जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, October 22, 2009

नको म्हटले होते ना, तरीही...........११

आपले रिझर्वेशन मिळाले व चक्क गाडीही वेळेवर सुटली या आनंदात सगळे खूश होते. सगळी मुले खिडक्या पकडून बाहेरचे पाहण्यात दंग झाल्याने मोठ्या माणसांनीही जरा श्वास टाकला. गेले चोवीस-पंचवीस दिवस चाललेली दगदग, घराची आठवण व ट्रीप संपत आल्याची जाणीव या सगळ्या संमिश्र भावना प्रत्येकाच्या मनात होत्या. सिकंदराबाद व हैदराबाद पाहावयास पुरेसा वेळ नव्हता त्यामुळे तिथली ठळक ठिकाणे पाहून दादर गाठायचे असे ठरले. बरोबर आणलेला सगळा खाऊ जवळपास संपलाच होता. आमच्या आईने त्याच खोक्यात केलेली किडूकमिडूक खरेदी व बीचवर ओले झालेले कपडे बांधून ठेवले होते.

पहाटे पहाटे न खातापिता भुवनेश्वर सोडलेले त्यामुळे आता सगळ्यांच्या पोटात कावकाव सुरू झाली. बरोबर आणलेला खाऊ संपल्याने ट्रेनमध्ये येणारे पदार्थ व स्टेशनवरील स्टॉल्स हाच पर्याय असल्याने आम्हा मुलांची मज्जा झाली. ट्रेनमध्ये तर सारखे " चाय चाय/ कापी कापी, भजी-पकोडा, मग कधी गाजर हलवा तर मालपोवा, कधी रोशगुल्ले तर कधी मिठ्ठा दही, पाठोपाठ पुलाव व डालमा, वडा-चटणी अनेक प्रकार येतच राहिले. आलटून पालटून कोणाचे तरी आई-बाबा यातले काहीतरी घेत आणि ती मुले दुसऱ्या मुलांना चिडवून खात की नसलेल्या मुलांची भुणभूण सुरू होई.

याच प्रवासात अतिशय मधुर व थंड असे ’ डाब म्हणजेच शहाळे ’ आम्ही सगळेच पाण्याच्या ऐवजी पीत होतो. हे डाब चांगले मोठे म्हणजे एका डाबातून मोठा ग्लास पाणी निघे आणि एका डाबाची किंमत होती फक्त २५ पैसे. मला तर वाटते इथेच मी शहाळ्याच्या आकंठ प्रेमात डुबले ती अजूनही डुबलेलीच आहे. इतर सगळ्या खाऊला खळखळ करणारे आमचे बाबा या डाबांसाठी मात्र स्वतःहून, " अग घे गं. चांगले असते प्रकृतीला. पुन्हा आपण रेल्वेत आहोत तेव्हा बिनधास्त...... "
मोठे मटक्यातल्या चहावर खूश होतेच.

हळूहळू कंटाळयाला सुरवात झाली. " आई कधी उतरायचे गं आता? " ची कटकट सुरू झाली. सगळे आई-बाबा वैतागले आणि लेलेकाकांनी आम्हा मुलांवर बाँब टाकला. " काय रे मुलांनो आता शाळा सुरू होणार न गेल्या गेल्या? मग दिवाळीचा अभ्यास झाला का पुरा? " हे वाक्य ऐकले मात्र सगळ्यांच्या आया एकदम आसुरी आनंदाने आपापल्या कारट्यांच्या मागे लागल्या. पण आम्ही चौघेपाच जण वगळता तसे सगळे बरेच लहान असल्याने ते पुन्हा उंडारायला-भेकायला मोकळे झाले. आम्ही मात्र अडकलो. पंचवीस दिवसांचे दहा ओळी शुद्धलेखन म्हणजे किती ओळी व बे ते तीस पाढे तेवढेच वेळा आणि ” अशी गेली दिवाळीची सुट्टी ’हा निबंध, हे सगळे आत्ता लिहायचे या विचारानेच माझ्या डोळ्यातून गंगा- यमुना वाहू लागल्या. लागलीच बाबांनी, " अग थांब थांब एक रिकामे डाब धरतो गं गालापाशी तेवढेच चार आणे वाचतील
" असे म्हणून अजूनच रडवले. शेवटी रडत खडत मी, चित्रा, गिरीश व भाऊ अभ्यासाला बसलो. अर्थात टिवल्याबावल्याही तेवढ्याच चालू होत्याच.

खूप वेळ गेला. गाडी बरी चालली होती. नाही म्हणायला सुटल्या सुटल्या पुढच्याच ’ खुर्दा जंक्शनला अर्धा तास व विशाखापट्टम ला एक तास ’ थांबली. शिवाय मध्ये मध्ये अडलेल्या म्हशीसारखी हटून बसत होतीच. विशाखापटट्म आले तसे मामा म्हणाले आता आलो रे जवळ. कसले काय अजून अर्धेही अंतर झाले नव्हते. थोडा वेळ डुलक्या घे तर कुठे पत्ते खेळ, गाणी, भेंड्या सारे खेळ खेळून झाले पण सिकंदराबाद काही येईना. शेवटी रात्र झाली. सगळे पेंगू लागले. मध्यरात्री केव्हा तरी गुंटूर आले. गुंटूर गुंटूर, इतक्या वेळा लोक म्हणत होते की पक्के डोक्यात बसले. गुंटूर पासून तीन साडेतीन तास की सिकंदराबाद. सगळे पुन्हा झोपले. तीन तास तर कधीच संपलेले. हळूहळू सगळे जागे झाले. अरे गाडी तर थांबलीये. कुठले स्टेशन आलेय पाहा रे असे कोणीतरी म्हणत होते. गाडीने गुंटूर तर सोडले होते पण जेमतेम पंधरावीस किमी जाऊन तिने सत्याग्रह पुकारलेला. सिग्नल फेल झालेय असे चायवाला सांगत होता. आमची गाडी सहा तास जागच्याजागी उभी. हैदराबादेत राहणारे दोघेतिघे होते आमच्या डब्यात, ते म्हणू लागले की तुम्ही लोक येथे उतरून बस पकडून जा. लवकर पोचाल. पण मामा म्हणाले नको रे आपण याच गाडीने जाऊयात. नाहीतर आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखे होईल.

शेवटी एकदाचे सिग्नल तांबडे/हिरवे रंग दाखवू लागले आणि गाडी हालली. जवळपास पंचवीस तासांनी आम्ही
सिकंदराबादला पोचलो. उतरलो तर हमालांनी घेरलो गेलो. मग त्यांना अरे हमको नही देना सामान...कमाल आहे नको म्हटंले तरी हटत नाहीत. इतके मागे लागले होते की आम्हीच गयावया करून कसेबसे बाहेर पडलो. हुशशश..........

बसून आणि पेंगून सगळे वैतागले होते. त्यामुळे धर्मशाळेत पोचल्या पोचल्या सगळ्यांनी भराभर अंघोळी केल्या मस्त गरम गरम इडली - वडा सांबारचा सुंदर नाश्ता झाला आणि सिकंदराबाद आम्ही आलो रे असे म्हणत सगळे बाहेर पडले.

क्लॉक टॉवर
श्री उज्जनी महाकाली
हैदराबाद व सिकंदराबाद ही जुळी शहरे हुसेन सागर जलाशयाने जोडलेली आहेत. बाहेरील सगळ्या लोकांसाठी या
दोन्ही एकच म्हणजे हैदराबाद म्हणून गणल्या जात असल्या तरी मुळात १९४८ पर्यंत सिकंदराबाद हे ब्रिटिशांच्या थेट अमलाखाली होते. ब्रिटिशांचा सगळ्यात मोठा आर्मी कॅंप येथेच होता. क्लॉक टॉवरला भेट देऊन आम्ही राष्ट्रपती निलायम पाहिले. इथला त्रिमुलघेरी किल्ला ( नाव नीटसे लक्षात नाही ) पाहायचा होता पण वेळ कमी असल्याने अतिशय प्रसिद्ध श्री उज्जनी महाकाली मंदिर पाहायला गेलो. मुळात १८१५ साली श्री. अप्पया यांनी बांधलेले हे कालीमातेचे मंदिर. मूळची लाकडाची देवीची मूर्ती १९६४ मध्ये संगमरवराच्या मूर्तीत बदलली गेली. जाज्वल्य दैवत असून भयंकर गर्दी असते. तिथून निघालो ते जेवून तडक धर्मशाळेत गेलो व हैदराबादचा रस्ता धरला.

हुसेन सागर जलाशय

१९५१ साली बहमनी सल्तनत च्या मुहम्मद कुली कुतुब शाह ने मूसी नदीच्या तिरावर हैदराबाद या शहराची स्थापना केली. असे म्हणतात की प्लेगची महामारी ईश्वराच्या कृपेने थांबल्याने त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चारमीनार बनवला गेला. आज महाराणी एलिझाबेथच्या मुकुटात असलेला कोहिनूर हा विश्वप्रसिद्ध हिरा येथील खजिन्यातूनच मिळाला. सिकंदराबाद व हैदराबाद यांना जोडणारा टंक बुंद रोडवरूनच आम्ही हैदराबादेत प्रवेश केला. हुसेन सागर जलाशयात मध्यभागी बुध्दाचा प्रचंड मोठा पुतळा आहे. तो लांबूनच पाहीला. धर्मशाळेत सामान व महाराजला सोडून आम्ही सगळे प्रसिद्ध गोलकोंडा-गोवळकोंडा किल्ला पाहायला गेलो.

दरया रे नूर हिरा किल्ल्यातील पडदा
गोवळकोंडा किल्ला

गोवळकोंडा किल्ला दहा किमी लांबीचा असून ग्रॅनाइटच्या १२० मीटर उंच टेकडीवर बांधलेला आहे. हा संपूर्ण किल्ला म्हणजे अप्रतिम बांधकाम व उत्तम प्लॅनिंगचा नमुना आहे. आठ मुख्य दरवाजे असून , अनेक महाल, मंदिरे, तलाव, घोडदळ, पायदळ, हत्ती, घोडे यांच्या पागा, सैनिक शाळा आहेत. मुख्य दरवाजा ' फतेह दरवाजा '. इथल्या घुमटाखाली एका विशिष्ट ठिकाणी उभे राहून टाळी वाजवल्यास किल्ल्यातील सगळ्यात उंच बल हिसर मंडपात ऐकू जाते. आम्ही मुलांनी खूप वेळ टाळ्या वाजवल्या. कोणीतरी वर नक्की ऐकल्या असतील.

किल्ल्याचे सगळे दरवाजे मोठ्या मोठ्या लोखंडाच्या अणकुचीदार सळयांनी शुशोभित केलेले असून खास करून शत्रूसैन्याच्या हत्तींपासून किल्ल्याचे रक्षण व्हावे व शत्रूला किल्ल्यात प्रवेश करता येऊ नये यासाठी बसवल्या आहेत. अतिशय भक्कम बुरूज व दणकट बांधणी असून अनेक कलाकुसरीच्या गोष्टीही पाहावयास मिळाल्या. गोवळकोंडा किल्ला इतका मोठा आहे की कमीतकमी दोन दिवस तरी हवेतच पण आमच्याकडे कमी वेळ असल्याने महत्त्वाची ठिकाणे पाहून आम्ही निघालो तरीही रात्र झालीच.

हैदराबादी चिकन बिर्याणी

हैदराबादी मिरची का सालान

हैदराबादी नवाबी दाल
सुकवलेल्या जर्दाळूंचा मिठा

सकाळपासून प्रचंड वणवण झाल्याने सगळे अतिशय दमले होते. मामांनी विचारले, " मग आता धर्मशाळा की हैदराबादी बिर्याणी...... " त्यांचे वाक्य पुरे व्हायच्या आतच सगळेजण ओरडू लागले, " बिर्याणी बिर्याणी... " याआधी मी कधीही हे नाव ऐकले नव्हते की हा पदार्थही खाल्ला नव्हता. मग आम्ही सगळे खास हैदराबादी जेवण खायला गेलो. तूप, सुकामेवा यांची रेलचेल असलेले हे शाही जेवण खाल्यावर सगळे इतके जडावले की धर्मशाळेचे पंधरा मिनीटांचे अंतरही चालवेना. कसेबसे पोचले आणि गुडूप झाले.


फोटो जालावरून
क्रमश:

6 comments:

  1. पंचवीस दिवसांची सहल म्हणजे त्यावेळी अगदी पर्वणी वाटली असेल ना?? मला कौतुक त्या मोठ्या माणसांचे करावेसे वाटते ज्यांनी हा घाट घातला. हा थ्रेड पुर्ण वाचायला सवड झाली नाही पण नंतर वाचेन. फ़ोटो पण छान आहेत आणि आपकी स्मरणशक्ती को दाद दे उतनी कम....

    ReplyDelete
  2. अपर्णा अग इतकी मोठी सहल म्हणजे छोटे मोठे हादसे-गंमती-घोळ हे घडणारच हे गृहीत असले तरीही मामा व सगळी मोठी माणसे यांना दादच द्यायला हवी. खूप मजा आली. सवड मिळाली की वाच गं:) अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक आभार.

    ReplyDelete
  3. हं... करा लेकहो मजा करा... रोज रोज शिक्रण पोळी खा, मटारची भाजी खा... असं म्हणावसं वाटतंय.. पुलंच्या भाषेत.हो नां.. तुम्ही मज्जा केलित, म्हणुन आमच्या पोटात दुखतंय ना इकडे.. मग ती मजा ३० वर्षांपुर्वी का असेना... :)
    इतका मोठा टुर म्हणजे खरंच स्टॅमिना हवा, पण तुमच्याबरोबर मोठा ग्रुप असल्यामुळे मज्जा आली असेल. अशी ट्रि आयुष्यभर विसरु शकणं शक्यच नाही. वाचतांना पण खुप मजा वाटली.खुपच मस्त झालंय पोस्ट. एक पेज सुरु कर वेगळं, म्हणजे काळाच्या ओघात हे पोस्ट मागे पडणार नाही..

    ReplyDelete
  4. हेहे... महेंद्र मला राहून राहून वाटते लहान वयात इतर कुठलीही टेंशन्स, विचार नसतात ना.आम्हां मुलांना सलग इतके दिवस सहलीला जायला मिळालेय याचेच अप्रूप झालेले. ही सहल व सहप्रवासी विसरणे शक्यच नाही. काही गोष्टी सुटल्याही असतील, आई-बाबांना विचारल्या असत्या पण ते नेमके गेले दहा दिवस काश्मिरला गेलेत. त्यामुळे सारी भिस्त माझ्या स्मरणशक्तीवर ठेवून लिहीत गेलेय रे.:)

    ReplyDelete
  5. तूला जालावर पण असे मस्त फोटो कुठे मिळतात गं????बाकी पोस्ट ऍज यूज्वल मस्त.....आता पुढे दादर ना!!!!
    माझं B.E. झाल्यावर बाबा मला फिरायला हैद्राबादला घेउन गेले होते त्याची आठवण झाली फोटो पहाताना....त्याच डिसेंबर मधे लगेच बाकी संपूर्ण साउथ केले आम्ही, कारण लग्न झाल्यावर कुठे असे एकत्र फिरता येइल या विचाराने बाबांनी खुपसा वेळ माझ्याबरोबर घालवला....असो. पोस्टवरून साउथ गाठलं बघ मी!!!!
    नारळ पाणी (शहाळं) माझही आवडतं आहे....कसलं बारिक सारिक डिटेलिंग करतीयेस तू...त्यामूळे या पोस्ट सुंदर नक्षीकाम केलेल्या भरजारी पदरासारख्या वाटताहेत....

    ReplyDelete
  6. तन्वी खरेच गं लग्नाआधीच्या/लहानपणीच्या गोष्टी वेगळ्याच.तू नोटीस केले असशीलही आजकाल जी शहाळी मिळतात ना-मुंबईत तरी ती नुसती गरम असतात. उन्हात तापतात दिवसभर बिचारी:( त्यामुळे तो मधुरपणा राहीलाच नाही. असो. आवर्जून सगळे वाचलेस आनंद वाटला. अनेक आभार.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !