वेदना माझ्यापर्यंत पोचावी लागली. 


नाहीतर,

तुझे दूरस्थ क्षितीज आजवर मी दूरूनच पहात आले होतेतुला स्वर आवडतात असे तूच म्हणालीस
पण हाच का तो सुरांचा लगाव

खर सांगू, 

स्वरांना ओळीत सजवताना थिटी पडलीत तुझ्या प्रारब्धातील अक्षरेस्वतःच्या लेखणीतून वर्षणाऱ्या स्वतःचं समाधान करणाऱ्या आत्मसंतुष्ट काहीशा बटबटीत शब्दांवर सावरीत आहेस तू आपल्या मनाचा पराभूत तोल

तुझ्या लिखाणमध्ये जितकी तू आहेस तितकी कदाचित तुझ्यापाशीही नसशील. तुझ्या शब्दाशब्दांत सांकळलेली तुझी प्रतिमा कदाचित तू ओळखली नसशील, 

कारण

खोल अंतर्यामी धुमसणारी तुझी व्यथा तुझ्या शब्दांनीच शोषून घेतलीयमी हे सांगितलेलं कदाचित तुला आवडणार नाही पण मग 

ही तगमग, ही अस्वस्थता, शाश्वत की अशाश्वत.


कारण सुखाला तसे फार काही लागत नाही....


तगमगत्या कातरवेळी व्याकूळ जीवाला बिलगणारी आवडत्या गीताची लकेर.... 

एका स्नेहळ स्पर्शानं कोंडलेल्या जीवाला फुटणारे आसवांचे पाझर.... 

कुणाच्या आश्वासक डोळ्यांनी दुखऱ्या जीवावर घातलेली मायेची फुंकर... 

सुखाला तसे फार काही लागत नाही

फक्त

ते लाभण्यासाठी उभा जन्म उन्हात घर बांधावे लागतेउन्हात बांधलेलं घर कुणा आगंतुकाची वाट पहात असतं. गीताचे हळवे, लडीवाळ सूर घराच्या गवाक्षातून कधीकधी झिरपत येतातउन्हात बांधलेलं घर टक्क डोळ्यांनी वाट पहात असतं. आसमंताची नीरव शांतता भेदीत मन गाणे गुणगुणू लागतं. घर शांत होतंडोळे मिटून घेतंदुःखालाच मग आपलसं करावे लागतेजगाच्या अरीष्टांपासून दूर ठेवावं लागतेदुःखच फक्त आपलं असतंसरत्या संध्येच्या कातरक्षणी सोबत असते ती फक्त त्याचीच. दुःखालाच मायेने जवळ केलं तर त्याचे काटेरी सल बघता बघता गळून पडतात आणि स्वरांचा गोड सुवास त्याला येऊ लागतोत्या ओतप्रोत गंधांच्या संगतीत आयुष्याची संध्याकाळही कधी उलटून जाते

कारण 

आयुष्य तसं कधीच कुणासाठी थांबत नाही. ते पुढेच जात असतंआपल्या गतीनेगतीला पारखी होतात ती आपलीच पावलं. त्या अडखळत्या, चाचपडत्या पावलांना आयुष्यच ओढून नेते आपल्या मागे. कधी संथपणे, कधी फरपटत, निर्दयपणे खेचत

काळाच्या शर्यतीत मृतात्म्यांना भाग घेता येत नाही

पावलापावलागणिक दमछाक झाली तरी या शर्यतीत धावावेच लागते ते जित्या जीवांनाडोळयातले आसू पुसण्यापूर्वीच इथे तापल्या सळीने डोळे कोरडे होतात. आणि हरवलेली बुबुळे नकळताच स्थिरावू लागतात, सभोवार पाहू लागतात

सोबतीसाठी.... 

संगत मिळते तीही या शर्यतीत रखडणाऱ्याउरी फुटतानाही धावणाऱ्या जीत्या जीवांचीच.


शब्दांच्या वाटेवर तुझे गाव जेव्हां लागले तेव्हां पाय थबकले नाहीत तरी हृदय मात्र थांबलं होतंतुझी व्यथा, तुझी खंत, उभी राहिली माझ्यासमोर मालकंसाच्या अवरोहात उतरणाऱ्या गांधारासारखी....

तुझ्या मुद्रेवरील संवेदनांच्या उदास ओळी वाचल्या तेव्हा गळ्यातील स्वरांच्या ज्योतीसाठी मीही क्षणभर स्थिरावले होते

तुझ्या मनीचे पाखरू काना, मात्रा आणि वेलांट्यात पाय अडकून पडले आहेतुझ्या शब्दांनी तुझ्या व्यथेचे डोळे झाकले असले तरी आवाज नसलेले आंधळे हुंदके मला स्पष्ट एकू येत आहेततुझ्या अबोल डोळ्यांच्या आत किती डोहांचे काळेशार पाणी आतल्याआत हिंदकळते आहे

आत्ताच बोलून घे, पोट उकलून... उद्या कदाचित उशिर होईल.. 

कदाचित उद्या असणारही नाही........



(माझ्यातल्या मलाच......... )