जाता जाता एक नजर इथेही........

Friday, July 24, 2009

उर्मिले असे का केलेस गं तू?

दुसरा शनिवार होता. ऑफिसला सुट्टी असल्याने सकाळी शोमूला शाळेत पाठवून मी जरा रिलॅक्स मूडमध्ये चहा घेत पेपर चाळत होते. नेहमीच साधारण याच वेळेला येणारी माझी बाई आली नव्हती. सुट्टी असल्याने मीही फार चिंतेत पडले नाही. पाहू....... नाहीच आली तर करू आपणच ही तयारी ठेवल्याने मनालाही शांती होती. आजकाल मी हे स्वतःला शिकवून टाकलेय. छोट्या छोट्या गोष्टींनी उगाच जीवाची चिडचिड करून घ्यायची नाही. पटापट मार्ग शोधायचा........ नाहीतर काही वर्षातच बिपी हिसका दाखवायचे.

चहा संपला..... पण पेपर काही चाळून झाला नाही. म्हणून पुन्हा अर्धा कप चहा घेतला आणि दिवाणावर बैठक मारणार तोच बेल वाजली. ह्म्म्म्म, आली वाटतं. कितीही तयारी केलेली मनाची तरी खरं सांगते, खूप बरे वाटले. आधीच दोन शनिवार मिळतात त्यात अनेक गोष्टी अहमिकेने वर्णी लावून मनात रेंगाळत असतात. बाई आली नाही तर मग........... आनंदाने दार उघडले तर बाई तिच्या मोठ्या लेकीसकट दारात उभी. तिला एकूण चार पोरे. ही मोठी--उर्मिला--चौदा वर्षांची. गोड मुलगी. खरे तर पोर अभ्यासात हुशार होती. पण अजून तीन भावंडे, बाईच्या नवऱ्याने ह्यांना सोडून दुसऱ्याच कोणाशी तरी घरोबा केलेला. त्यामुळे आईला हातभार म्हणून दहाव्या वर्षापासून उर्मिला एका ठिकाणी छोट्या बाळाला सांभाळत असे. आठवडाभर त्यांच्याकडेच राही. दुसरा व चौथा शनिवार व त्याला जोडून येणारा रविवार घरी येई.

तिला पाहून मी म्हटले, " अरे वा! आज उर्मिलाही आलीय का? ये गं कशी आहेस? " पण दोघीही काही नेहमीप्रमाणे बोलल्या नाहीत. माझ्याकडे पाहत बाई चाचरत म्हणाली, " ताई, रागावू नका हो. तुम्ही नेहमी मला सांगता राग आवर तुझा पण मला काय होते कोण जाणे. आजही उगाच धाकट्याचा राग या पोरीवर निघालाय. ताई, चुकलं माझं पण बघा हो जरा... " असे म्हणत तिने उर्मिलाचा हात पुढे केला. पाहते तो काय, पंजा आणि अंगठा व तर्जनीतला भाग चक्क फाटला होता. रक्त गळत होतं. चांगले सहा इंचाची जखम दिसत होती. ते पाहिलं, पोरीच्या डोळ्यातले कळवळलेले भाव ...... इतका संताप झाला माझा. " अगदी शर्थ झाली तुमची. हे काय करून ठेवलं? आता उगाच रडण्याची नाटकं नकोत आधी काय लागलं ते सांगा. " तेव्हा कळले की ह्या मूर्ख बाईने राग अनावर होऊन विळी फेकून मारली होती.

खालीच डॉक्टर आहेत त्यांच्याकडे घेऊन गेले. ते आधी फार ओरडले. म्हणाले हिचे नेहमीचेच आहे हे, एखादा दिवस जीव घेईल पोरांचा अशाने. पोरीला टाके घातले, बँडेज बांधून घरी पाठवले. बाई आली माझ्याबरोबर वर. त्यादिवशी मी फार बोलले तिला. ही तिसरी वेळ होती. आधीही दोनदा मधल्या पोरीला व उर्मिलालाच तिने जोरात डोके धरून आपटल्याने मोठ्या जखमा -खोक पडल्या होत्या. तिला पोराचा फार कळवळा..... टिपीकल मुलगा म्हणजे जन्माचे सार्थक प्रकार होता. त्यावरून तर मी नेहमी तिला चिडवत असे. पोरीच तुला पाहणार आहेत , वगैरे..... तिला चांगला दम दिला, जर पुन्हा असा प्रकार घडला तर मीच तुला दोन फटके मारेन आणि पोलिसांना बोलवेन. ( मी यातले खरेच काय करू शकत होते... पण निदान थोडा धाक तरी वाटेल तिला. )

ह्या घटनेला जेमतेम दोन-अडीच महिने झाले असतील. एक दिवस सकाळी पावणेसातला पोराची रिक्षा आली. मी बाईंचा आवाज ऐकला त्याला टाटा केलेला..... मनात म्हटले चला आता लेडीज स्पेशल मिळणार. ती वर आली, भांडी घासायला घेतली. पाच मिनिटातच पुन्हा बेल वाजली. आता कोण आले बाई, असा विचार करत दार उघडले तर बाईंची धाकटी पोर ( वय वर्षे १० ) दारात उभी होती. " आई, आई कुठेय? " ती घाबरलेली आणि धापा टाकत होती. " अग आधी आत तर ये. आई आहे ना. काय झाले तू का पळत आलीस? " ती रडायलाच लागली. तेवढ्यात हात धुऊन बाईही आल्या.... तिला पाहून म्हणाल्या, " काय गं, काय झालं? आत्ताच तर आले ना मी घरून? " तसे ती थरथरत, स्फूंदतस्फूंदत म्हणाली, " ताई, ताईने फास लावून घेतला. "

मला व बाईंना क्षणभर काहीच कळले नाही. बाई प्रथम भानावर आल्या. पोरीचा हात धरून, " काय मूर्खासारखे बडबडतेस? मी आले तेव्हा उर्मिला अंघोळीला जात होती ना? चल.... " असे म्हणत त्या जीना उतरू लागल्या. माझे सासूसासरे, नवरा सगळे तोवर हॉलमध्ये आले होते. मी नवऱ्याला म्हटले तू डॉक्टरांना घेऊन पोच मी जाते पुढे. तशीच मीही पळत बाईंच्या घरी पोचले. पाहते तो काय, खरोखरच उर्मिलाने ओढणीचा फास लावून घेतला होता. कोयत्याने ओढणी कापून बाईंनी तोवर तिला खाली काढली होती. पण ते करताना तिचे डोके धाडकन तिथेच ठेवलेल्या मोठ्या ट्रंकेवर आपटले होते अन मोठी खोक पडलेली, त्यातून रक्त गळत होते.

ते रक्त पाहिले तर मला वाटले, असेल थोडी तरी धुगधुगी. पोर पळत येऊन आम्हाला सांगून बाई पोचेतो किमान दहा मिनिटे गेली होती. ओढणी तिच्या गळ्यात काचली होती. खाली काढल्यावरही शेवटपर्यंत तिची गाठ सुटलीच नाही. मी तिला हात लावला तर अंग गरम लागले. माझ्यापरीने मी तिला वाचवण्याचा प्रयत्न करीत होते तोच डॉक्टरांना घेऊन नवराही येऊन पोचला. त्यांनी खूप प्रयत्न केला पण उर्मिला सगळ्या पलीकडे कधीच निघून गेली होती. फक्त चौदा वर्षांची ही पोर.... अचानक आत्महत्या करून मोकळी झाली.

अर्थात पोलीसकेस झाली. दोन दिवस बराच तपास झाला. पण काहीच निष्कर्ष निघाला नाही. हे घडले तेव्हा घरात फक्त चार भावंडे होती. खरे तर आठवडाभर उर्मिला घरात नसेच. नेमकी ती जिथे काम करत होती ते सगळेजण गावाला गेले होते. हिलाही चल म्हणत होते पण आमची बाई नको म्हणाली म्हणून पोर घरी आली होती आदल्याच रात्री. तीनही भावंडे... दहा, आठ व पाच. उर्मिला अंघोळीला निघालेली म्हणून झोपडीतले मधले दार लावून घेतलेले. बाई आमच्या घरी होती. पोलीसही चक्रावून गेले. शेवटी आत्महत्या म्हणून केस क्लोज केली.

कोणीतरी म्हणाले की रात्री बाई जोरजोरात ओरडत होत्या व ऊर्मीचा रडण्याचा आवाज येत होता. पंधरा दिवसांनी बाई आल्या. मी स्पष्टच तिला विचारले, खरे सांग, " पोरीला मारलेस का तू? असे काय गं तिला बोललीस की ती चौदा वर्षाची पोर घाबरली ...... जीव देऊन बसली. " " नाही हो ताई, मी तिला ओरडले हे खरेयं. माझे डोके फार तापट आहे, पण ती असे काही करेल असे मला कधी वाटलेच नाही. " ती रडत होती. पण आता काय उपयोग पोर तर जीवानिशी गेली होती.

जितका विचार करते तितका अजूनच त्रास होतो. असे काय झाले की हा एवढा धाडसी निर्णय तिने घेतला असावा? का, कदाचित ती आईला जरा धडा शिकवावा---थोडे घाबरवावे म्हणून ड्रामा करायला गेली आणि ओढणीचा फास इतका घट्ट बसला की तिला स्वतःला वाचवता आले नाही. हे कोडे उलगडणे शक्यच नाही आता. फक्त वाईटात एकच थोडे बरे झाले, बाईंनी पुन्हा मुलांना मारले नाही. तापटपणाही कमी झाला. मात्र ह्यासाठी उर्मिलाला जीवानिशी जावे लागले.
( ह्या घटनेला जवळजवळ चौदा-पंधरा वर्षे झालीत. )

6 comments:

  1. डोकं सुन्नं झालंय वाचुन!

    ReplyDelete
  2. Ho na Mahnedra, ajunhi me hya ghatanetun savarale nahiye.

    ReplyDelete
  3. अरुण वडुलेकरJuly 25, 2009 at 5:38 AM

    भाग्यश्री,
    बापरे! किती भयानक आहे हे! आणि तुला या सार्‍याचा प्रत्यक्ष आनुभव घ्यावा लागावा ही तर फारच विलक्षण गोष्ट. ही कथा तू विस्ताराने लिहावीस आणि अन्य स्थळांवर प्रसिद्ध करावीस असे मला वाटते.

    ReplyDelete
  4. I am feeling really sad for her. :((
    Poor girl, already she was staying away from home in such a young age. :( Poor girl. -Vidya.

    ReplyDelete
  5. विद्या, स्वागत व आभार. लोभ असू दे.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !