जाता जाता एक नजर इथेही........

Friday, July 3, 2009

अशी संधी सगळ्यांनाच मिळेल का?

जेव्हापासून आपल्याकडे ट्रेन धावायला लागली तेव्हापासून अव्याहत ही सूचना दिली जाते. रेल्वेरूळ ओलांडू नका. ब्रिजचा वापर करा. आता काही ठिकाणी ब्रिज नाहीच आहेत तिथे नाईलाज आहे खरा. पण एक नाही दोनदोन ब्रिज असूनही दररोज रूळ ओलांडणारे लोक आहेतच. कधी फार उशीर झालाय म्हणून, तर कधी ब्रिजवरून गेलोच तर ट्रेन मिळणार नाही म्हणून. काही निव्वळ सवयीने ओलांडणारे. तर काही ओव्हर कॉंफीडंट.

अनेकदा आपण सर्वांनी अशामुळे झालेले अपघात आणि अपघातग्रस्त व्यक्तीही पाहिल्या आहेत. तेवढ्यापुरता धक्का बसतो. नको असे करायला, उगाच आपलाही जीव जायचा असा.... ब्रिजच बरा, हा झटका दोन-चार दिवस टिकतो की पुन्हा सवयीचे गुलाम झालेले पाय रूळ ओलांडतात. मागे काही स्टेशनवर धरपकड सुरू केलेलीही आठवतेय. पण तीन लाइन्स.... अव्याहत वाहणारी लोकल आणि अफाट लोकसंख्या यांना रेल्वे प्रशासन कसे व कुठवर आवर घालणार. तारेची कुंपणे लावून झाली, पक्क्या भिंती बांधून झाल्या... पण दोन दिवसात लोकांनी त्यातून मार्ग बनविला. रोज मरे त्याला कोण रडे असे म्हणत रेल्वेही मधूनच पुन्हा ही मोहीम हाती घेते आणि काही काळाने सोडून देते.

केवळ दैव बलवत्तर होते म्हणूनच ती वाचली, कशी त्याची चित्रफित सोबत जोडली आहे. पाहूनच धडकी भरते तर तीचे काय झाले असेल त्याक्षणी.........जेमतेम सेकंद किंवा त्याहूनही कमीच वेळाने तिने मृत्यूला चकवले परंतु अशी संधी सगळ्यांनाच मिळेल का? आशा आहे किमान असे वाचलेले लोक तरी आता ब्रिजचा वापर करत असतील.


चित्रफित येथे पाहा:

ह्याचीही दोरी बळकट होतीच:

हा पाहा ओव्हर कॊफिडंट नमुना:

जीवावर उदार होऊन लटकणारे:

3 comments:

  1. एक-से-एक भारी विडियो आहेत ... आम्ही पण शाळेत असताना असा एक प्रकार केला होता.. :D ठाण्याला बी-केबीन ते आनंद टॉकीज रेलरूट पार करून ... त्या नंतर कानाला खडा लावला ...;)

    मी आणि माझा मित्र कोलीवाडा - दत्तमंदिरच्या ब्रिजवर रात्री गप्पा मारत बसायचो. आम्ही दररोज 'बेडेकर ते ठाणे ईस्ट' स्टेशन मधून जायचो ... २ नंबर प्लेटफोर्म वर दर दिवसाआड़ एक बॉडी दिसायची ... :(

    ReplyDelete
  2. हे अगदी नेहेमीचंच आहे. बरेचदा याला रेल्वेचा भोंगळ कारभार पण कारणीभुत आहे. जसे बोरिवलीहुन दादरला आल्यावर बोरिवली साईडचा पहिला ब्रिज हा सेंट्रल च्या एक नंबरला जात नाही. मग लोकं चार नंबरवरुन एक नंबरला जाण्यासाठी बिनदिक्कत रुळ ओलांडतात. तसेच कुर्ला स्टेशनला केवळ ठाणे साइडचे दोन ब्रिज स्टेशनच्या बाहेर नेतात. इतर ब्रिज वरुन स्टेशनच्या बाहेर जायचं असेल तर रुळ ओलांडावेच लागतात.
    पण कितिही आणी काहिही झालं तरी रुळ ओलांडु नये असं मला वाटतं..आणि स्वतःसाठी तरी मी हा नियम पाळतो. :)

    ReplyDelete
  3. रोहन...:)ठाणा स्टेशनवर नंबर दोनवर सकाळी सकाळी अनेकदा असे कोणीतरी गेलेले किंवा भयंकर स्थितीत ठेवलेले पाहीले की.....

    खरेय, काही ठिकाणी तुम्ही म्हणता तसे रेल्वेने ब्रिजची सोय केलीच नाहीये....:(

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !