जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, August 9, 2009

उपमा

पोहे, सांजा, उपमा, शिरा... तसे पाहायला गेले तर सारखे होणारे अल्पोपाहाराचे प्रकार आहेत. सोपे व झटपट होणारे. परंतु प्रत्येकाची स्वतःची एक प्रकृती आहे. वाटतात सहज सोपे म्हणून कसेही केले तर घास लागतो. लग्न झाल्यावर जेव्हा जेव्हा उपमा केला त्या प्रत्येक वेळी नवऱ्याने नाईलाजाने खाल्ल्यासारखाच खाल्ला. कधीही ' वा! मस्त झालाय गं. ' हे वाक्य ऐकले नाही. बरं त्याला उपमा अतिशय आवडतो, दररोज सकाळी उडप्याकडे जाऊन, " एक उपमा एक्स्ट्रॉ सांबार व साधा नरम डोसा " खाल्ल्याशिवाय त्याची गाडी पुढे सरकतच नसे. मग माझा उपमा का बरे आवडत नाही त्याला... हा विचार मला छळू लागला होता. शेवटी एके दिवशी एकटीनेच जाऊन उडप्याचा उपमा खाल्ला. सुंदरच लागला. लुसलुशीत-साजूक तुपाचा गंध, किंचित ऑफव्हाईट रंगाचा( दृष्यस्वरूपही तितकेच महत्त्वाचे आहे ना ), खमंग, मध्येच गोडसर व शेवटी रेंगाळणारी मिरचीची चव, उडीद व मेथीचा मस्त स्वाद अन दाताखाली येणारे काजूचे तुकडे. अहाहा! यापुढे माझा उपमा कसा चांगला लागावा? मग ठरवले उडप्यासारखा झाला पाहिजे. दोन-तीन प्रयत्नात जमला. अन एक दिवस रविवारी सकाळी करून नवऱ्याला दिला, दोन घास खाल्ले आणि पटकन म्हणाला, " काय आज सकाळी सकाळी शिवाप्रसादला गेली होतीस का? " जिंकले.

जिन्नस
  • एक वाटी खमंग भाजलेला रवा
  • दोन चमचे तेल व एक चमचा तूप
  • एक मध्यम कांदा चिरून
  • चार हिरव्या मिरच्या, पेरभर आले, पाच-सहा कडीपत्त्याची पाने,
  • दोन सुक्या लाल मिरच्या, एक टीस्पून उडीद डाळ, १०/१२ मेथीचे दाणे
  • दोन चमचे काजूचे तुकडे( ऐच्छिक ), दोन चमचे कोथिंबीर
  • एक चमचा साखर व चवीनुसार मीठ
  • तीन वाट्या आधणाचे पाणी

मार्गदर्शन

कढईत रवा घेऊन मध्यम आचेवर दहा मिनिटे भाजावा. रव्याचा रंग बदलता नये परंतु तो खमंग भाजला जायला हवा. एकीकडे कांदा उभा पातळ/ बारीक , जसा आवडत असेल तसा चिरावा. हिरव्या मिरच्या मध्ये एक चीर पाडून घ्याव्यात. आल्याचे बारीक तुकडे करावेत. रवा हलका लागू लागला व त्याचा वास सुटला की कढईतून काढून घ्यावा. त्याच कढईत तेल घालून मोहरी, जिरे, हिंग, सुक्या व हिरव्या मिरच्या, कडीपत्ता, उडीद डाळ व मेथीचे दाणे घालून फोडणी करावी. हे सगळे दोन मिनिट परतल्यावर कांदा टाकावा. दोन मिनिटे कांदा परतून झाला की चवीनुसार मीठ व एक चमचा साखर घालून परतावे. तीन-चार मिनिटातच कांद्याला पाणी सुटू लागेल आता त्यावर भाजलेला रवा घालून हे सगळे मिश्रण एकजीव करावे. एकीकडे तीन वाट्या पाणी थोडे बुडबुडे येईतो गरम करून घ्यावे. रवा-कांद्याचे मिश्रणात काजूचे तुकडे घालून पुन्हा दोन मिनिटे परतून हे आधणाचे गरम पाणी त्यावर ओतावे. ( एकतर गॅस बंद करून ओतावे किंवा कढई उतरवून - सुरवातीला मिश्रण फडफडा उडते तेव्हा जरा सांभाळून करावे. ) मिश्रण व पाणी एकत्र होईतो ढवळून झाकण ठेवावे. तीन-चार मिनिटाने झाकण काढून एक चमचा साजूक तूप घालून पुन्हा दोन मिनिटे वाफ आणून गॅस बंद करावा. वाढताना पुन्हा एकदा ढवळून कोथिंबीर व लिंबू घालून गरम गरम वाढावे.

9 comments:

  1. मी सेम करतो. फक्त दाळ नव्हतो टाकत. आता टाकीन. सतत इंप्रूव्ह करणे महत्त्वाचे.

    ReplyDelete
  2. साधक, बरेच दिवसांनी दिसलात.:)
    प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  3. Chan post ahe ga bhanas. Upamyachi kruti pan mast.

    ReplyDelete
  4. हो कामं बरीच वाढलियेत त्यामुळे सगळं वाचणं होत नाही.

    ReplyDelete
  5. वैदेही, आभार.:)

    ReplyDelete
  6. looks yummyyyyyyy :)

    though mala kadhich avadat nahi upma... ghari jevha pan upma khato, upmya peksha Shev/Farsaan ch jast asta tyavar...lollz :D

    ReplyDelete
  7. प्रसन्ना,:). बरेच जणांना उपमा आवडत नाही. माझा लेकही बिलकूल खात नाही. मी असेही नोटीस केलेय काहींना सांजा आवडतो पण उपमा नाही.
    बाकी वरून शेव-चिवडा घालणे सगळ्यांचेच आवडते.:)
    आभार.

    ReplyDelete
  8. मला उपमा मुळीच आवडत नाही आणि नवर्‍याला भयंकर आवडतो. आज तुमच्या कृतीने (अगदी लहान सहान स्टेप्स सकट) केला. फक्त थोडा जास्त आसट होण्यासाठी पाणी जास्त टाकलं होतं: कारण नवर्‍याला तसा आवडतो. एकदम पर्फेक्ट झाला होता. आज दिवसभर नवरोबा खुश!!! खूप खूप धन्यवाद! :)

    ReplyDelete
  9. Sahich! Chaan jamala he vachun aanand jhala. Dhanyawad ga!

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !