जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, December 30, 2010

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

चैतन्य+संकल्प+विश्वास+मनोबल+पूर्तता+समाधान+आनंद=२०११

Tuesday, December 28, 2010

चोरावर मोर... एकदा, दोनदा, तीनदा... चालूच...

थँक्स गिव्हिंगची धूम संपतानाच नाताळची नांदी होते. हॅलोवीनच्या भूतधुमाळी पासूनच नाताळच्या बेतांची आखणी सुरू होते. कोणी क्रूजला तर कोणी थंडीपासून काही दिवस तरी दूर पळण्यासाठी हवाई, कॅलिफोर्निया गाठायचे ठरवते. सगळीकडे उत्साहाचे, अगदी आपल्या दिवाळीची आठवण करून देणारे वातावरण. व्हाईट ख्रिसमसचे इथे फारच वेड दिसून येते. खरे तर साचलेल्या बर्फाच्या ढिगांमुळे कामांमध्ये श्रमामध्येही बरीच वाढ होते. ड्राइव्ह वे, वॉक वे कितीही स्नो पडला आणि कितीही वेडी थंडी झाली तरी स्वच्छ करावेच लागतात. ढिगारे उपसून उपसून मान, कंबर, हात पाय आणि डोके पूर्णपणे कामातून जाते. मग पाठोपाठ सर्दी, अंगदुखी आलीच. बरे हे उपसणे प्रकरण काही एक दोन वेळा करून संपत नसल्याने ही आवर्तने सुरूच राहतात. घरातल्या सगळ्यांनी आळीपाळीने मोहीम हातात घेतली तरी फत्ते होईतो सगळे गडी गारद होतातच. अशातच नाताळ पूर्व संध्येच्या पार्टीची जोरदार आखणी त्याबरहुकूम ती घडावी म्हणून धावाधाव सुरू होते. मेन्यू, टेबल सजावट, घराची सजावट, रोषणाई. गिफ्ट्स आणायला जाणे हाही एक मोठ्ठा उद्योगच. शिवाय ती गावोगावी राहणाऱ्या नातेवाईक, मित्रमैत्रिणींना पाठवणे हाही एक व्यापच, तरीही सगळे आवर्जून करतात. कौतुक वाटते. ( हा व्याप पोस्टाने यावेळी बराच सुसह्य केल्याने लोकं थोडीशी निवांत खूश झालेली )

या सगळ्या सणांबरोबरच ऑक्टोपासून नवीन वर्षांची सुरवात होईतो टीव्ही वरील सिनेमे, धारावाहिक हेही सारखे आपला सूर बदलत राहतात. भुताखेतांपासून ते देवदूतापर्यंत. एकदा का थँक्स गिव्हिंग संपले की नाताळचे काउंट डाउन सुरू होते. मग काय कुठल्याही चॅनलवर जा काहीतरी खूपच भारलेले, छान छान शेवट असणाऱ्या सिनेमांची स्पर्धा लागते. देवदूत तर जणू प्रत्येक कोपऱ्याकोपऱ्यात दबाच धरून बसलेले असतात. दुःखी, गांजलेली, हताश झालेली बिचारी लोकं दिसली ( आता या वर्गवारीचे निकष देवदूतांनाही लावताना किती कटकट होत असेल ना .... ) की लगेच जादूची छडी घेऊन हे हजर झालेच समजा. इतकी वर्षे मी वाट पाहतेय पण... , तरी मागच्या जन्मी अगदी आठवणीने कमीतकमी पाप्ं केलीत. पुढचा जन्म कसलाही असू दे पण देवदूत भेटायलाच हवा. कसचे काय तो मेला नेमका मलाच वगळून पुढे जातो.

जवळपास महिनाभर या देवदूतांचा अनुल्लेख सोसून शेवटी मी बंडाचा झेंडा फडकवला. खसकन टीव्हीचा रिमोट ओढला आणि खटाखट चॅनलची कत्तल सुरू केली. नुसता ख्रिसमस, एंजल्स, फन, आनंद यासारखे शब्द पूर्ण वाचून होण्याआधीच चॅनलचा गळा घोटू लागले. बिचारे चॅनल्सही कधीकधी माझ्या या नवीन रूपाने दचकू लागलेले मला स्पष्ट दिसत होते. हॅलोवीनची कुठलीशी द्वाड, हट्टी भूताळी चुकून हीच्या अंगात घुसली की काय! पण, हाय रे दैवा! चॅनल्सनि जागोजागी तेचतेच गुडीगुडी सिनेमे दाखवण्याचा चंगच बांधलेला. ते ही हट्टाला पेटलेले आणि मीही. असे करता करता नाताळच्या पूर्व संध्येला माझ्या खाटीकगीरीने कळस गाठलेला होता. अचानक एका नावावर बुबुळे स्थिरावली. अदमास घ्यावा म्हणून दोन ओळीतल्या सारावर नजर टाकली आणि लखकन आकाश चिरणारी वीज चमकली मागोमाग जोरदार गडगडाट करत चारीबाजूने आवाज आदळू लागला. नक्की तोच सिनेमा. लाव लाव. हा सूर्य आणि हा जयद्रथ होऊनच जाऊदे आज.

सुदैवाने सिनेमा नुकताच सुरू झाला होता. ' मेक वे फॉर टुमारो '. १९३७ साली आलेला. जवळपास विस्मरणातच गेलेला. लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झालेले ल्यूसी व बार्क हे जोडपे अतिशय आनंदात आपल्या लांब परंतु संपर्कात असलेल्या मुलांसमवेत आनंदात जगत असते. मुले मोठी होऊन मार्गस्थ झालेली असतात. अशातच घराचे हप्ते भरणे शक्य झाल्याने त्यांचे राहते घर बँक जप्त करते. मुलांना हे ऐकून खूप वाईट वाटते पण आता आईबाबांचे पुढे काय करायचे हा मोठ्ठा प्रश्न उभा राहतो. चार मुले तशी जवळजवळच असतात. एक जण कॅलिफोर्नियामध्ये जातो तो फारसा संपर्कात राहत नाही. चारही मुलांकडे आई वडील दोघांनाही सामावून घेईल इतकी जागा नसते. सरतेशेवटी आईने एकाकडे बाबांनी एकीकडे असे एकमेकांपासून वेगळे राहायचे असा निर्णय घेतला जातो. त्यांच्या स्वतःच्या घरातील एकमेकांच्या सोबत घालवलेली ती शेवटची रात्र.

या सुरवातीतच तीन-चार ठिणग्या आणि त्यांनी वेगवेगळी मांडलेली चूल मला दिसू लागली. ' ऊन-पाऊस', राजा परांजपे +सुमती गुप्ते, संजीव माला सिन्हाचा ' जिंदगी ' ( अजून मला माझे सुजून भप्प झालेले डोळे आठवतात... ), राजेश खन्ना+शबानाचा ' अवतार ' ( हा सिनेमा मला काय की फारसा रुचलाच नाही. ठराविक सिनेमे वगळता राजेश खन्ना मला कधीच आवडला नाही म्हणून असेल कदाचित ) आणि सरतेशेवटी आलेला ' बागबान '. खूपच लहान असताना ' जिंदगीपाहिलेला. मनात घर करून गेलेला. हॉलिवूडच्या सिनेमावरून बॉलीवूड मध्ये सिनेमा बनवतात हेच मुळी माहीत नव्हते. त्यातून आजूबाजूला काही घरांतून हे चित्र दिसू लागले होते. ' घर घर की कहानी ' च्या बलराज सहानीचा पगडा होताच तशात भर पडली ती जिंदगीच्या संजीवकुमारची.

जसजशी नको ती अक्कल वाढू लागली तशी काही गरजेच्या बऱ्याचशा नको त्या गोष्टी डोक्याचा भुगा करू लागल्या. त्यांतलीच एक ही सिनेमांची चोरी. मग काय अगदी, ’ दो आंखे बारा हाथ पासून जी पडापडीला सुरवात झाली ती पार गजनीपोत्तर ’. मात्र या गोंधळातहीबागबानहा आपल्याच घरी आपणच केलेल्या चोरीत मोडत होता. ( परवापर्यंत तरी ) एक तर अमिताभ बच्चन हेमामालिनीचीही मी चाहती. तशात त्यांची एकमेकातली केमिस्ट्री, गाणी यांचा सतत मारा होऊन होऊन, जिंदगी, अवतारची आठवण देणारा बागबान मी मन लावून पाहिला. ( एकदाच मन लावून नंतर बरेचदा अर्धा, कधीही कुठूनही सुरू होऊन संपेस्तोवर.... कारण नंतर रिमोटच गायब होऊ लागलेले... नाईलाज को क्या विलाज... ) हेमा वयाच्या मानाने किती सुंदर दिसते, तिच्या साड्या, अमिताभचे काम आणि आनुषंगिक सगळेच पूरक. हा भोपळा, ’ मेक वे फॉर टुमारोपाहताना अक्षरशः शकले शकले होऊन फुटला.

मेक वे, मधली ल्युसी ( Beulah Bondi ) मुलाकडे आल्यावर नातीच्या बरोबर नातीच्या खोलीत राहते. वयात येत असलेल्या नातीला ही सोय आवडत नाही पण तिला आजीबद्दल आपुलकी असते. सून पैसे मिळवण्यासाठी ब्रिजचे क्लासेस घेत असते. आजीला तिचे त्यातच गुंतलेपण घराकडे होणारे दुर्लक्ष आवडत नसते. ती लक्ष देत नाहीये म्हणून आपल्याकडून होईल ती मदत करायला आजी सारखी धडपडते. एकलकोंड्यासारखे एका कोपऱ्यात बसून राहणे तिला सहन होत नसल्याने ब्रिजचे क्लासेस सुरू असताना ती आरामखुर्चीत बसून झुलत राहते. त्या खुर्चीचा कुईकुई आवाज.... आजीचा ब्रिज शिकायला आलेल्या लोकांशी संवाद साधायचा प्रयत्न. त्यातच आलेला बार्कचा फोन. आजीचा पन्नास वर्षांच्या सहवासानंतर दूरावलेल्या बार्कबरोबरचा संवाद.... मनाला स्पर्शून जातो. सुनेची नातीची आपसातली चाललेली आजीची टोलवाटोलवी. नात आजीला घेऊन सिनेमाला जाते, तिथे तिला एके ठिकाणी बसवून स्वतः मैत्रिणींबरोबर बसते आहे असे भासवून नात गायब होते. सिनेमा संपून जातो. आजी बाहेर येऊन नातीची वाट पाहत उभी राहते. कोणा मुलाच्या गाडीतून नात उतरताना पाहते. नातीला नंतर हे सांगतेही. या मुलाबद्दल आजीच्या मनात थोडे जास्तच प्रेम असते. अचानक एके दिवशी तिला कळते की काही दिवसातच आपली रवानगी वृद्धाश्रमात होणार आहे. त्याला वाईट वाटू नये म्हणून तो काही सांगण्या आधीच आजीच त्याला वृद्धाश्रमातल्या फायद्यांबद्दल सांगून मला तिथे पाठव म्हणते. आईचा मुलाला त्रास होऊ नयेचा खटाटोप आणि मुलाचे ते उमजून असहायतेमुळे नाईलाज होऊन स्वत:लाच मनोमन दोष लावत आईला मीठी मारणे. प्रसंग जराही ओव्हर करता नेमक्या भावना पोहोचवतो.

इकडे बार्क ( Victor Moore ) न्यूयॉर्कमधील मुलीकडे पाठवले जातात. जागेच्या कमतरतेमुळे त्यांना हॉलमध्ये झोपवले जाते. आयुष्यभर कारकुनी केलेले वडील पुन्हा एकदा नोकरी शोधू लागतात. तशातच त्यांची चहा-कॉफी, थोडे जुजबी सामान इत्यादी ठेवणाऱ्या दुकानदाराशी गट्टी जमते. ( हा आपला परेश रावल ) मग एक आजीआजोबांचा फोन संवाद होतो. आजोबांना सर्दी झालेली असते. आजी सारखी काळजी व्यक्त करते, थोडीशी रागे भरते. मग एक आजीचे पत्रवाचनाचा सीन होतो. आजोबांचा चष्मा फुटलेला असतो. आजोबा दुकानदाराला पत्र वाचून दाखवायला सांगतात. तो बरेचसे वाचतो आणि मग एका ठिकाणी थांबतो आणि आजोबांना म्हणतो की तुमचा चष्मा आला की पुढचे तुम्हीच वाचा. आजोबा निघून गेल्यावर स्वतःच्या बायकोला हाक मारून म्हणतो, " मला तुला पाहायचे होते गं . " ( कंट्रोल सी कंट्रोल वि ... माझी चिडचिड सुरु... )

आजोबा सर्दीने पछाडले जातात. आजोबांच्या काळजीने आजीच्या जीवाची घालमेल सुरू होते. मुलगा सून तिला दिलासा देत राहतात. तशातच नात रात्रभर घरी येत नाही. आजी सुनेला सिनेमागृहात घडलेली घटना सांगते स्वतःला दोष लावते. सून वैतागते आणि म्हणते तुम्ही हे मला तेव्हांच सांगायला हवे होते. नवऱ्याशी भुणभूण लावते की आधी मुलीने असे कधीच केले नव्हते. पण आजी आल्यामुळे ती आपल्या मित्रमैत्रिणींना घरी आणत नाही. इकडे मुलगी डॉक्टरला बोलावते. डॉक्टर येण्या आधी घाईने वडिलांना बेडरूममध्ये झोपवते. डॉक येतो त्यानंतरचा सगळा सिनंच फारच गमतीशीर घेतला आहे.

शेवटी आजीची वृद्धाश्रमात रवानगी जोवर थंडीचा मोसम संपत नाही तोवर आजोबांनी कॅलिफोर्नियात राहायचे असे ठरते. आजी मुलाला सांगते की कुठल्याही परिस्थितीत आजोबांना मी वृद्धाश्रमात राहायला जाणार आहे हे कळता नये. पन्नास वर्षांच्या लग्नाच्या कालखंडातले हे एकमेव सत्य त्यांच्यापासून मला लपवायचे आहे. वडील कॅलिफोर्नियाला जाण्याआधीचा एक दिवस आजी-आजोबांची भेट ठरते. ठरल्याप्रमाणे दोघे भेटतात. मग त्यांच्या आठवणीत काळ पन्नास वर्षे मागे जातो. तो गाडीचा प्रसंग घडतो. सेल्समन त्यांना छानपैकी फिरवून आणतो. गाडी आवडल्याचे पाहून मग काय विचार आहे असे म्हणतो. आजी-आजोबा तेच उत्तर देतात. त्यावर तो वैताग दाखवता हसून मी ही तुम्हाला अशीच सफर घडवल्याचे म्हणतो. पुढे ते हनीमूनच्या त्याच हॉटेल मध्ये जातात. त्याचा मालक त्याला हे कळल्यावर येऊन अगत्याने बोलतो ड्रिंक्स ऑन हॉउस म्हणून सांगतो. मग आजोबांचे आजीला घे गं तू ही म्हणून आग्रह करणे, आजीचे, ' काहीतरीच हं का तुमचे म्हणून, तिचे लाजणे. मग आजोबांनी आजूबाजूला ड्रिंक्स घेणाऱ्या बायका दाखवल्यावर लाजत लाजत होकार देणे. आजोबांची आठवणीतली वाराची गल्लत आणि आजीची कसे तुम्ही चुकताय सारखे हे दाखवणे. पुढे डान्स सुरू असलेला पाहून आजोबांचे आजीला आग्रह करणे. पण नवीन लोकांसारखे नाचता आल्याने गडबडून जाणे. नेमके हे बँडवाल्याने टिपणे आजीआजोबांच्या काळातली त्यांची चिरपरीचीत धून वाजवणे. या सारखे छोटे छोटे प्रसंग अतिशय साधेसुधे दाखवलेत.

आजीआजोबा जेवायला येणार असतात परंतु ते आल्याने इकडे मुलांची बैचेनी. आजोबांच्या ट्रेनची वेळ जवळ येत चाललेली. ती चुकतेय की काय ही भीती तर एकीकडे आईबाबांची होणारी ताटातूट मुलांना कुरतडत असते. आजोबा फोन करून सांगून टाकतात की आम्ही जेवायला येणार नाही आहोत. आजीआजोबा तो संपूर्ण दिवस स्वत: रममाण होऊन आनंदाने घालवतात. जुन्या आठवणी काढत जीवनाचे वास्तव स्विकारतात. शेवटी ठरल्याप्रमाणे आजोबा ट्रेनने कॅलिफोर्नियाला रवाना होतात आजी प्लॅटफॉर्मवर हात हालवत उभी असते आणि सिनेमा संपतो. सिनेमा पाहताना कुठेही मेलोड्रामा, भडकपणा, अतिरंजित प्रकार दिसत नाहीत. सगळ्या मुलांना आईबाबांबद्दल प्रेम असते. कुठेही कोणीही मुद्दामहून वाईट वागताना दाखवलेले नाही. १९३७ साली, त्यावेळी ओढवलेल्या जागतिक मंदीच्या काळात आलेल्या या सिनेमात डायरेक्टर Leo McCarey यांनी अप्रतिमरित्या हाताळलेला सिनेमा. अतिशय संयमाने कुठेही आक्रस्ताळेपणा करता कथानक पुढे सरकत राहते. आजीआजोबांचे आपसातले प्रेम-एकमेकांप्रती आदर ठायीठायी सहजपणे दिसून येतो. Beulah Bondi Victor Morre यांचा अभिनय खासच आहे. हे दोघेही खरेखुरे आजीआजोबा वाटतात. शेवटही गोडगोड केलेला नाही. वास्तवात जे घडण्याची शक्यता जास्त तेच दाखवले आहे. इतका जुना कृष्णधवल सिनेमा पाहताना ( आधीच्या चार चार ठिणग्या पाहून ही ... ) आपण गुंतून जातो. या सामाजिक समस्येची जाणीव खोलवर होते. बागबान सारखी अतिरंजित, आचरटपणाची छाप उमटत नाही.

रवी चोप्राने मुळातच अमिताभहेमाचे स्वतःचे घर दाखवून परतीचा मार्ग खुला करून ठेवला. तश्यांत अनाथ सलमानचे ठिगळही जोडून ठेवलेय. ही अशी अचलुन आणलेली मुलेच खाल्लेल्या मीठाला का जागतात? मुलांनाही सुरवातीपासूनच खलनायकी चेहरा देऊन टाकला. गाडीच्या प्रसंगात अपमान आणि सलमानच तिथला मालक असणे त्याची ड्रामॆटिक रिऎक्शन, हॉटेलमध्ये एकदम जंगी खातिरदारी - लगेच महाल काय सूट्स काय... इतकं पण कैच्याकै दाखवायचं म्हणजे.... :( . हेमाचे नातीच्या अंगचटीस जाणाऱ्या पोराच्या कानाखाली आवाज काढणे, लेकाला वाढदिवसाच्या दिवशी डबा घेऊन त्याच्या ऑफिसात जाणे, एखाद्या नवथर अल्लड तरुणीप्रमाणे फोनची, पत्राची वाट पाहणे. आरामखुर्चीत बसून झुलणे, अमिताभच्या हाताची उशी करणे, सरतेशेवटी लेखक नसलेल्या अमिताभने दुखडा लिहिणे आणि त्याला बुकर ऎवॉर्ड मिळणे ते पुस्तक हातोहात खपणे, पुढे सन्मान वगैरे वगैरे चा प्रवास अक्षरशः मेलो मेलो चा अतिरेक होऊन कहर करत सहनशक्ती गारद करतो. भीक नको पण या चोप्राला आवर म्हणायची पाळी आणतो. अजून किती वेळा रिमेक बनवणार... बस करा यार आता.

या सगळ्या मोरांच्या पार्श्वभूमीवर अचानक हाती लागलेला, ’ मेक वे फॉर टुमारोजरूर जरूर पाहण्यासारखाच आहे.

Sunday, December 19, 2010

कुपनपुस्तिका, मुले... काल आणि आज...

रविवारची संध्याकाळ कलत आलेली. बिल्डिंगच्या चौकात खेळणारी लहान मुले आता लवकरच आईच्या-बाबाच्या हाका येतीलच या होर्‍याने अजूनच जोर चढून ओरडाआरडा करत पकडापकडी खेळत होती. खिडकीत उभे राहून मी गुंगून त्यांचा खेळ पाहत होते. नकळत त्या मुलांच्यात ओरडत इकडून तिकडे पळणारा, खदखदून हसणारा शोमू मला दिसत होता. मी वर उभी आहे हे लक्षात येताच पळतापळता मान वर करत माझ्याकडे पाहून हात हालवून पुन्हा खेळात रममाण होणारा, क्रिकेट खेळताना स्वत: एकाच जागी उभा राहून ओरडून ओरडून मित्रांना धावडवणारा, तळातल्या आजींकडे जाऊन हक्काने पाणी व गोळ्या मागणारा.... कालचक्र मनाने भराभर उलटे फिरवायला सुरवात केलेली. तेवढ्यात बेल वाजली. तंद्री भंगली. खाली पाहिले तर खेळून दमलेली मुले- मुली बेंचवर, पायर्‍यापायर्‍यांवर कोंडाळे करून बसून गप्पा मारू लागलेली. कोण बरं आलंय असे म्हणतच मी दार उघडले तर एक दहाअकरा वर्षांची मुलगी चेहर्‍यावर गोड हसू व हातात एक वही घेऊन उभी.

"काय गं? तुला यशदा हवी आहे का? चुकून माझी बेल दाबलीस का? "

" नाही नाही. काकू, यश आणि मी बरोबरच वरती आलो. मी ना तुमच्याकडेच आलेय. "

" नाव काय गं तुझे? कोणाची तू? " मी तिला ओळखलेच नव्हते. गेली अकरा वर्षे मी सलग तिथे राहत नसल्याने बरेच नवीन चेहरे मला प्रत्येकवेळी दिसतच.

तिने तिचे नाव सांगितले. थोडे बोलून हातातली वही पुढे करून म्हणाली, " काकू, आमच्या शाळेतून ना अंधमुलांना मदत यासाठी डोनेशन जमा करायला सांगितलेय. जो जास्त डोनेशन जमवेल त्याला सर्टिफिकेट व दोन पुस्तके बक्षीस मिळणार आहेत. तुम्ही मदत कराल? "

" हो तर. दे बरं तुझी वही इकडे. " असे म्हणत मी तिच्याकडून वही घेतली. एका पानावर नीटपणे भाग पाडून सुवाच्य अक्षरात सुरवात केलेली होती. मी एक एक नाव वाचत होते. त्यापुढे दिलेले डोनेशनही वाचत होते. ५०/ १०० याशिवाय आकडे दिसतच नव्हते. क्वचित २५ चा आकडा दिसत होता. जवळ जवळ ३४-३५ नावे होती. तिच्याजवळच्या पर्समध्ये खूप पैसे जमलेले दिसत होते. माझे नाव लिहून पैसे तिच्या हातात ठेवले. ती खूश झाली. पैसे मोजून घेऊन तिने पर्समध्ये ठेवले व मला थँक्स म्हणून ती दोन पायर्‍या उतरली.

न राहवून मी तिला म्हटले, " सांभाळून जा गं. बरेच पैसे जमलेत बरं का तुझ्याकडे. सरळ घरीच जा आता. का येऊ तुला तुझ्या बिल्डिंगपाशी सोडायला. "
" नको काकू. मी जाईन नीट. " असे म्हणून उड्या मारतच ती खाली उतरली.

खिडकीतून तिला जाताना पाहत होते.... मन नकळत पुन्हा मागे गेले. माध्यमिक शाळेत नुकतेच पाऊल ठेवलेले. उगाचच कुठेतरी आपण मोठे झालोतची भावना. तिसरीतल्या भावाला बोटाशी धरून बसने एकटीनेच जाण्याची जबाबदारी. तसं पाहू गेल्या चौथी व पाचवीत फारसे काहीच बदललेले नसते. पण बालमनाचे गणित वेगळेच.

आमच्या लाडक्या देसाईबाई वह्यांचा भारा एका हाताने लीलया सांभाळत वर्गात शिरल्या. ती अशी वर्षे होती जीवनातील की, ' बाई - सर' ही दैवतं होती. त्यांच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य. कित्येकदा मी आईलाही म्हणे, " हॆं, काय गं तुला इतकेही कसे माहीत नाही. आमच्या देसाईबाईनां या जगात घडणारी प्रत्येक गोष्ट खडानखडा माहीत असते. " आई गालातल्या गालात हसे व म्हणे, " खरंच की. तुझ्या देसाईबाईंनी सांगितले की सूर्य उत्तरेला उगवतो तर तुम्ही मुले त्यालाही होच म्हणाल. " असे काहीच्याकाही आई बोलली ना की मला फार राग येई. नाकाचा शेंडा लाललाल होऊन जाई. " हो, हो. म्हणेनच जा मी. आणि बरं का, सूर्य उत्तरेलाच उगवलेला असेल बघ त्यादिवशी. " देसाईबाईंविषयी काहीही ऐकून घेण्याची माझी बिलकुल तयारीच नसे.

बाईंनी टेबलावर वह्यांचा भारा ठेवला. बाईंना कधीही, " अरे आता शांत बसा. लक्ष द्या इकडे... " वगैरे प्रकार करावेच लागत नसत. आम्ही सगळी मुले त्यांच्या वलयांकित व्यक्तिमत्त्वाने भारावून जात असू. डोळे, कान,चित्त सारे एकवटलेले. बाईंनी बोलायला सुरवात केली, " दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी आपण तलासरीच्या आश्रमासाठी पैसे गोळा करणार आहोत बरं का. तुमचे तर हे पहिलेच वर्ष आहे. आता तुम्ही थोडेसे मोठे झाला आहात. तेव्हां थोडं जबाबदारीने - समंजसपणे वागायला शिकणार ना? " सगळ्यांचे एका सुरातले, " हो.. " " छान. मग आता ही मी कुपनांची पुस्तके आणलीत. प्रत्येकाने यातली दोन,तीन किंवा चार पुस्तके घ्या. जो जास्तीत जास्त कुपने खपवेल त्याला 'श्यामची आई' पुस्तक बक्षीस म्हणून दिले जाईल. आई बाबांना छळायचे नाही हं का मात्र. " सगळी मुले बाईंच्या भोवती जमली. त्यात मी ही होतेच. उत्साहाने चार कुपन पुस्तिका मी मागून घेतल्या. दहा-वीस-पंचवीस व एक रुपयाचे. तीन इंच बाय दोन इंच अशी छोटीशी पातळ कागदाची, गडद गुलाबी रंगाची कुपन पुस्तिका होती एका रुपयाची. पंचविसाचा रंग फिकट निळा, विसाचा फिकट हिरवा व दहा पैशाचे लिंबूटिंबू.

संध्याकाळी उत्साहाने चिवचिवत आईला पुस्तके दाखवली आणि मागोमाग कोणाकडून किती किती पैसे मी मिळवून आणेनची यादीही तिला ऐकवली. आईने शांतपणे सारे ऐकून घेऊन हातात एक छोटीशी पर्स देऊन गाल कुरवाळून जा म्हणाली. आमच्या चाळीत घाटीमामांच्या दोन खोल्या होत्या. त्यातली एक तर आमच्या शेजारीच होती. माझ्या मनाने कधीचाच हिशोबही करून टाकलेला. वीस व पंचवीस चे पुस्तक तर आजच संपून जाईल ही खात्रीच होती मुळी. माझे नेहमीच लाड करणारे काका-मामा-मावश्या, मी नुसते पुस्तक पुढे करायचा अवकाश लगेच ते कुपन फाडतील आणि माझ्या पर्समध्ये नाणी येऊन विसावतील. पण कसचे काय. भरवशाच्या म्हशीला टोणगा तशातलीच गत झालेली. बालमनाला व्यवहारी गणित कुठले उमगायला. दोन तास फिरून फक्त तीनच कुपने फाडली गेली तीही दहा पैशाची. हिरमुसली होऊन दमून मी घरी आले. माझा चेहरा व डोळ्यातले पाणी पाहून आई काय झालेय ते समजून गेली. " अगं, दोन आठवडे आहेत अजून कुपने खपवायला. खपतील गं. लगेच डोळ्यात पाणी कशाला... " तिने समजूत काढली पण ती मनोमन जाणून होती, लेकीचे मन दुखणारच आहे.

पुढचे सारे दिवस शाळेतून आल्याआल्या मी मोहिमेवर पळे. रोज हिरमुसली होऊन परते. स्वप्नातही फक्त फेर धरून नाचणारी कुपने, चल पळ, असे उगाच खर्चायला पैसे कोणाकडे आहेत ’ असे म्हणत तोंड फिरवणारे काका किंवा कधीकधी मी एकटीनेच फक्त सगळी कुपने खपवल्यामुळे सगळ्या वर्गासमोर शाबासकी देणार्‍या देसाईबाई व असूयेने पाहणारी मुले इतकेच येत होते. दोन आठवडे कितीतरी उंबरे झिजवूनही दहा पैशाचे पूर्ण पुस्तक व विसाची तीन/पंचवीस चे फक्त एक कुपन मी खपवू शकले. सोमवार उजाडला. आज पुस्तके व मिळालेले पैसे परत करायचे होते. एक रुपयाचे एकही कुपन न खपल्याने व इतकुसे पैसे बाईंना द्यायचे.... मला रडूच कोसळले. तसे आईने हळूच एक रुपयाचे एक कुपन फाडले व पर्समध्ये रुपया ठेवला. इतका आनंद झाला मला. आईला मिठी मारून मी शाळेत गेले. बक्षीस मला मिळणे शक्य नव्हतेच. पुढे दरवर्षी हे कुपन प्रकरण माझा असाच जीव काढत राहिले. कित्येक वर्ष माझ्या स्वप्नांचा ताबा घेऊन माझा छळवादही केला त्यांनी. शोमू शाळेत गेल्यावर पुन्हा एकदा या कुपनांनी घरात प्रवेश केला. पण पोरगं मात्र याबाबतीत नशीबवान. गोडबोल्या लीलया पैसे जमवी. त्याचा तो खुशीने फुललेला चेहरा पाहून मी माझी ती भयावह स्वप्ने विसरून गेले. जणू त्याच्या रूपात मीच पर्स भरभरून पैसे गोळा करत होते.

आज तिच्या पर्समधले अडीच तीन हजार पाहून मी पुन्हा एकदा कुपनांचा मेळ घालू लागलेली. कुठे ती दहा पैशाची कुपने आणि कुठे हे शंभर रुपये.... माणसांची दानत वाढली आहे की मिळणारा पैसा?? का दोन्हीही.... का मनोवृत्ती बदलली आहे? यादीतली इतर नावे व त्यासमोरचे पैसे वाचून नाईलाज होतोय का अहमिका.... का पैशाचीच किंमत कमी झाली आहे? जे काय असेल ते असो पण आजच्या मुलांना निदान दुष्ट स्वप्ने तरी पडत नसावीत....

Thursday, December 16, 2010

भगरीची खिचडी

यावेळी नवरात्र व दिवाळी मायदेशी अतिशय आनंदात झाले. नवरात्राचे नऊ दिवसांचे माझे उपास नाशिकला आईकडे असल्याने चविष्ट होऊन गेले. भगर मला तितकीशी आवडत नाही आणि सारखा साबुदाणा/बटाटा खाववत नाही. म्हणून या दोन्ही पदार्थांना फाटा दिला आणि मस्त भगरीची खिचडी केली. करायला एकदम सोपी व अजिबात घास न लागणारी. गरम किंवा गार कशीही खाल्लीत तरी छानच लागते व उपासाच्या पदार्थांनी होणारे पित्तही होत नाही.

भगरीची खिचडी

वाढणी : तीन माणसांना पोटभरीची

साहित्य :

एक वाटी भगर

अडीच वाट्या गरम पाणी

दोन मध्यम बटाटे उकडून

दोन टेबलस्पून तूप

चार हिरव्या मिरच्या

पेरभर आले

मूठभर कोथिंबीर

एक चमचा जिरे

मूठभर भाजलेले शेंगदाणे किंवा दोन टेबलस्पून दाण्याचे कूट

स्वादानुसार मीठ ( आवडत असल्यास एक चमचा साखर )

एक लिंबू ( ऐच्छिक )

कृती :

कढईत मध्यम आचेवर भगर गुलाबी रंगावर कोरडीच भाजून घ्यावी. ( साधारण बारा ते पंधरा मिनिटे ) अडीच वाट्या पाणी चांगले गरम करून घेऊन भाजलेली भगर लगेच त्यात घालावी व झाकून ठेवावे. दोन तासानंतर भगर छान फुलून आलेली व मोकळी झालेली दिसून येईल.

उकडलेल्या बटाट्याची साले काढून हलक्या हाताने कुस्करून घ्यावेत. ( अगदी पीठ करू नये ) हिरव्या मिरच्या खूप तिखट असतील तर फक्त पोट फोडून घ्याव्यात पण अगदीच कमी तिखट असतील तर बारीक चिरून घ्याव्या. आल्याचेही बारीक तुकडे करावे. कोथिंबीर चिरून घ्यावी. मध्यम आचेवर कढई ठेवून तूप घालावे. तापले की त्यात जिरे, आल्याचे व मिरचीचे तुकडे घालून मिनिटभर परतून त्यावर भाजलेले शेंगदाणे व कुस्करलेला बटाटा टाकून परतावे. बटाटा जरासा लालसर दिसू लागला की मोकळी झालेली भगर त्यावर टाकून सगळे मिश्रण नीट परतावे व झाकण ठेवून एक वाफ आणावी. पाच मिनिटाने झाकण काढून स्वादानुसार मीठ घालून परतून पुन्हा एक वाफ आणून आचेवरून उतरवावे. कोथिंबीर व ज्याला हवे त्यास लिंबाचा रस घालून गरम गरम वाढावे.


टीपा :

जितकी भगर घेऊ त्याच्या अडीच पट पाणी घ्यावे. कमी घेतल्यास नीट फुलत नाही व फार घास लागतो. चुकून पाणी कमी घेतले गेले तर कढईत भगर टाकून झाल्यावर पाण्याचा एक हबका मारून एक वाफ आणावी.

साखर आवडत असेल तरच घालावी. शक्यतो घालू नयेच.

शेंगदाणे नसतील तर कूट घालावे.

यात बटाट्याचा कीसही घालता येईल. कीस घालायचा झाल्यास फोडणीत शेंगदाणे घातल्यावर लगेच घालून झाकण ठेवून वाफ आणावी. कीस नीट शिजल्याची खात्री करूनच भगर टाकावी.

ओले खोबरे आवडत असल्यास कोथिंबिरी सोबत घालावे

हे ही ’मोगरा फुलला ’ दिवाळी अंकात आहेच। खाऊगल्लीतही असावे म्हणून....

Sunday, December 5, 2010

शेंगोळे


थंडीची चाहूल लागली की शेंगोळ्यांची हमखास आठवण येऊ लागते. नुसत्या आठवणीनेही तोंडाला पाणी सुटते. करायलाही अतिशय सोपे व पटकन होणारे. थोडे तिखटच करायचे व वरून साजूक तूप घालून गरम गरम मटकवायचे. अहाहा!!!

वाढणी : तीन माणसांना एका वेळेस पुरावेत.

साहित्य :

तीन वाट्या कुळथाचे पीठ
पाव वाटी गव्हाचे पीठ
पाव वाटी दाण्याचे कूट
पंधरा ते वीस पाकळ्या लसूण वाटून
तिखट दोन चमचे ( सोसत असेल तर थोडे अजून घालावे )
हळद व हिंग अर्धा चमचा
चार वाट्या पाणी
नेहमीची फोडणी
चार चमचे तेल
स्वादानुसार मीठ
दोन चमचे तूप ( ऐच्छिक )
दोन चमचे कोथिंबीर

कृती :

परातीत कुळीथ व गव्हाचे पीठ, वाटलेला लसूण, एक चमचा तेल, हळद, हिंग, तिखट व स्वादानुसार मीठ व अगदी थोडेसेच पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. नंतर हाताला तेल लावून मळलेल्या गोळ्यातून छोटासा गोळा घेऊन साधारण बोटाएवढ्या लांबीचे शेंगोळे वळावेत.

एक खोलगट पातेले किंवा कढई मध्यम आचेवर ठेवून तापली की तेल घालावे. तेल व्यवस्थित तापल्यावर नेहमीची मोहरी, हिंग, हळद व चमचाभर तिखट घालून फोडणी करावी. तित दोन चमचे कुळथाचे पीठ घालून तीन चार मिनिटे भाजावे. थोडा खमंग वास सुटला की दाण्याचे कूट घालून परतावे. दोन-तीन मिनिटाने त्यावर पाणी ओतावे व पाण्याच्या अंदाजाने मीठ घालून एक उकळी आणावी. उकळी फुटू लागली की वळून ठेवलेले शेंगोळे हलक्या हाताने पाण्यात सोडावेत. साधारण दहा ते बारा मिनिटात जठराग्नी खवळवणारा वास घरभर दरवळू लागेल. शेंगोळ्याचा छोटासा तुकडा खाऊन पाहावा. सहजी तुकडा तुटायला हवा. थोडेसे कच्चट वाटल्यास अजून पाच मिनिटे शिजू द्यावे. त्याचवेळी दोन चमचे तूप घालून ढवळून झाकण ठेवावे. आचेवरून काढून कोथिंबीर घालून गरम गरम वाढावे.

टीपा :

कुळथाचे पीठ विकत आणल्यास बरेचदा कचकच येतेच. अशा पिठाचे बनवलेले शेंगोळे खाववत नाहीत. रसभंग होतो. म्हणून शक्यतो पीठ दळून आणावे.

तिखटाचे प्रमाण जरासे जास्तच छान लागते. शेंगोळ्यात मीठ घातलेले आहे हे विसरू नये व त्या अंदाजाने पाण्यात मीठ घालावे.

तूप जरूर घालावे. स्वाद व वास अप्रतिम.

शेंगोळे ओलसरच असावेत. थोडासा रस्सा असतो ना तसे. मात्र शेंगोळ्यात आमटीसारखे पाणी नसावे.

’मोगरा फुलला ’ दिवाळी अंकात आहेच. खाऊगल्लीतही असावे म्हणून....

Wednesday, December 1, 2010

रिसीविंग एंड ला पुन्हा मीच...

ठाण्यात रिक्षावाल्यांची मक्तेदारी ' मनसे 'ने मोडून काढली. मुजोर रिक्षावाल्यांना जरब बसवली. ' मीटर जॅम ' आंदोलनाच्या बातम्यांनी ऑगस्ट महिन्याचे काही दिवस चांगलेच गाजवले. इतक्या दूरवर असून आणि रोजचा सध्यातरी या समस्येशी माझा संबंध नसला तरीही हे वाचून मी खूश झाले होते. निदान आता काही दिवस तरी सुखावह जातील. रिक्षावाले अडवणूक करणारच नाहीत, सुतासारखे सरळ चालतील, सौजन्य रिक्षा चालवतील वगैरे भ्रामक कल्पना रंगवल्या नसल्या तरी किमान काही नाठाळ दंडुकेशाहीला घाबरून तरी तेरड्याचा रंग तीन दिवस दाखवत नीट वागतील, इतकीच माफक अपेक्षा धरली होती. तशातच मायदेशाची वारी ठरली. अनेक प्रकारे आनंद झालेला त्यात मनसेनेही भर घातलेली. रिक्षा अशी हाक मारताच किंवा चक्क मला येताना पाहून रिक्षावाला आपसूक माझ्यापाशी येऊन थांबेल. मी स्थानापन्न झाल्यावर रिक्षा सुरू करून माझ्या गंतव्य स्थानाच्या घोषणेची शांतपणे वाट पाहून मी ती करताच हलकेच मीटर पाडून आनंदाने रिक्षाला गती देईल. माफक आनंद म्हटल्यावर किमान इतपत माफक स्वप्न पडणारच की...

दादरला होतो तोवर रिक्षाचा संबंध कधीच आला नाही. तुरळक अपवाद वगळता. मात्र लग्न होऊन घाटकोपरला आल्यापासून रिक्षा शिवाय माझे पाय हालेचनात. आख्खे दोन्ही बाजूचे दादर, शिवाजीपार्क, नायगाव पासून माटुंग्यापर्यंत न कुरकुरता चालणारे पाय अडेलतट्टूचे धोरण स्वीकारत जागच्याजागी उभेच राहू लागल्यावर रिक्षा ला पर्याय उरलाच नाही. मग हळूहळू ' मन ' निरनिराळी कारणे शोधून रिक्षाच्या गरजेचे हिरीरीने समर्थन करू लागले. चालल्याने बरेच फायदे होतात... व्यायाम होतो, पैसे वाचतात, मनाला व शरीरालाही ऐदीपणा जडत नाही, वगैरे वगैरे क्षीण प्रयत्नांना पद्धतशीर हाणून पाडण्यात येऊ लागले. मग मीही समंजसपणे स्वतःला रिक्षाच्या स्वाधीन करून टाकले. काही काही देणी कितीही प्रयत्न केला तरी चुकवता येतच नाहीत ती देऊनच चुकवावी लागतात. त्यातलेच हे एक असे समजून आनंदाने व नेमाने देऊ लागले.

अर्थात माझ्या प्रामाणिक व आनंदाने आदान प्रदान करण्याच्या वृत्तीला रोज लहान मोठे सुरुंग लागत व वकुबानुसार मनाला भगदाडे पडत. काही दोन-पाच मिनिटात बुजत तर काही छळ करत. काहींशी तिथल्यातिथे दोन हात करायला व समोरून आलेले लगेच परतफेड करायलाही मी शिकू लागले. काही वेळा तर काहीबाहीच तोंडातून निघून जाई. मग अजून छळवाद. चिडचिड... स्वतःवर, रिक्षावाल्यांच्या मुजोरपणावर आणि फायनली माझ्या त्यांच्यावरील अवलंबित्वावर... पण रोज मरे त्यावर किती रक्त जळवायचे?? शेवटी सहनशक्ती चा मंत्र अंगी भिनवत मी स्वतःला रिक्षा+अरेरावी ला सोपवून टाकले.

जसं पाणीपुरी म्हटली की भय्या दिसतो तसेच काहीसे रिक्षांचेही समीकरण आहे. सत्तर टक्के भय्ये आणि उरलेल्या तीस टक्क्यात मराठी, गुजराती व इतर अगदीच तुरळक. अजून मुंबईत तरी मी बांगलाबाबू, किरिस्ताव सायबा किंवा दक्षिणी अण्णा सर्रास रिक्षा हाकताना पाहिलेला आठवत नाही. आता या सत्तर टक्केवाल्यांची जवळपास पूर्णतः ( निदान सकृतदर्शनी तरी... मनातून त्यांची मुजोरी कधीच जाणार नाहीच.... ) आणि तीस टक्के वाल्यांची काही प्रमाणात तरी मनमानी, ' मनसे 'ने संपवली असेल हे गृहीत धरून मी ठाण्यात दुसऱ्याच दिवशी रिक्षाला आवाज दिला....

एरवी, " थांब रे बाबा " अशी डोळ्यात अगतिकता घेऊन हाक मारणारी मी, ' मनसेच्या राजशक्ती ' भरोसे चक्क आवाज देती झालेली ... (स्वतःचा तो खणखणीत आवाज ऐकून थोडीशी दचकलेही... उगाच आवाज ऐकन दुर्लक्षण करत निघून गेला म्हणजे.... ) पण तीर आयमीन गळ्यातून आवाज सुटलाच होता. रिक्षावाला गचकन थांबला. माझ्यापासून दहा पावलांवर. मानही वळवण्याचे कष्ट न घेता आरशातून माझ्याकडे पाहत होता. मनात पाल चुकचुकली. या पालीही फार प्रामाणिक बुवा. नेमके कुठे चुकचुकायचे हे बरोब्बर कळते यांना. चुकीच्या वेळी कधीच चुकचुकायच्या नाहीत. पावले अजूनही तितकीच अडेलतट्टू. वय वाढते तसे बरेच काही बदलत जाते असे कानांनी ऐकून आहे पण पावलांना ऐकायला येतच नाही, हा नवीन शोध त्याक्षणी सप्रमाण त्यांनी मला दाखवला. रिक्षावाला पलायनवादाचा मार्ग अनुसरेल या भीतीने पायांना दहाच पावले फक्त असे गोडीगुलाबीने पटवत मी भरभर रिक्षा गाठली आणि नेहमीचा, " तीन हात नाका चलोगे? " चा प्रश्नार्थक सूरच काय तो प्रश्नच बाद करून स्थानापन्न झाले.

" हूं... " एखादा मस्तवाल बैल कसा मातीला ढुसण्या मारत हुंहुं ... आवाज काढेल तसाच तो हूं ... कानावर आदळला. समोरच लावलेल्या मोठ्या आडव्या आरशात रिक्षावाल्याचे पानाचा तोबरा भरलेले मुखकमल दिसले आणि ' हुं ' चे रहस्य सुटले. तीन हात नाका... झटक्यात व ठसक्यात सांगून मी त्याच्यावरची नजर हटवून बाहेर पाहू लागले. मात्र कान व डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याच्या पुढच्या पावित्र्याचा अंदाज घेत होतेच. " हुं... " पुन्हा हुं... आता काय? नाकाला चुण्या पाडत त्रासिक मुद्रेने मी त्याच्याकडे डायरेक्ट पाहिले तर..." हुं... उंहू... " सोबत हाताने, ' नाही जाणार - उतरा खाली ' चा इशारा...

सकाळचे फक्त दहा वाजलेत, म्हणजे ही जेवणाची वेळ नाही की चहाचीही वेळ नाही ( ऑफिशियली... बाकी चहाला खास काळ वेळ व स्थळही नसते. तो कुठल्याही क्षणी ' हो. कटिंग चालेल की ' मध्येच मोडतो शी मी +१ ). आत्ता गाडी रस्त्यावर आणली असेल त्यातून तीन हात नाका म्हणजे कुठले टिंबकटू ही नाही, तरीही हा चक्क उतरा म्हणतो. मनसेची भीती जाऊ दे पण त्याशिवायही याने मला नाही म्हणायचे कुठलेच कारण मला दिसत नव्हते. कुठे झक मारली आणि आवाज दिला असे मला होऊन गेले. पालींचा चुकचुकाट कल्ला करू लागला. निदान कारण तरी कळून घ्यावे म्हणून मी ( पोकळ ) उंच आवाजात त्याला विचारले, " क्यों, क्या हुआ? दस बजे हैं वो भी सुबह के और तुम ना बोलते हो... मीटर जॅम भूल गयें क्या? " नाईलाजाने तोबरा रिता करत रस्त्याला बापाचा माल असल्यागत रंगवून गर्रकन माझ्याकडे फिरत तिरसटपणे म्हणाला, " एकदा सांगून समजत नाही का? उतरा खाली. सकाळचे दहा का रात्रीचे दहा हा सवाल नसून माझ्या मर्जीचा सवाल आहे. आणि ते मीटर जॅम फक्त भय्यासाठी वापरायचे, माझ्याकडे नाही. कळलं का? " तो खरेच मला हाताला धरून उतरवायला कमी करणार नाही या भीतीने मी खेटर खाल्ल्यासारखी पटदिशी खाली उतरले. पुन्हा एकदा तुच्छतेने पाहत पीक टाकून तो निघून गेला. बापुडवाणी मी आणि बापुडवाणा रस्ता पाहातच राहिलो.

खरेच का ते मीटर जॅम फक्त भय्यासाठीच....? का फक्त त्या दोन तीन दिवसांपुरतेच असेल त्यांच्यासाठीही??? आता हे जाणून घ्यायला पुन्हा एकदा हात दाखवून अवलक्षण करणे भागच होते. ती वेळही पावलांच्या कृपेने लगेचच आली.

यावेळी मात्र ' कोरा ' आवाज काढत मी रिक्षाला ' हाक ' दिली. रिक्षा अगदी समोरच थांबली. पावले खूश. घाईघाईने बसायला उतावीळ झालेली. आधीच्या अनुभवाने मी जडशीळ उभी. " तीन हात नाका चलोगे ... ?? " " बहनजी ऐसे भी चलनाही हैं तो क्यों पुछते हों? बैठिये, जहा कहोगी लेके जाउंगा " मनाच्या आधी पावलांनी नोंद घेतली आणि मी रिक्षात बसलेही. रिक्षावाला भय्याच होता हे उघड आहेच. विचार केला जरा छेडावे... अंदाज येईल याच्या - यांच्या मनात काय चाललेय याचा.

" आपने ना नही बोला, अच्छा लगा। " मी विषयाला तोंड फोडले.
" मार खानेसे तो बच जाउंगा ना... "
" मतलब अगर डर नही होता तो ' ना ' बोलते क्या? डर तो वक्त के साथ कम होता रहेगा और जो बात मनसे नही दंडुके की वजह होती है उसका मतलब और आयू भी कम ही होती हैं। ना बोलना गलत हैं ऐसा आपको नही लगता? "
" बहनजी, मैं मानता हूं की रिक्षावालोंकी मनमानी बहोत सरचढ चुकी हैं। पर क्या सिर्फ हमही लोग मनमानी करते है? नही ना? फिर हमको ही दंडुका काहे मारत हो?? ' ठोकरे ' सिर्फ ठुकाई करना जानत हैं पर ये जानने की उसे जरुरत ना हैं की उसके अपने भी कैसे कैसे माज दिखाते हैं| उसे भी कभी देखे तो पता चलेगा... ठुकाई जात देखके नही कारण और बर्ताव देखके होनी जरुरी हैं, क्यों? "

दहा मिनिटांपूर्वीच खाल्लेले खेटर अजूनही चेहऱ्यावर रेंगाळत होतेच तोच याचा हा प्रश्न आणि तळतळ. रिसीविंग एंड ला पुन्हा मीच... आपल्यांची बाजू घ्यायची प्रबळ इच्छा मनात असूनही.....