जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, February 12, 2012

कांद्याचे फूल...

आठवतेय तेव्हापासून निरनिराळी झाडं लावतेय. लहान असताना डालडाच्या डब्यात गुलाबाची रोपे, गावठी गुलाबावर विलायती गुलाबाचे रोपण, कलम बांधायचे, डोळे भरायचे. पाचवी ते नववी गुलाबांचे जबर वेड लागलेले मला. सुंदर सुंदर रंगांचे टपोरे गुलाब माझ्या कुंडीत कसे फुलतील यामागेच मी लागलेली. आजोळी गेले की हे वेड बरेचसे पूर्ण होई. तिथे बंगल्याच्या आवारात अनेक प्रकारचे गुलाब मी लावलेले. मी नसताना माळी काळजी घेई. हळूहळू गुलाबावरून गाडी पांढर्‍या सुवासिक फुलांकडे वळली. मोगरा, जाई-जुई, सायली, चमेली, रातराणी, सोनचाफा, अनंत, पारिजात, तगर फुलांनी बाजी मारली. शिवाय अबोली, अनेक रंगांची गुलबक्षी, जास्वंदीही सोबतीला होतीच. पण ही सगळी गॅलरीत असलेल्या फ्लॉवरबेडमधे असायची.

स्वयंपाक घराच्या खिडकीत हाताशी असावी म्हणून कडीपत्ता, मधून मधून धणे पेरणे, मिरच्या, ओवा यांनी जम बसवला. सोबतीला लसूण, कांदाही अधुनमधुन पाहुणे बनून येत. कांदा, लसणीला डालकीत पात फुटली की मातीत रुजवायचा मोह आवरत नाहीच. आपल्या कुंडीत लावलेली लसणीची ओली पात इतकी सुंदर लागते म्हणून सांगू. ओव्याची भजी खाण्याचा कार्यक्रम महिन्यातून एकदा होत असेच. ओव्याची पाने किंचित फुगीर व खरखरीत असतात. या पानांची भजी अप्रतिम लागतात. अहाहा! नुसत्या आठवणीनेही तोंडाला पाणी सुटलेय.

कांदा म्हटला की प्रथम आठवतात त्या डोळ्याला लागणार्‍या धारा। डोळ्यातून पाणी काढणारा कांदा. लेक तर दुसर्‍या खोलीत असला तरी ओरडतो, " आई, डोळे चुरचुरतात. " भजी करू का असे विचारले की लगेच जोरात ’ हो ’ येते. तेव्हा आईचे डोळे वाहिले तरी चालतात. जिभेपुढे कोणाचे काही चालत नाहीच. खेकडा भजीचा कांदा, कांदेनवमीची धमाल. पीठ पेरून केलेली कांद्याची भाजी. आपले अनेक पदार्थ कांद्याशिवाय होतच नाहीत.

लहानपणी अचानक ठसका लागला की, " अगं वर बघ, वर बघ " असे आजी सांगे आणि म्हणे, " ती बघ तुझी सासू कांदे खाई " कोणी जरा अतीच करत असेल तर लगेच ऐकू येते, " नाकाने कांदे सोलू नकोस.. " किंवा " हा बघ अकलेचा कांदा बोलला... " कोणी कुचकटपणा केला की, " कुजका कांदा कुठला.. " हल्लीच भाव गगनाला भिडल्याने चिरताना डोळ्यांना नाही तर खिशाला रडे आणणारा कांदा. शंकर पाटील यांचे " कथा अकलेच्या कांद्याची " हे वगनाट्यही खूप गाजले होते. कांद्याची महती सांगावी तितकी थोडीच आहे.

हल्लीच आईने अश्याच लावलेल्या कांद्याच्या पातीवर अतिशय सुंदर फुल उमलले. इवलेसे ते फूल इतके गोंडस होते. कांद्याची शेती मी पाहिली आहे. पण मी गेले असताना एकदा कांदे काढणी सुरू होती तर एकदा पात डोलत होती. फूल आधी कधीच पाहिले नव्हते. फूल पाहिल्याचा आनंद तेही आपण स्वत: लावलेल्या कांद्याला आलेले पाहून द्विगुणित झाला. वेबकॅमवरुन त्याला पाहिले. त्याचे कौतुक, लाड झाले. बाबांनी त्याला कॅमेर्‍यातही बंदिस्त केले आणि लगेच ते फोटो मला धाडले. प्रत्यक्ष नाही तरी वेबकॅमवरुन का होईना ते गोजिरे फूल पाहिले. तुम्हीही पाहा...


किती इवलेसे आहे नं...

मेथीच्या दाण्याएवढ्या छोटुकल्या कळ्या आहेत या...

देवाने किती मनापासून निर्मिली आहे नं सृष्टी...

Thursday, February 9, 2012

तळ्यात का मळ्यात...

टिकली लावावी म्हणून आरशात डोकावले तिने. तारवटलेले डोळे. वाढत चाललेली काळी वर्तुळे. स्वत:ची म्लान छबी पाहून तिला भडभडून आले. अनावर झालेले कढ आटोकाट दाबत लेकाचे चिमुकले बोट आधारासाठी घट्ट धरत ती घराबाहेर पडली.

रिक्षा.... हाकेसरशी ब्रेक मारत रिक्षा थांबली. तिला-लेकाला घेऊन धावू लागली.
पाळणाघर.... ब्रेक..... लेकाचा पापा... टाटा. रिक्षा भरधाव.
ब्रेक.... स्टेशन. प्लॅटफॉर्म नंबर २. लेडीज स्पेशल.
चक्क खिडकीचा लाभ. एक दीर्घ श्वास... दुसरा... तिसरा.... मन सैरावैरा.
पुन्हा एक दीर्घ श्वास... दुसरा... तिसरा.... गालावर ओल.
’आज हवा पावसाळी झालीये नं... ’ शेजारणीशी सारवासारवी.

ऑफिस.... कामाचा डोंगर. दोन दिवसांनी डिपार्टमेंटल एक्झामचा रिझल्ट.
दिवसभर मार्कांची जुळणी... कोणी एका मार्काने पास तर कोणी नापास.
तळ्यात का मळ्यात...

कललेली दुपार.
ट्रिंग ट्रिंग....
सशाचे कान... काळजात धडधड....
घे... तुझाच आहे गं.
पावलं जडशीळ.... मार मार उडी मार... तळ्यात का मळ्यात... पावलं जडच.
मधल्या रेषेवर कधीच का उभं राहू देत नाही ?

फोन कानाला. खोल विवरातून अंधुकसे हॅलो...
पलीकडून सळसळता उत्साह....
" काय गं! बरी आहेस नं? असं काय मेलेल्या आवाजात हॅलो म्हणते आहेस? बरं ते सोड. ऐक.... "
श्वास बंद... कान बंद.... मन बंद. मधली रेषा. बास...
" अगं ऐकते आहेस नं.... आज संध्याकाळी अशोकची पार्टी आहे. मी येतो वेळेवर. तू जेवायची मात्र थांबू नकोस. कालच्यासारखा उशीर नाही करणार.... प्रॉमिस! बच्चू प्रॉमिस! बाय! "
फोन बंद...
तळ्यात का मळ्यात...

खच्चून भरलेली लोकल. पाठीला पाठ... पोटाला पोट.
मनाला मन चिकटत असतं तर काय काय ऐकू आलं असतं नं!
देव शहाणा आहे. दु:ख वाटता येण्याची सोय त्याने ठेवलेलीच नाही. नो बार्टर सिस्टिम विथ सुखं-दु:खं.
बरंच आहे. कोणाकोणाला वाटणार आणि कोणाकोणाची घेणार...

स्टेशन... भाजी... पाळणाघर... रिक्षा... घर. देवापाशी दिवा. लेकाची गडबड... मऊ वरणभाताचा सुगंध... लेक तृप्त. डोळ्यावर पेंग.

ट्रिंग ट्रिंग..... " अगं मी बोलतोय. जेवलात नं? बच्चू झोपला का? मी निघतोच अर्ध्या तासात. साडेनऊला घरी. "

ती खिडकीत. रोजच्यासारखीच. जीवाची घालमेल.... रोजच्यासारखीच...
एक नजर घड्याळाकडे एक नजर खिडकीतून दिसणार्‍या अंगणाच्या तुकड्याकडे. रोजच्यासारखीच….

साडेदहा... रिक्षा... ब्रेक. नजरेत आशेचे दिवे... खाडखाड वाजणारी पावलं. विझलेली नजर...
तळ्यात का मळ्यात...

एक नजर घड्याळाकडे.... साडेअकरा.... साडेबारा.... सव्वा...
रिक्षा... ब्रेक..... गेटची करकर.... झोकांड्या खाणारी पावलं... हृदयात धडधड....खिडकी बंद.... दार उघडं.

जिन्यात हेलपाटणारे बूट... डोक्यावर ओढलेले पांघरूण... ओघळलेले दोन अश्रू.... सिंधूचं तळं...
कानावर गच्च दाबून धरलेले हात. तरीही फटीतून घुसलेले उलटीचे आवाज... आतडी खरवडून टाकणारे... मागोमाग व्हिवळणारे आवाज... असह्य आवाज...
" चुकलो गं मी. उद्या नाही... उद्या नाही.... "
श्वास बंद... कान बंद.... मन बंद.

ओठावर ओठ घट्ट दाबले तरी बाहेर आलेले शब्द, " एकदाचा मर तरी. तूही सुटशील आणि मीही..."

तारवटलेले डोळे... वाढलेले काळे... बरोबर मधल्या रेषेवर लाल भडक टिकली...
देवाब्राम्हणासमक्ष लावलेली... असोशीने लावलेली... प्रेमाचं प्रतीक... निर्णयाची भीषणता... बच्चूचे भविष्य... लाल भडक टिकली...

उगवत्या दिवसाचा एकच सवाल..... तळ्यात का मळ्यात....?????

Wednesday, February 8, 2012

काबीज...

अहोरात्र ओसंडून वाहत असलेली लोकल तिच्या नसानसातही सकाळ-संध्याकाळ रक्तासोबत समांतर वाहत असे. किती कप्प्यात विभागलो गेलोय आपण. पोळं वाढत चाललंय. आडवंतिडवं फुगत चाललंय. पोळ्यातले काही कप्पे मधानं भरलेले तर काही कोरडेठाक. मुंगीही विन्मुख फिरावी इतके रिकामे! स्वतःचा एक कप्पा. आई-बाबा, तो, पोरं,... दुसरा कप्पा. एक कप्पा घराचा. एक माणसांचा... तिच्या माणसांचा... त्याच्या माणसांचा... कालांतराने आपल्या माणसांचा. एक कप्पा आठवणींचा, तिच्या खास आवडीचा. एक ऑफिसचा. अजून एक या सगळ्याच्या आनुषंगिक फिरणार्‍यांचा. पुढला लोकलचा. नववा.....छे! क्रम चुकतोय ! कितीतरी गोष्टी राहिल्यात... त्यांना मागे नंबर देऊन कसे चालेल. अशी वर्गवारी कठीणच वाटतेय. कधी कुठला नंबर कुरघोडी करेल सांगताच येत नाही. क्षणात हा झुला वरवर तर तो झुला खाली. शांतशांत... थंड. कधी झुल्यांमधे भांडण तर कधी तटस्थता. कधी करकर... तिन्हीसांजेला घुसमटवणारी... वंगण मागणारी.

कामे आटपायची म्हणून रात्री तिंबून ठेवलेल्या कणकेचा गोळा कसा सकाळी फ्रीजमधून काढल्यावर थंड असतो. कितीही घाई असू देत तो त्याचा वेळ घेऊनच उमलेल. उमलल्यावर मात्र कश्या छान गरगरीत फुगलेल्या तीन पदर सुट्या होणार्‍या खरपूस पोळ्यांची रास रचेल. पण थंड असताना, जाम बधायचा नाही. अडेलतट्टू कुठला. माणसंही अशीच. अविरत बरसणारी ! एकदा बरसायला लागली की मुंबईच्या पावसासारखी कोसळतील. उसंत म्हणून मिळू देणार नाहीत.चहुबाजूने पाणीच पाणी! ते अंगावर येणारे प्रेमाचे लोंढे कुठे वाहून नेत ते कळतही नसे. नाहीतर बरेचदा अडलेली. रस्ता बदलणारी आणि एकदा का पांगली की आकाशाकडे नजर लावून डोळे भेगाळले तरी मागमूस दाखवायची नाहीत. आजकाल कसे कोण जाणे सगळेच हट्टी झालेत. कुरघोडी करण्याच्या नादात छाती फुटेस्तोवर धावू लागलेत. गुदमरून गेलो तरी चालेल पण ते जुने लोंढे पुन्हा यायला हवेत. गाभुळलेल्या चिंचा पुन्हा खायला हव्यात. कधी कधी... विचार सुरू होईतोच घराघरातून उगवणारा दिवस गजराच्या पहिल्या टाहोलाच युद्धाची नांदी सुरू करे. रोज एक नवा अध्याय. रंगमंच रोजचाच, नाट्यही रोजचेच. आपण जिवंत आहोत म्हणून हे नाट्य घडतेय की जिवंत राहण्यासाठी आपण घडवतोय, हा प्रश्न कधीचाच निकाली निघालाय.

रोज पहाटे उठायचे. दुधाच्या पिशव्या घ्यायच्या. चहाचे आधण कधी ती ठेवते कधी नवरा. ती पोरांना उठवते, तो दाढी करायला घेतो. मधून मधून पेपर आला का ते पाहतो. कोयंडा रिकामा दिसला की रोज तेच तेच चिडतो. दाढी करता करता गिझर लावतो. ती भरभर भाजी चिरते... कढई तापत ठेवते. सकाळ तापू लागलेली असते. पाहता पाहता सगळे धावू लागतात. त्यांचे आठ हात सपासप तलवारी चालवू लागतात. तिचे अदृश्य आठ हात ढाली घेऊन सोबत असतातच. तासाभरात उदरभरणापासून इस्त्रीच्या कपड्यांपर्यंतची सोय लावून दाराला कुलूप लागते. घर पोरके होते. चौघं चार दिशांना पांगतात. पोरं आधीच मार्गस्थ झालेली असतात. ती आणि तो खाली उतरतात. स्टेशनवर पोचण्यासाठी दहा मिनिटे लागतात. फक्त ती दहा मिनिटे हाच काय तो त्याचा आणि तिचा संवाद. तो बरेचदा मूकपणेच होतो. बोलायचं असतं रे खूप काही पण दहा मिनिटांच्या तालावर कसं व्यक्त व्हायचं..? तेही नेमक्या भावना पोचतील असं. या शोधाशोधीतच ती वेळ पसार होत राहते. रोज रोज ’आय लव्ह यू ’ काय म्हणायचं ? तेही यांत्रिकपणे. तिचा प्रश्न त्याला दिसतो.त्यामागची आर्तता पोचते. तो मान झटकतो. सोड नं! बिटवीन द लाइन्स वाचण्यातली सफाई वाढतेय दिवसेंदिवस. यस्स्स! दहा मिनिटं संपली. जाणवतं तेव्हा तो फास्टट्रॅकवर आणि ती स्लोवर पोचलेली असते.

चला सकाळ मार्गी लागली. एकही घोळ न होता. समाधानाचे हसू कळतनकळत ओठावर येते तोच लोकल येते. भरभर ओढणीला गाठ बसते. ओढणीसोबत शेपटा पुढे येतो, मंगळसूत्र चाचपून आत असल्याची खात्री होते. शेपट्यावर पर्स डाव्या हाताने ओढून छातीशी घट्ट धरलेली. उजवा हात अचूक दाराचे हॅंडल पकडतो. ट्रेन अजून धावतेय.... गती मंदावलीय... पण थांबली नाहीये. आठदहा जणींनी तोवर स्वत:च्या गतीला त्या अचल प्लॅटफॉर्मवर झोकून देत बिनचूक पाय टेकवलेला... शरीराचे पीस चार पावले धावून शरीराचा तोल तोलता येईल इतपत आटोक्यात आल्याक्षणाला तटकन थांबून मारलेली गिरकी. क्षणार्धात रिकामा ब्रिज चढणारी त्यांची पावले. क्रिया रोजचीच. नेमकी... अचूक. त्या रिकाम्या ब्रिजवरून पसार होण्यासाठी केलेला दहा सेकंदाचा खेळ. किती प्रचंड मने हा खेळ रोज सकाळ संध्याकाळ खेळतात. माझीही भर आहेच की त्यात. अनेक अनेक गोष्टी आपण किती सहजपणे रोज रोज करत असतो. इतक्या अंगवळणी पडल्यात त्या की त्यातली छुपी संकटं दिसतच नाहीत. इस पार या उस पार! यातले इस पारच घडणार हे गृहीत! त्या एका ब्रिजसाठी आपण काय काय पणाला लावतोय हा विचार प्लॅटफॉर्मला टेकलेल्या पहिल्या पावलालाही नसतो. आणि मस्टरवर आजचा दिवसाची मोहर उठवून, दिवस सार्थकी लागला असे म्हणत घेतलेल्या चहाच्या घोटासोबतही नसतो. नियती हसत असते. रोज संधी देत राहते. संधी संपलेले जीव दाखवत राहते. आपले डोळे मिटलेलेच. पुन्हा संध्याकाळ होते. मन कधीच घरच्या रस्त्याला लागलेले असते. पावले मनाला गाठण्यासाठी धावत सुटतात. गाडी स्टेशनात शिरते... ब्रिज समोर दिसू लागतो... अचूक टेकलेले पाय... नेमकी गिरकी... रिकामा ब्रिज... काबीज!

आज प्रथमच मनात चलबिचल झाली. गाडी स्टेशनात शिरली. ब्रिज दिसू लागला. उतरणार्‍या बायकांची घाई दरवाज्यात लटकलेल्यांना रेटू लागली. तीन चतुर्थांश शरीर बाहेर आणि एक पाय डब्याशी अजूनही नाते सांगू पाहणार्‍या पायावरचा भार वाढू लागला. एरवी फक्त पोपटाचा डोळा पाहणार्‍या मनात धडधड वाढलेली. नको... नको..... मन शरीराला मागे खेचू लागले... सुरक्षित करू पाहू लागले. रेटा वाढू लागला. पाय अजूनही खिंड लढवत होता. तोवर दोनचार जणी उतरून गेल्याही होत्या. मागच्या गोंधळल्या. कोणीतरी ओरडले," इतना डर लगता हैं तो कायको खडा रहने का? ढकल रे उसको... न जाने कहां कहां सें आ जाते है गर्दी के टाईमपें." गाडी थांबली. रेटा इतका वाढला की ती पडता पडता वाचली. तिच्या अचानक अडेलतट्टू बनण्याने अजून दोघी तिघी पडता पडता वाचल्या. त्यांच्या संतापाच्या नजरा झेलत तिने ब्रिजकडे नजर टाकली. डोक्याला डोकं लागलेलं. आता या भाऊगर्दीतून वाट काढणं आलं. शेवटी गड सर व्हायलाच हवा. तसा नाही तर असातरी ! थांबून चालणारच नाही. निदान जीव आहे तोवर तरी. उद्या सकाळी पुन्हा नवा अध्याय.

तीच सकाळ, तेच कुलूप, तिच दहा मिनिटे, लोकल.... ब्रिज..... आज नो चलबिचल. लोकलची गती... पावलांची गती... गतीचा तोल... टेकलेला पाय... कंट्रोल... काबीज! कंट्रोल आजतरी तिच्या हाती. उद्याचे उद्या पाहू. नाहीतर नियती पाहून घेईल. असेही तिला दुसरे कामच काय... !!

Monday, February 6, 2012

पनीर वडे ( पकोडे )

वाढणी : चार माणसांकरिता

लागणारा वेळ : ४० मिनिटे

साहित्य

अर्धा कीलो पनीर ( शक्य तितके घट्ट असावे )
दोन पेर आले, दहा-बारा लसूण पाकळ्या, दहा-बारा तिखट हिरव्या मिरच्या
मूठभर कोथिंबीर
दिड वाटी बेसन, दोन चमचे तांदुळाची पिठी
एक चमचा हिंग, हळद, दोन चमचे तिखट
चवीनुसार मीठ व तळण्यासाठी तेल

कृती

पनीर कुस्करुन घ्यावे. बारीक भगरा होईल इतपत मोडावे. आले-लसूण हिरवी मिरची वाटून घेऊन पनीरमध्ये घालावी. स्वादानुसार मीठ व कोथिंबीर घालून हे सगळे मिश्रण हलक्या हाताने एकत्र करावे. सगळीकडे वाटण नीट लागले आहे असे वाटल्यावर मध्यम आकाराचे गोळे वळून घ्यावेत.



एका पातेल्यात बेसन व तांदुळाची पिठी घ्यावी. त्यात हिंग, हळद, तिखट व मीठ घालून हळूहळू पाणी घालत एकसंध मिश्रण तयार करावे. खूप घट्ट नको व खूप सैल नको. बटाटेवड्यांसाठी करतो तितपतच. मिश्रण एकाच दिशेने पाच मिनिटे फेटावे म्हणजे थोडे हलके होईल.

मध्यम मोठ्या आचेवर कढईत वडे बुडतील इतपत तेल घ्यावे. तेल चांगले तापल्यावर बेसनाच्या पिठात पनीरचे गोळे बुडवून सोनेरी आचेवर तळावेत. गरम गरम खायला द्यावेत.


टीपा

पनीर घेताना शक्य तितके घट्ट घ्यावे. घरी करून वापरणार असल्यास संपूर्ण पाणी काढून टाकावे. पनीरमध्ये जास्त ओलसरपणा असल्यास गोळे नीट बांधले जात नाहीत खातानाही जरा पानचट लागते.

मिरच्या आपल्याला झेपतील तितक्या वाढवाव्यात. पनीर तसे गोडसरच असते. शिवाय इतर कुठलाही मसाला यात घालायचा नसल्याने तिखटपणा/तिखट स्वाद फक्त मिरच्यांचाच. थोडे तिखटच जास्त छान लागतात.
तांदुळाच्या पिठीमुळे वड्यांचे आवरण कुरकुरीत होते.

खायला देताना सोबत काहीही दिले नाही तरी चालेल. खरं तर गरजच पडत नाही. म्हणूनच वर चटणी-सॉस वगैरे लिहिलेच नाहीये.

पार्टीसाठी हिट पदार्थ आहे आणि खूपच झटपट होणारा. आदल्या दिवशी पनीरचे गोळे वळून ठेवून आयत्यावेळी तळता येतील.