जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, August 19, 2010

शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद......

आज शाळेतल्या जीवलग मैत्रिणीचा फोन आला. जवळजवळ वीस वर्षांनी आम्ही एकमेकींचा आवाज ऐकत होतो. ती म्हणाली, " ओळख बरं, कोण बोलतंय ते? " क्षणात माझ्या तोंडून गेले, " साधना..." आम्ही खूप वेळ व अनेक आठवणी काढून भरभरून बोलत राहिलो. दोघींनाही किती अन काय काय बोलू असे झालेले. मन भरून आलेले. इतकी वर्षे कोंडलेले आभाळ अचानक बरसत होते.

फोन ठेवला अन जाणवले हा सारा संवाद होत असतानाच त्याला समांतर, माझ्या मनातही एक संवाद सुरू होता. शाळेच्या दहा वर्षांच्या आठवणी तासाभरात संपणाऱ्या नसल्या तरी त्यांना नव्याने उजाळा मिळाला होता. तशी माझी स्मरणशक्ती अतिशय तीक्ष्ण आहे. आता हे वरदान आहे की शाप, कोण जाणे. परंतु घडलेले प्रसंग, माणसे, त्यांनी घातलेले कपडे - अगदी त्यांचे रंग, लकबी, चालणे-बोलणे, आवाजाची ढब, त्या त्या प्रसंगातील स्थळे, काळ, सभोवतालची परिस्थिती सारे सारे क्षणात डोळ्यासमोर उभे राहते. जणू काही मी पुन्हा एकवार ते सारे अनुभवते आहे.

आजही तसेच झालेय. आठवणींनी चौफेर हल्ला बोल केलाय. त्यांना उसंतच नाहीये. किती चेहरे अहमिकेने वर्णी लावून जात आहेत. तसेही बरेचदा ते मनाच्या पटलावर अक्षरे कोरत असतातच. काही लाघवी, तर काही चिकटगुंडे, काहींचा कोरडेपणा तर काहींची मक्तेदारी... काही उगाचच खडूस तर काही राजकारणी. काही धूर्त - लबाड तर काही चतुर. चुकार एकदोन तटस्थ अन काही मनात आरपार घुसलेले. स्वत:ला संपूर्णपणे बाजूला काढून खूप वेळ मी या दहा वर्षांतल्या ' मला व माझ्या मित्रमैत्रिणींना ' न्याहाळत होते.

दहा वर्षे..... किमान ३५ जण तरी आम्ही एकाच वर्गात पहिली ते दहावी होतो. किती बदलत गेलो. बदल.... कधी चांगले तर कधी दुखावणारे, चुकीचे. एकच गोष्ट कधीच बदलली नाही ती म्हणजे आम्हा सगळ्यांची अखंड बडबड. अर्थपूर्ण - निरर्थक, आवश्यक - उगाचच, भरभरून, ओसंडून, अव्याहत केलेल्या गप्पा, संवाद, हसणे-खिदळणे, रुसवे-फुगवे, कधी खरी तर कधी खोटी भांडणे, चिडीला येणे, चिडवणे, टिंगल - टवाळी - टोमणे, डोळे पुसणे ...... कुठल्या न कुठल्या रूपातला अखंड संवाद. मध्ये केव्हातरी एका जाहिरातीत ऐकलेले, " संवादानेच संवाद होतो-वाढतो.... " आज या सार्‍या आठवणींच्या कोलाहलात अचानक हे वाक्य समोर आले. अन मन त्या वाक्यापाशीच रेंगाळले. खरेच असे होते का? नेहमीच संवाद घडतो का?

संवाद नक्कीच दोन माणसांना जोडतो.... एकमेकांना ओळखण्याची - समजून घेण्याची संधी प्राप्त करून देतो. एकमेकांच्या जवळ येण्यासाठी संवाद माध्यमाचे काम करतो. अतिशय प्रभावी माध्यम. स्पर्शाच्या संवादानेही मने जवळ येऊ शकतात/येतात परंतु त्यासाठी मुळात शब्दांचा संवाद घडावा लागतो. कुठलाही संबंध, मैत्र संवादाच्या पुलावरूनच सुरू होतो. पण नेहमीच असे होत नाही..... कधी कधी एकही शब्द न बोलताही अनेक माणसांशी आपण व ते आपल्याशी संवाद साधत असतात. अगदी आपल्या मनातले भाव नेमके वाचू शकतात, आरपार पाहू शकतात.

बहुतांशी नेहमीच्याच जीवनातल्या सामान्य गोष्टीत हा अनुभव आपण प्रत्येकजण घेतोच. लोकलमध्ये दाटीवाटीने बसलेय, किती वाजलेत ते पाहावे म्हणून मनगटाकडे नजर गेली तर..... बस का.... धावपळीत घड्याळ घरीच राहिले वाटते. डाव्या बाजूची शेजारीण, न बोलता- न पाहता चटकन डावे मनगट पुढे करते. अर्ध्या मिनिटाने पुन्हा पुस्तकात रमून जाते.

संध्याकाळी दमलेले, कंटाळलेले मन उगाचच कानातले-पिनांच्या बॉक्समध्ये डोकावू पाहते. पण ती विकणारी तर दूरवर असते. वारंवार नजर तिच्याकडे वळू लागते. तिच्या जवळपास बसणारी अचूक हे हेरते अन हातानेच तिला इशारा करते... लगोलग ' तो ' कंटाळ्याचा उतारा माझ्या हातात विसावतो. माझी नजर धन्यवाद देण्यासाठी तिच्यावर स्थिरावताच एक मनमोकळे हसू बदल्यात ' ती ' देते. भाजीवालीच्या पाटीतल्या बारीक मेथीच्या जुड्यांकडे नजर वारंवार वळू लागली की हमखास ती पिशवीत विराजमान होते.

कधी एखाद्याचा शर्ट आवडून जातो. तर कधी, ' तो ' घालणारा मन वेधून घेतो. कधी एखादी तिच्या सतेज, प्रफुल्लित कांतीने मोह घालते....... तर कधी कोणाच्या चेहऱ्यावर पसरून आपल्यावर मोहिनी घालणारे हसू सारखे लक्ष वेधत राहते. या सार्‍यांना नजरेने कौतुकाच्या पावत्या आपण आपल्याही नकळत कधीनूक पोचवतो अन तेही ती कौतुकाची नजर आवर्जून झेलतात. त्याची पावतीही देतात. तीही लगेचच.... कधी झुलपं उडवून, तर कधी मान थोडीशी ताठ करून एक थेट दृष्टिक्षेप येतो. तो ( दृष्टिक्षेप ) आला की आपण नजर चोरतो...... काही क्षणाने आपली नजर पुन्हा आपल्याला न जुमानता त्याच्याकडे ( त्या आवडलेल्या व्यक्तीकडे ) वळते अन तो ती अचूक पकडतो........ मग एक खट्याळ हास्य त्याच्या डोळ्यात उतरते...... कधी हा खेळ मिनिटभराचा असतो तर कधी अव्याहत. हे नजरेचे संवाद आपले मन सुखावून जातात. अर्थात यासोबत काही कटू नजराही असतातच. अंगाला चिकटलेल्या, ओरबाडणाऱ्या.... असहय.... मी आक्रसतेय.... स्वतःला अदृश्य करू पाहतेय...... तरीही ती नजर जळवेसारखी मला शोषतेय....... ' काळ हा सगळ्यावरचे औषध आहे.... ' , खरंच ??? मग... ती प्रत्येक नजर आजही तितकीच छळवादी असावी..... ?

पण हे सारे अनोळखी संवाद. ओघाओघात सहजगत्या झालेले. मात्र अनेकदा आपण आपल्या मित्र-मैत्रिणींशीही मूक संवाद करतो. शांततेने शांततेशी केलेला संवाद. एक वेगळीच अनुभूती करून देणारा संवाद. आपलंसं करणारा संवाद. आश्वस्त संवाद. कधी अनुभवलाय का तुम्ही? नसेल तर जरूर अनुभवा...... या अशा, मनाने मनाशी बांधलेल्या तारांतून एक अजब सुरावट बांधली जाते. या मोहमयी तरल विलक्षण सुरांची आवर्तने एका लयीत उठत राहतात. सर्वांगी भिनत जातात. शब्दांना कधीचेच मागे टाकून शब्दात न बांधता येणाऱ्या -भिडणाऱ्या भावनांना समोरच्याच्या मनात उतरवतात. कायमसाठी. चिरंतन.

खरं तर, गप्पा- बोलणे, संभाषण बरेचदा चमत्कारिक असते..... कधी कधी गप्पा संपतच नाहीत.... आपण मैत्रिणीशी बोलत असतो, पाहता पाहता एका बोलण्यातून दुसरे, दुसर्‍यातून तिसरे... आवर्तने सुरूच राहतात, तासंनतास आपण बोलत राहतो.... ना विषयाचे बंधन ना वेळेचे.... फारसा विचार न करता केलेले उत्स्फूर्त संभाषण. सुरू होते एका विषयातून अन मग सुरू होतो न संपणारा गप्पांचा ओघ..... हसणे, खिदळणे.... ऐकवणे, ऐकणे, लटके रुसणे, मनवणे, खोटा राग, अधिकार...... हे असे बोलणे हा केवळ एक बहाणा असतो. दोघींच्या मनातले एकमेकीवरचे प्रेम हा सारा, बराचसा निरर्थक शब्दांचा प्रवास करत असते.

मात्र अनेकदा असेही होते की तिच दोन माणसे..... अतिशय चांगली मैत्री..... जवळचे घट्ट संबंध..... अंतरीचा तोच भाव....अपार स्नेह.... तरीही जेव्हां भेटतात तेव्हां , " काय म्हणतेस? कशी आहेस? बाकी..... " च्या पुढे गाडी हालतंच नाही..... पसरत राहते एक मूक अबोल शांतता.... मौनाचा तीव्र पगडा.... कोशात हरवलेले मन... ओठांच्या बंद महिरपी.... का? कारणं उमजतच नाही. खरं तर आपल्याजवळ बोलण्यासारखं, सांगण्यासारखं खूप काही असतं...... ऐकवण्यासारखंही बरंच काही तिच्यापाशीही असत.... पण मन आक्रसून जातं.... संवादापासून दूर दूर पळ काढतं...... आज या घडीला काहीच नको..... अगदी काहीही नको.... शब्दांसमवेतही नको अन शब्दांवाचूनही...... शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद......

43 comments:

  1. मस्त.. छोट्याश्या ब्रेकनंतर पुन्हा स्वागत... शेवटचा भाग खेचत कुठेतरी घेऊन गेला... आज काही 'जुन्या' लोकांना मेल करून गाठतोच... :)

    ReplyDelete
  2. खूपच सही लिहिलंस ग भाग्यश्री! अगदी लाखातलं एक!

    ReplyDelete
  3. श्रीताई, अप्रतिम लिहिलं आहेस.. शेवटचा परिच्छेद खूप मस्त.. प्रत्येकालाच असा अनुभव का यावा ?? :(

    ReplyDelete
  4. सहमत रोहन, काळा-आड होत चाललेल्या काही मित्र-मैत्रिणींना आज माझ्याकडुन मेल/फोन/समस/स्क्रॅप काही तरी नक्की जाणार

    ReplyDelete
  5. रोहन, धन्यवाद रे. :)

    ReplyDelete
  6. क्रान्ति, अगं आहेस कुठे तू? खूप छान वाटलं तुला पाहून. :)

    ReplyDelete
  7. मीही अनेकवेळा यामागची कारणे शोधायचा प्रयत्न करते पण.... नेमके उत्तर सापडत नाही. ते सापडणेही अशक्यच आहे म्हणा.... सारे काही, ’ व्यक्ती व मन:सापेक्ष ’ आहे नं.... हेरंब, आभार रे.

    ReplyDelete
  8. संवाद काही काळ खंडित झाला तरी मैत्र आजही जिथे थांबले तिथे तसेच अबाधित असते. ( बहुतांशी... अपवाद असणारच.... ) देर असते ती एका हाकेची..... खरं ना?

    अभिप्रायाबद्दल धन्यवाद अनिकेत. :)

    ReplyDelete
  9. पसरत राहते एक मूक अबोल शांतता.... मौनाचा तीव्र पगडा.... कोशात हरवलेले मन... ओठांच्या बंद महिरपी.... का?

    mastch ..

    ReplyDelete
  10. अगदी मनातले लिहीलेस बघ श्री..किती एक वेळा हा प्रश्न माझ्याही मनात येतो..कि तीच दोन माणसे ,तीच जिवाभावाची मैत्री..ते अंतरीचे भाव..कुठे लुप्त होतात ???
    खुप भावस्पर्शी लिहीले आहेस ग!!!

    ReplyDelete
  11. आपण म्हणता तसं होतं, मागचे मागे उरतात, वाटा वेगळ्या होतात. दूरवर जातात, दिसेनासे होतात आणि मग असेच अवचित समोर येतात. यालाच जीवन म्हणायचं.

    ReplyDelete
  12. खूप छान भाग्यश्री. आयुष्याच्या सुरवातीच्या, पहिल्या पहिल्या मैत्रीची आठवण करून दिलीस. शोधतेच आता मी त्या गधडीला! कुठे हरवलीय कोण जाणे! :)

    ReplyDelete
  13. श्री ताइ कुठे गायब होतीस??

    अप्रतिम लिहलय...शेवट खुप भावला...मस्त..मस्त..मस्त.

    ReplyDelete
  14. खरोखर अप्रतिम श्रीताई... अगदी मनातलं.. खुप सुरेख...

    ReplyDelete
  15. ताई किती छान सहज लिहिलंयस गं!

    ReplyDelete
  16. तायडे अगं कसलं हळूवार पोस्ट आहे गं!!!
    अगदी तुझ्या स्वभावाला धरून...
    हेरंबशी सहमत गं... शेवटचा परिच्छेद अगदीच मनात उतरलाय....

    प्रत्येकालाच असा अनुभव का यावा ?? :(
    +१

    ReplyDelete
  17. योग, ब्लॉगवर स्वागत व अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  18. उमा, माणसाच्या मनाचे अनाकलनीय खेळ असावेत हे बहुदा... :( अनेक धन्यवाद.

    ReplyDelete
  19. हो नं नरेन्द्रजी, असेच काहीसे होते खरे. कदाचित तो जो ’ रोजमर्रा की बाते ’सारख्या संवादाला ( ज्याची आपल्या सगळ्यांना नितांत गरज असते. जी जोवर तो घडायचा बंद होतो तोवर खरे तर जाणवतच नाही. इतक्या सहजतेने तो संवाद घडत असतो. ) दोन माणसे प्रत्यक्षात वारंवार भेटणे जरूरीचे असते.

    वाटा वेगळ्या झाल्या की नवीन वाटेवरले साथी जास्त जवळचे होतात. दोष कोणाचाच नसतो...एक अपरिहार्य प्रकार. तुम्ही म्हणता तसेच... यालाच जीवन म्हणायचे.

    अनेक धन्यवाद.

    ReplyDelete
  20. आता त्या तुझ्या ( गधडीला ) पुन्हा एकवार प्रेमाचा प्रत्यय येणार आहे. भाग्यवानच आहे. अनघे, निघालीस का?

    ReplyDelete
  21. योगेश, अरे होते इथेच. लेक आलेला नं म्हणून जरा गडबड... :) आभार रे. :)

    ReplyDelete
  22. आनंदा, खूप खूप आभार.

    ReplyDelete
  23. धन्यवाद विभी.

    ReplyDelete
  24. अगं जितकी स्थित्यंतरे तितक्या वेळी हे सारे घडणारच आहे. पण आपल्या मनात वेगवेगळ्या कप्प्यात ही सारी आजही जिवंत आहेत हेही नसे थोडके. बाकी काही जण मात्र केवळ त्या त्या वेळेपुरतेच असतात... अतिशय प्रॅक्टीकल व लबाड. :(

    धन्यवाद तन्वी.

    ReplyDelete
  25. भानस, मला तुझ्या लिखाणातला सर्वात जास्तं काय आवडतं माहितेय - तू ज्या विषयाबद्दल बोलतेस त्याच्या मुळापासून ते अगदी टोकापर्यंत सर्व पैलूंचा तू ऊहापोह करतेस.

    लेख दरवेळी सारखा उत्तम!

    ReplyDelete
  26. मी आजच फोन केला एका जुन्यामित्राचा नंबर शोधून.
    खूप आवडले पोस्ट>

    ReplyDelete
  27. नेहमीप्रमाणे सुरेख लिहलयस ग ताई...
    अस म्हणतात खर्या मित्रांना बोलण्यासाठी विषय लागत नाही तरीही चांगल्या घट्ट मैत्रीतही आपल्याला कधीकधी ती अबोल शांतता अनुभवायला मिळते.तेच कधी कधी हळुहळु हया शांततेचा भंग होवुन गप्पांना जो रंग चढतो तो अवर्णनीय...

    ReplyDelete
  28. Gelyach athavadyaat ashach eka haravalelya maitrinila shodhale. Agadi same to same feelings... ti halli Ashutosh G barobar kam karatey mhane.

    ReplyDelete
  29. खूपच हळवं होतंय वाचताना आणि का कुणास ठाऊक कुणाशीच बोलु नये, ती नाती जिथे थांबली त्याच आठवणींवर राहावीत असं वाटतं...माहित नाही जास्त लक्षात राहिलं तरी प्रॉब्लेमच....

    ReplyDelete
  30. भाग्यश्री मॅम नेहमीप्रमाणे मस्त,
    मुंबईत एकमेकांना फोन न करणं म्हणजे सारं आलबेल असण्याची खात्री असते.
    शिंग फुटलीत माजलेत साले, आता घेतोच एकेकाला "काय #$@* फोन नाय काय नाय, शेट लोकं झालात तुम्हीतर? अन बापाचा आवाज वळखना व्हय रं ल्येका?"

    ReplyDelete
  31. भाग्यश्री , दोन मैत्रिणींचा एक संवाद ! पण त्याला चक्क कॅमेरा ३६० अंशातून अशा सहजपणे फिरवून विचारांच्या वावटळीत भिरकावून दिलस कि ज्याचे नाव ते.
    तुझी विषयाची सर्वकंश विचाराने मांडणी करण्याची हातोटी विलक्षण आहे. खूप सुंदर लिहिले आहेस.

    ReplyDelete
  32. तिच दोन माणसे..... अतिशय चांगली मैत्री..... जवळचे घट्ट संबंध..... अंतरीचा तोच भाव....अपार स्नेह.... तरीही जेव्हां भेटतात तेव्हां , " काय म्हणतेस? कशी आहेस? बाकी..... " च्या पुढे गाडी हालतंच नाही..... पसरत राहते एक मूक अबोल शांतता.... मौनाचा तीव्र पगडा.... कोशात हरवलेले मन... ओठांच्या बंद महिरपी.... का? कारणं उमजतच नाही. खरं तर आपल्याजवळ बोलण्यासारखं, सांगण्यासारखं खूप काही असतं...... ऐकवण्यासारखंही बरंच काही तिच्यापाशीही असत.... पण मन आक्रसून जातं.... संवादापासून दूर दूर पळ काढतं...... आज या घडीला काहीच नको..... अगदी काहीही नको.... शब्दांसमवेतही नको अन शब्दांवाचूनही...... शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद......


    कदाचित मनामध्य एक अनामिक भीती ... लांबलेल्या भेटींमुळे कदाचित शब्दांमधून काही अनर्थकारक अर्थ घेतला गेला तर .....? दोघांमधले घट्ट बंध घटत गेले तर ....? स्नेह जपायची अतीव इच्छा मूक संवादास भाग पडते !

    ReplyDelete
  33. श्रीराज, तुझ्या मनापासून केलेल्या कौतुकाने मेरा दिन बन गया. धन्यू रे. :)

    ReplyDelete
  34. अनेक धन्यवाद महेंद्र. मित्र भेटला नं?

    ReplyDelete
  35. देवेन्द्र, अगदी तसेच होते बघ. कदाचित तो जो मधला काळ असतो नं तो जाऊच द्यावा. मैत्री अजून दृढ होते. अनेक आभार.

    ReplyDelete
  36. सीमा, धन्यू गं. :)
    ओह्ह... AG बरोबर आहे का ती सध्या?

    ReplyDelete
  37. अपर्णा, हो बाई. तू म्हणतेस ना तो प्रॉब्लेमही होतो खरा कधी कधी. आणि मेला नको तो छळवाद होत राहतो आपला. :D
    आभार गं. उद्या बोलूच. :)

    ReplyDelete
  38. मग ओळखला का बापाचा आवाज त्यांनी... :D.
    धन्यवाद प्रसाद.

    ReplyDelete
  39. राजीव, किती मनापासून कौतुक केलेस तू... एकदम मस्त वाटले. आभार.

    असे होते खरे. मन उगाचच घाबरते. स्वत:च्याच मनात अकारणच अनेक शंका कुशंका येतात आणि मग हात पुढे जाण्याएवजी मौनाचा आधार घ्यावासा वाटू लागतो. केवळ गुंता अजून वाढू नये म्हणूनच. हा असा स्वत:वरचा विश्वास कशामुळे डळमळीत होतो हेही नीटसे समजत नाही. :(

    ReplyDelete
  40. श्रीताई, खूप छान लिहिलं आहेस..

    ReplyDelete
  41. वाह वाह... मूक संवाद... गरज असते असाही संवाद साधण्याची. Actions speaks louder than words. :)

    ReplyDelete
  42. धन्यू गं मीनल. :)

    ReplyDelete
  43. सौरभ हो नं! नुसतं तेवढचं नाही तर त्या तितक्याच पोचतातही.. धन्यवाद !

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !