जाता जाता एक नजर इथेही........

Monday, October 19, 2009

अरे अजून किती बळी हवेत तुम्हाला.......?

ठाण्याच्या समतानगर मधील तारांगण सोसायटीत लागलेल्या आगीत ठाणे अग्निशमन दलाच्या सहा जवानांचा लिफ्टमध्ये गुदमरून मृत्यू झालाय हे वाचले आणि मन सुन्न झाले. नंतर इतका संताप आला....ठाण्याचे प्रशासनकर्ते या इतक्या आवश्यक मागण्यांकडे सहजी दुर्लक्ष कसे करू शकतात? लोकप्रतिनिधी/ नेते यापैकी कोणीतरी...... बाकीचे जाऊ दे हो निदान ठाण्यातील जनतेचे सोकॉल्ड भले करण्याचा दावा करणाऱ्यांनी फुलातील परागकणाएवढे जरी सहकार्य करून अग्निशमन केंद्राला मदत पुरवली असती तर आज कदाचित हा इतका भयानक प्रकार घडला नसता. प्रशासनकर्ते काय आता मदतीवर मदती जाहीर करत आहेत. अहो पण गेलेला जीव परत येणार नाहीये आणि ही घटना वारंवार घडली तर उद्या ही मदतही मिळणार नाही.

हा इतका भयानक काळा दिवस का आला याची कारणे आता तरी दूर करायचा प्रयत्न होणार का? २० लाख लोकांचे रक्षण करण्यास फक्त २५० जवान हा आकडाच भोवळ आणणारा आहे. पुरेशी यंत्रणाच नसेल तर कोणीही परिस्थितीशी कसे काय झुंजणार? मॉल-टोलेजंग इमारती किती धोकादायक असू शकतात याची पुन्हा एक झलक दिसली आहेच. अनेक ठिकाणी ट्रकही जाऊ शकत नाही तिथे आगीचा बंब कसा जाणार व कसे काम करणार? जिथे मिळेल तिथे वेडेवाकडे फुगत असलेल्या ठाणे शहराची व नागरिकांची दुर्दशा दिवसेंदिवस वाढतेच आहे.

नागरिकही बऱ्याच वेळा या घटनांना जबाबदार आहेतच. आडवीतिडवी रॉकेट सोडणे, मोठ्या मोठ्या हजारोंच्या माळा वाजवून ध्वनी प्रदूषण व शोभिची दारू उडवून हवेचे प्रचंड प्रदूषण होते आहे. अनेक घरात लहान मुले, म्हातारी माणसे दिवाळीच्या आसपास दम्याने पछाडलेली आढळतील. हा असा पैशाचा चुरा व निसर्गाचा आधीच ढललेला तोल अजूनच ढळवण्यापेक्षा हा पैसा सत्कारणी लावला तर......

कदाचित अनेकांना इच्छा असेलही अशी पण मग पुन्हा हा असा पैसा जमवला की मंडळ/समित्या आल्याच की ओघाने भ्रष्टाचारही आलाच. म्हणजे चतकोरही सत्कारणी लागणार नाही. शिवाय लोकप्रतिनिधी धावतीलच. मग बाकीचा सगळा हे माजोरडे कुत्र्यामांजरा सारखे एकमेकांवर गुरकावत खाऊन जातील. आम्ही जनता एकेकटे काही करू शकत नाही म्हणून तर प्रशासन-लोकप्रतिनिधी निवडतो ना? कोणीतरी माईचा लाल ये की पुढे....... लाल फितीत गरजेचे प्रस्ताव नुसते धूळ खात पडलेत त्याकडे पाहा जरा. अरे अजून किती बळी हवेत तुम्हाला???

12 comments:

  1. aandhala raaja vendhali praja dusare kay!!!

    ReplyDelete
  2. बातम्या ऐकतांना असंही सांगितलं गेलं की आग लागली असताना लिफ्ट वापरु नये हा बेसिक नियम न पाळल्यामुळे ह्या सहा लोकांचा मृत्यु झाला. जेंव्हा आग लागते तेंव्हा इल्क्ट्रिक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लिफ्ट बंद पडणे सहाजिकच आहे. तेंव्हा या प्रसंगामधे प्रशासनाची काहिच चुक नाही असंही त्यांनी नमुद केलं.
    आता माझा एकच प्रश्न, अशा आगींना काबुमधे आणण्यासाठी ह्या अग्निशमन केंद्राच्या जवानांनी १४ जीने चढुन वर जावे अशी अपेक्षा आहे कां? इतके जिने वर चढुन गेल्यावर ते आग विझवण्याचे काम कसे करणार? इथे वरच्या मजल्या पर्यंत पोहोचणारी एक्पांडेबल शिडी असती तर त्या जवानांना लिफ्ट वापरायची वेळ आलिच नसती. तेंव्हा ह्यात प्रशासनाची चुक नाही हे म्हणणं अगदी चुकिचं आहे. प्रशासन जेंव्हा उत्तुंग इमारतिंना परवानगी देते, तेंव्हा बेसिक इन्फ्रा स्ट्रक्चर प्रोव्हाइड करणं हे प्रशासनाचेच कर्तव्य आहे.

    ReplyDelete
  3. अभि खरेच आहे रे.काय करावे यावर.....

    ReplyDelete
  4. महेंद्र, इतक्या उंच इमारतींना फायर लिफ्ट असते तिच वापरून हे सगळे वर गेले असे पेपरमध्ये म्हटंलेय. लिफ्ट बंद पडल्यावर आतून ती उघडली का गेली नाही हे कोडे उलगाडायला हवेय. मी स्वत:ही अनेकदा आमच्या ऒफिसच्या लिफ्ट मध्ये अडकलेय. पण अगदी दोन मजल्यांच्या मध्येही लिफ्ट अड्कली तरीही स्टूलावर चढून आम्ही बाहेर आलोय.पेपरमध्ये सगळीकडे लिफ्ट बंद पडून न उघडता आल्याने हे सगळे गुदमरले असेच म्हटलेय.

    आता ह्या एक्सपांडेबल शिडीची मागणी किती वर्षे बासनात पडून आहे व इतरही अनेक अतिशय महत्वाच्या मागण्यांचा कच्चाचिठ्ठाच मांडून ठेवलाय पेपरवाल्यांनी. मुळात जेव्हां इतकी लोकसंख्या आहे व उंच उंच टॊवर बांधायला प्रशासन परवानगी देते तेव्हां किमान आग, भुकंप यासारख्या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठीची सुविधा पुरविणे हे प्रशासनाचेच काम आहे. पण कोणी करेल तर ना. आता पाणी व वीज मागणे लोकांनी सोडलेच आहे हो निदान जरूरीच्या नागरी सुविधा तरी द्याल का नाही?

    ReplyDelete
  5. आपण आनंदात असताना, भारतात काय काय चाललाय दिवाळीत म्हणून बातम्या लावताना हुरहूर मनात कायम असते कि काहीतरी दुखद बातमी येणार तर नाही न. नक्कीच नुसता विचार करून होणार नाही तर काही ठोस उपाय अमलात आणले पाहिजेत.भारतात माझे घर ठाण्यात तारांगण समोर आहे.बर्याच मैत्रिणी राहतात काळजी वाटते

    ReplyDelete
  6. kayada kay mhanato te paha.

    http://www.townplantvm.in/go/kmbr/kmbr_chapter17.html

    ReplyDelete
  7. ती फक्त त्या दिवसाची एक ब्रेकिंग न्युज होती. . दुसर्‍या दिवशी सार काही नेहमीसारख. . .२-३ लाख सरकारने जाहीर केले . . .मिळनार की नाही हे देवाला माहीत. . .कुणालाच सोयर सुतक नाही!!! पुढील दिवाळीत सर्वांना यांचा विसर पडेल पण या जवानांच्या कुटुंबीयांची या पुढील प्रत्येक दिवाळी दुःखातच असणार!!!

    ReplyDelete
  8. अनुजा अग माझ्याही मैत्रिणी आहेत तिथे. शिवाय एकवेळ अशी होती की आम्हीही तारांगण मध्येच प्लॆट घेणार होतो. खरे आहे गं, मनात सदैव आशंका असते. मायदेशात सगळे आलबेल असु दे रे असेच मन म्हणत असते. पण या अशा घटना घडल्या की मात्र भयंकर त्रास होतो. आभार.

    ReplyDelete
  9. मनमौजी तेच ना, आता मारे लाखो रुपये जाहीर करत आहेत. पण हेच आधी अग्निशमनला दिले असते तर... शिवाय ते मिळणार की नाही हा प्रश्न आहेच आणि असे प्रसंग पुन्हा पुन्हा घडले तर, रोज मरे त्याला कोण मदत करे असे म्हणून काखा-बगला वर. जीवांची किंमतच उरलेली नाही. सहा जवान गेले जाताना संपूर्ण कुटुंबाची जान घेउन गेले.कोणाला काय फरक पडतोय. पुढच्यावर्षीही पुन्हा अशीच कुठेतरी आग लागेल आणि.....यावर्षी फटाक्यांच्या कारखान्याला आग लागून स्फोट अमूक ठार ही बातमी निदान माझ्या तरी वाचण्यात आली नाही....तिची कसर इथे निघाली.

    ReplyDelete
  10. महेंद्र, वाचते तुझी लिंक.

    ReplyDelete
  11. ताई सवय झालीये ग आपल्याला आता ही...जाणारे जीव जातात....आपली दिवाळी तारखांना पण राज्यकर्त्यांची रोजच....किडा मुंग्यांची पर्वा करतय कोण???? आमच्याकडे मस्कतला आत्तापर्यंत तीन वर्षात तीन वेळा लाईट गेले पहिल्या दोन्ही वेळेस पुर्वकल्पना दिली गेली आणि तिसऱ्यांदा आत्ता दिवाळीत जेव्हा एक मोठा ट्रान्सफॉर्मर अचानक जळाला, अर्ध्या दिवसात सगळं सुरळीत करण्यात आलं....जे ह्यांना जमत ते आपल्याला का नाही या प्रश्नाने त्रास होतो फार....

    ReplyDelete
  12. तन्वी अग हे जे वीजेचे खेळ तर इतके भयावह झालेत आपल्याकडे. आमच्या बिल्डींगखालीच एक प्रचंड मोठ्ठा ट्रान्सफॊर्मर आहे. दर चार दिवसाआड तो उडतो/जळतो. की आमचा संपूर्ण परिसर अंधारात. असे गेली( माझ्या पाहण्यात आधीचे माहीत नाही.)२० वर्षे सुरु आहे. आता त्याच्यात जळण्यासारखे काही राहीलेय का असा प्रश्न पडू लागलाय. जोक्स अपार्ट पण खरेच आहे आपल्याला का बरे जमत नाही मुलभूत गरजाही पुरविणे..... प्रगति सोडच गं आपण तर अधोगतीच करतोय.:(

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !