जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, October 3, 2009

निर्लज्ज व निर्ढावलेले खूनी.......


ऑल द बेस्ट हे बरेच गाजलेले नाटक पाहून आम्ही तिघे बाहेर पडलो. गडकरीचे नाटक संपले की जो तो आपापल्या दुचाक्यांवर टांग टाकतो, काही रिक्षातून तर क्वचित गाड्यांतून व बरेचसे चालत असे भराभर पांगतात. अवघ्या पंधरा मिनिटात गडकरीचे आवार शांत होते. आम्हीही आमच्या बजाजवर निघालो. साडेबारा वाजून गेले होते. शोमू तेव्हा खूपच लहान होता. त्याला बसता यावे म्हणून एक छोटीशी सीटही आम्ही करून घेतली होती. शोमूला नाटकातले बरेचसे कळले नसले तरी मधून मधून हसत होता. मुख्य म्हणजे त्याची तक्रार नव्हती त्यामुळे आम्ही दोघांनी नाटक एन्जॉय केले. गडकरीपासून आमचे घर पंधरा मिनिटावर त्यात रात्र झाल्याने रस्ते मोकळे होते. शोमू पेंगुळल्याने पटकन घरी जावे म्हणून नवरा जरा जोरातच जात होता. चंदनवाडीला लागताना डाव्या बाजूने फूल स्पीडमध्ये टर्न घेत, टायर्सचा जोरदार आवाज होत होत एक किरमीजी रंगाची मारुती एस्टीम अचानक आमच्या समोर आली. आम्ही अक्षरशः आपटता आपटता वाचलो.

जोरात ब्रेक मारल्याने शोमूचे तोंड हँडलवर आपटून दात ओठात घुसून रक्त येऊ लागले होते व तो खूप घाबरून गेला. नवऱ्याचा राग अनावर झाला अगदी. मारुती एस्टीमवाला गावचाच नसल्यासारखा सुसाट जात होता. त्याला झापडावे म्हणून नवरा त्याच्या मागे निघाला. तिनचार मिनिटातच म्युन्सिपल ऑफिसच्या समोर, हॉटेल प्रेमा सागरच्या अगदी पुढ्यात अचानक एस्टीमने करकचून ब्रेक मारला. गाडी जेमतेम थांबतेय तोच त्यातून एक पस्तीश-चाळिशीच्या आसपास असलेला माणूस उतरला. उतरला म्हणण्यापेक्षा दार उघडून स्वतःचा भार संपूर्णपणे दारावर टाकत कसाबसा तोल सावरण्याचा प्रयत्न करीत होता. गाडी रस्त्याच्या मध्यभागी उभी होती, इंजिन सुरूच होते. तोवर आम्ही त्याच्या अगदी जवळ जाऊन पोचलो. लांबूनही कळत होते, स्वारीची एकदम ब्रह्मानंदी लागलेली होती. कसाबसा दार मग बॉनेट धरत धरत तो गाडीच्या पुढे जाऊन रस्त्यावरील दुभाजकाला लावलेल्या रेलींगशी गेला व मोकळा झाला.

पांढराशुभ्र शर्ट, काळी पँट, टाय, बहुतेक मागच्या सीटवर कोटही असेल. त्यावेळी मारुती एस्टीम ही चांगलीच महाग गाडी समजली जात होती. बहुदा ऑफिसची पार्टी झाली असावी किंवा क्लाएंटला खिलवापिलव्याला घेऊन गेला असेल. जे काय असेल ते आत्ता मात्र त्याची अवस्था भयानक होती. नवऱ्याने त्याला विचारले , " काय एकदम रस्त्याच्या मध्यभागीच का? " तसे किंचित ओशाळून म्हणाला, " सॉरी सॉरी, थोडी जास्तच लागलीये. सॉरी, पुन्हा नाही. पुन्हा नाही." असे म्हणत गाडीत बसू लागला. नवऱ्याने कुठे राहतो विचारले तर कळले की तो वृंदावन मध्ये राहत होता. ज्याला स्वतःचा तोलही सावरता येत नाही तो इतक्या लांबवर गाडी घेऊन जाणार या भीतीने मी नवऱ्याला म्हटले त्याला सांग आम्ही सोडतो तुला. नाहीतर रिक्षा करून देऊयात. म्हणावं उद्या येऊन गाडी घेऊन जा. पण त्याने बिलकुल ऐकले नाही वर, " अरे कुछ नही होता यार, रोजका हैं ये मेरा. मी जाईन व्यवस्थित. तुम्ही बिनधास्त जा घरी. गुड नाइट. " असे म्हणून तो निघूनही गेला.

नंतरचे दोन -तीन तास आम्ही दोघे प्रचंड अस्वस्थ झालो होतो. त्याची अवस्था काहीही कळण्यापलीकडे होती. मला त्याच्याशी काहीच घेणे देणे नव्हते पण जाताना जर त्याने कोणाला उडवले असते तर काय? या नुसत्या कल्पनेनेच जीव घाबरा झालेला. पुन्हा हा माणूस दररोजच असे अनेक जणांचे जीव धोक्यात आणत होता. दारू पिता तर निदान स्वतःला झेपेल इतपत प्या ना? आणि नाही झेपत तर किमान गपगुमान घरी झोपा. दिवसभर कष्ट करून कसेबसे आजच्या जेवणासाठीचे पैसे मिळवून श्रमून झोपलेल्या लोकांना चिरडण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? शिवाय लाजलज्जा तर सोडलेलीच. खुशाल भर रस्त्यात मध्यभागी उभे राहून मुतताना शरमही वाटेना. हाही प्रकार नेहमीचाच असणार. थोडक्यात अगदी निर्ढावलेला होता.

पुढचे आठ दिवस ह्या माणसाचा विचार सारखा त्रास देत होताच आणि अचानक एक दिवस ऑफिसमधून परतताना नेहमीप्रमाणे रिक्षा घेतली तर नेमका ओळखीचा रिक्षावाला निघाला. " ताई, तुम्हाला कळले का? काल रात्री कॅडबरीच्या सिग्नलशी मोठ्ठा ऍक्सिडेंट झाला. मारुती एस्टीम सर्विस रोडवर फुल स्पीडमध्ये घुसली आणि सरळ फुटपाथवर झोपलेल्या पाच-सहा जणांना चिरडत ट्रक वर जाऊन आपटली. एकदम टूंन होताच तो एस्टीमवाला. स्वतः मेलाच पण चौघां बिचाऱ्या गरीबांना घेऊन गेला. दोघे हॉस्पिटलमध्ये आहेत पण जगतील असे वाटत नाही. आणि ते मेलेलेच बरे ताई नाहीतर त्यांचे आणि त्यांच्या घरच्यांचे हाल आहेत बघा. " त्याला गाडीचा रंग विचारला तर म्हणाला गडद निळ्या रंगाची एस्टीम होती.

म्हणजे हा अजून एक त्याच्यासारखाच. असे कितीक असतीलच. अनेक वर्षे आपण दररोज ड्रंक ड्रायव्हर्सने केलेले अपघात व मारलेली, चिरडलेली माणसे ऐकतो वाचतो आहोत. कितीही कायदे केले तरी काही उपयोग होत नाही. पळवाटा आहेतच शिवाय बड्या बापांची पोरे बापाचा पैसा व त्याने आलेली मग्रुरी, चरबी दाखवत सर्रास असे लोकांना चिरडूनही सहीसलामत सुटत आहेत. आता सलामानंच पाहा ना? चिंकारा मारला म्हणून एवढा गदारोळ- नाही म्हणजे तोही कराच पण त्याच्या गाडीखाली जे चिरडलेत त्यांचे काय झाले हो? शिवाय बड्यांचे आशीर्वाद असल्याने अत्यंत उर्मट झालेले, कायदा म्हणजे आपला नोकरच असल्यासारखे वागणारे नेते व त्यांचे पित्ते आहेतच. यावर काही ठोस उपाय, भयंकर कडक कायदा का करत नाहीत? जीवाची किंमत इतकी कवडीमोल आहे का?

आजच पेपरमध्ये वाचले, " दोन वर्षाच्या मुलाला गाडीखाली चिरडले. तेही भर दिवसा उजेडी." हा इतक्या भयंकर दुर्दैवी प्रसंगाला ड्रायव्हरपेक्षाही मला त्या मुलाचे आई-वडील जबाबदार वाटतात. दोन वर्षाचे मूल घरातून बाहेर रस्त्यावर जाऊन गाडीच्या पुढ्यात खेळत बसते आणि तुम्ही गावचेही नसता. आता तो ड्रायव्हर मागून आला असेल आणि गाडीत बसून निघाला असेल. इतके लहान मूल गाडीच्या पुढ्यात आहे हे त्याला कळलेही नसेल. बरे कुत्री-मांजरी जरी टायरशी येऊन बसली तरी गाडी सुरू होण्याचा आवाज एकताच पळून जातात. या बाळाला तसे करावे हेही कळले नसेल आणि तेवढा अवधीही मिळाला नसेल. आई-बाप व गाडीचालक यांची बेफिकिरी, हलगर्जीपणा बाळाचा मात्र जीव घेऊन गेला. दरवर्षीच्या आढाव्यात अपघाताच्या घटना गेल्या वर्षांपेक्षा वाढतच आहेत. निरक्षर चालक, बेफिकीर-मग्रूर चालक, पैशासाठी रात्रंदिन गाडी चालवून शेवटी व्हीलवरच झोपी जात लोकांचा जीव घेणारे चालक. स्पीडींगची मजा घेणारे बिनधास्त, ओव्हर कॉंफिडन्स चालक. तुम्ही कितीही चांगली गाडी चालवाल पण समोरून येणारा, आजूबाजूला चालवणाराही तितकाच जबाबदार चालक हवा ना.

सप्टेंबर,२००७ मध्ये महाराष्ट्र सरकारने याबाबतीत थोडे कडक धोरण कायदा करावा असा प्रयत्न केलाय. रु.२,०००/- ते रु.५,००,०००/- इतका दंड व सहा महिने ते पाच वर्षे तुरुंगवास. याची अंमलबजावणी करताना बरेच जण वारंवार पकडले गेलेत. एकदा पकडला गेला की त्याचे लायसन्स नक्कीच संस्पेंड होत असणार पण कायदा धाब्यावर बसवण्याची सवयच झालेल्या लोकांना कशानेच फरक पडत नाही. पैसा दिला की सुटका होतेच त्यामुळेच ते पुन्हा पुन्हा असे धारिष्ट्य करतात ना? इतके प्रचंड अपघात होतात पण आकडेवारीची नोंद पाहिली तर अतिशय नगण्य आहे. याचा अर्थ सगळ्यांनाच माहीत आहे. असे असले तरी काही लोक या कायद्याच्या बडग्याला नक्कीच घाबरत असतील. जेल मधले कठीण जीवन, कदान्न व घाणेरडी स्वच्छतागृहे यांना घाबरून का होईना लोक दारू पिऊन गाडी हाकणार नाहीत. अन काही लोकांचे जीव वाचतील. मुंबई पोलिसांनी दारू पिऊन गाडी चालवण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी एक इफेक्टीव व क्रियेटीव जाहिरात बनविलीये तीच वर दिली आहे.
( फोटोवर क्लीक करा.)

11 comments:

  1. namaskar, I read your experience about drunken driving. It must be a hideous one.
    I wish to ask you, it happened in front of you, you were a party to it, what action did you take? You condemn it. Is this the only thing you can do? You should have called the police, lodged a complaint against him.
    No I will not do any thing. Why? Bhagatsing janmala yava pun shejarya kade?

    ReplyDelete
  2. khoop vichar karayala lavnara lekh ahe. aajkal mansachya jivachi kimmat kami jhaliy!

    ReplyDelete
  3. रात्रीच्या वेळी रस्ता मोकळा असल्याने वेगाने बाइक पळवायची माझी सुद्धा जुनी सवय... असे महाभाग भेटले बरेचदा मला सुद्धा. एकदा आम्ही काही मित्रांनी पोलिसांच्या ताब्यात दिला होता एकाला. पण पैसे देउन सुटतात साले. खरच 'निर्लज्ज व निर्ढावलेले' असतात.

    बाकी एकदम गडकरीची आठवण आली वाचताना. आमचा अड्डा की तो. बरीच मस्त नाटके आली आहेत असे ऐकले आहे. आता गेलो की २ तरी बघणार. :D

    ReplyDelete
  4. आजकाल कायदे फारच कडक केले आहेत. जर पोलिसांची इच्छा असेल तर पोलिस अशा रेकलेस ड्रायव्हिंग वर वचक बसवु शकतात. मध्यंतरी सलमान खानची कार किंवा नंदाची बीएमड्ब्ल्यु केस खुप गाजल्या होत्या. मुंबईला बांद्रा रिक्लेमनेशनला किंवा मरिन लाइन्स ला खुप उशिरा रेसिंग चालतं. ही जी गोष्ट सगळ्यांना माहिती आहे ती पोलिसांना माहिती नसेल असे मला तरी वाटंत नाही.
    रिपिट ऑफेंडरचं लायसन्स कॅन्सल करता येतं पण आजपर्यंत फारच कमी लोकांचे लायसन्स कॅन्सल झाले आहेत. याचा अर्थ हा की आयदर पोलिस पुरेसे कार्यक्षम नाहीत कींवा दुसरे म्हणजे लोकांनी रिपिट गुन्हे करणं बंद केलंय..
    इतके कायदे असुनही दररोज एक तरी ऍक्सिडेंटची न्युज असतेच...

    ReplyDelete
  5. अगदी बरोबर आहे श्री..पण काय आहे ना..सगळ्यान्ना सगळ माहित असते.कायदे बनवणारेच कायदा मोडु पहातात.त्यामुळे कोणालाच काहि फ़रक पडत नाही.सगळे कसे निर्ढावले आहे.अशा कितीएक केसेज नुसत्या धुळ खात पडल्या आहेत.तरी जे मांडले छान आहे.

    ReplyDelete
  6. Anonymous,आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला. त्याला घरी नेऊन सोडण्याची तयारी दर्शवीली. रात्रीच्या एक वाजलेला त्यातून पोराच्या ओठातून रक्त येत असताना व पोलीस स्टेशन पार नौपाड्याला असल्याने त्याला घेऊन तिथे जाणे मात्र जमले नाही.(सगळी दुकाने बंद व सेलही नव्हते त्यावेळी म्हणजे फोन करून पोलिसांना बोलावणेही शक्य नाही )त्या दहा मिनिटात सात-आठ जण आम्हाला पास झाले पण कोणीही साधे थांबलेही नाही.त्याला पकडून घेऊन जाणे कठीण होते व त्यासाठी मला व पोराला नवरा रस्त्यावर तर सोडू शकत नव्हता. असे असले तरी त्या दारूड्याला वचक बसेल असे काहीतरी करायलाच हवे होते हे मात्र नक्की. त्याची खंत आजही आहे. भगतसिंगाच्या नखाचीही सर आपल्याला येऊ शकत नाही परंतु आपण प्रयत्न करायला हवाच.असे हस्तक्षेपाचे प्रसंग बरेचदा येतात त्यातील काहीत मी व्यक्तीश: माझ्या कुवतीनुसार प्रयत्न केलाही आहे.असो.
    यासाठीच कायदा व त्याचे रक्षक यांची स्थापना केली आहे ना? ही अशी वारंवार असे वागणारी माणसे पोलीसांच्या तावडीत कधीच सापडली नसतील का? पण काय उपयोग, सुटण्याचे मार्ग आहेतच तोवर....

    October 4, 2009 8:36 AM

    ReplyDelete
  7. क्रान्ति खरेच आहे, माणसाच्या जीवाची किंमत आजकाल अतिशय कमी झाली आहे.:(
    आभार.

    रोहन तेच तर ना, कायद्याचे रक्षकच जर कायदा हवा तसा तोडतात, वाकवतात तर वचक बसायचा कसा?
    बाकी गडकरीचा कट्टा म्हणजे.....:)

    महेंद्र, सगळ्यात मला भिती वाटते ती आपली चूक नसताना दुस~याच्या बेजबाबदार वृत्तीने आपला जीव जाणे. मुळात लायसन्स कोणाला द्यावे याची तरी योग्य छाननी होते का? पोलिसांची इच्छा असेल तर ते बरेच काही करू शकतात इथेच तर सगळे घोडे अडलेय ना, कठीण आहे सगळेच.

    माऊ, हो गं. जात्या जीवाची व जित्या जीवाची कोणाला पर्वाच राहीली नाही.सगळेच निर्ढावलेले झालेत.:(

    ReplyDelete
  8. कायद्याची काटेकोर अंमलबजावणी अन् स्वयं शिस्त आली तरच काही तरी होऊ शकत. पण इथे गोर गरीबांच्या जीवाची पर्वा आहे कुणाला???

    ReplyDelete
  9. वेळ प्रसंग कोणालाही सांगून येत नाही....आणि प्रसंग घडला त्या वेळेस खरोखर पांडूंची आवश्यकता होती...पण ही लोक पेट्रोलिंग करतील तर ना .....त्या वेळेस ही तुम्ही त्या दारूदयाला घरी सोडन्यासाठी विचारले...तरीही त्याची मग्रुरी "रोज का हे म्हणतो" हे काय? ह्यानी काय पास फडला आहे का दुसरांचय जिवाशी खेळण्याचा.....जाउ देत पण तुम्ही सुरक्षित आहात ते महत्वाचे....
    तलतल्ति असले हराम्खोर...

    ReplyDelete
  10. मनमौजी तेच तर ना, गरीबाच्या जीवाची पर्वा कोणाला आहे.:( प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  11. गणेश हवालदार असला तरी तो काही करेलच याची बिलकुल शाश्वती नाही. उलट आम्हाला वाटेला लावून त्याच्याकडून चार टिकल्या घेऊन त्याला सोडून दिले असते.:( हे असे आधी त्याच्या बाबतीत घडले नसेल असे मला तरी वाटत नाही.
    प्रतिक्रियेकरीता धन्यवाद.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !