जाता जाता एक नजर इथेही........

Monday, August 31, 2009

पाऊले चालती पंढरीची वाट.....


पाऊले चालती पंढरीची वाट
सुखी संसाराची सोडुनिया गाठ

गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने
पडता रिकामे भाकरीचे ताट

आप्त‍इष्ट सारे सगेसोयरे ते
पाहुनिया सारे फिरविती पाठ

घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा
अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट

मन शांत होता पुन्हा लागे ओढ
तैसा आणि गोड संसाराचा थाट

( गीत: दत्ता पाटील, स्वर: प्रल्हाद शिंदे )

( धन्यवाद रोहिणी )

7 टिप्पणी(ण्या):

Mahendra said...

मन शांत होता पुन्हा लागे ओढ
तैसा आणि गोड संसाराचा थाट!!

वाह! काय सुंदर कविता आहे!!

rohinivinayak said...

खूप सुंदर रेखाटन! हे भक्तीगीत छानच आहे. मन भूतकाळात गेले. सकाळी रेडिओवर हे गाणे लागायचे!

रोहिणी गोरे

सतीश गावडे said...

सुरेख रेखाटन !!!

मन शांत होता पुन्हा लागे ओढ
तैसा आणि गोड संसाराचा थाट


प्रल्हाद शिंदेंनी गायलेलं एक नितांत सुंदर गीत. गावाकडे सत्यनारायणाच्या पुजेला वाजवल्या जाणार्‍या रेकॉर्डमध्ये हे गीत हमखास असतं.

भानस said...

महेंद्र, रोहिणी, सतीश आभार.
प्रल्हाद शिंदेच्या आवाजातले मिळण्याची शक्यता जवळजवळ नाहिच परंतु युट्यूबवर इतर कोणीतरी गायलेले असेल म्हणून खूप शोधले परंतु अजून तरी मिळालेले नाही. मिळाल्यास कृपया दुवा जरूर द्या.

रेखाटन आवडले, हुरूप आला. धन्यवाद.

Anonymous said...

सरदेसाई बाई: माझी एक सूचना आहे. पानावरच्या रकान्यांत किंवा शीर्षकस्तंभात पसायदानातली वगैरे अवतरणे टाकण्याची पद्‌धत आहे. पण हा ब्लॉग तुम्ही स्वतःचे विचार मांडण्यासाठी वापरता. तेव्हा त्यात इतर कोणाचे शब्द टाकल्यास 'हे एके काळी आकाशवाणीवर बरेचदा लागणारं गाणं' असा काही उल्लेख हवा. मी गाणं ऐकलेलं होतंच. पण एरवी ही तुमची शब्दरचना की काय अशी शंका आली असती.

सहसा अशा भक्तीरचना देवद्‌वार छंदात असतात; पण इथे दत्ता पाटीलांनी सरसकट ६-६-६-६ असा अक्षरछंद वापरला आहे. तोही मराठीला नवीन नाहीच.

सोबतचे चित्र तुमचे किंवा इतर कोणाचे असल्यास त्या कलाकाराचे अभिनंदन.

भानस said...

अहो, Mr. Anonymous पाऊले चालती हे इतके जुने आणि अतिशय गाजलेले भक्तीगीत आहे की ते माझे आहे की काय असा प्रश्न कोणालाही पडू शकतो अशी शंकाही माझ्या मनाला शिवली नाही. असो. असेही मी म्हटलेच आहे कोणाला हे गाणे सापडल्यास कृपया त्याचा दूवा मलाही द्यावा.

सोबतचे चित्र माझेच आहे तेव्हा आपले आभार.

अवांतर: इतके दिवस असे बिननावानेच का वावरता आहात हे मात्र अनाकलनीय आहे.

Anonymous said...

इतर सर्व ओळींत ६ + ६ अक्षरसंख्या असली तरी खालच्या ओळीत ५ + ५ आहे.

घेता प्रसाद -- श्री विठ्ठलाचा

काल हे लक्षात आलं नाही, कारण छंदाचा अंदाज़ घेताना पहिल्या कडव्यानंतर एकदम शेवटची ओळ काय ती पाहिली.