![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi1vgOtULWngG2oEwFz63s1IOlZlwJynPy2R5Js_WtVKVMSNJ12V6VhRSU190t9qDWdoWQsN_3b9XNP6HFN3pAzREvma8lgrK6aHonS1bXf4Hpsnww-xbggC2XzE4hb0w18XwXaYjQwCPqq/s400/goldmohur-mill-in-dadar.jpg)
आज दुपारी नेहमीप्रमाणे जालावर मटा वाचायला घेतला तर नजर एका बातमीवर खिळून राहिली. 'बंद गिरणी आगीत खाक '. माझे सारे बालपण गिरणगावात गेलेले. आमच्या घरातले कोणीही मिल मध्ये कामाला नसले तरीही आसपासचे बहुतांशी लोक वेगवेगळ्या मिल्समध्येच होते. मिल्स, तिथे चालणारे काम, रात्रपाळी-दिवसपाळी-ते तीन पाळ्यांचे गणित, डबेवाले, मिल्सच्या बाहेर बसणारे अनेकविध विक्रेते. केवळ मिलच्या जीवावरच चालणाऱ्या खानावळी. गणपती-गोविंदा, शिमगा व दिवाळीला मिळणारी उचल, ओव्हरटाइमची रोखी. मिल्सची स्वतःची असलेली दुकाने, त्यांची मिळणारी कुपने. त्यांच्या मुकादमांची-कटकटींची, खाड्यांची चालणारी चर्चा.
त्यांचे संप, मागण्या, कामगार नेते श्री. दत्ता सामंत, हे सगळे आमच्याही अगदी जिव्हाळ्याचे होते. दत्ता सामंत यांचा आमच्या मनावर फार पगडा होता. ना मी कधीही त्यांना प्रत्यक्ष पाहिलेले का ऐकलेले( लहानपणी ). पण आमच्या शेजारी राहणाऱ्या घाटीमामांच्या तोंडून त्यांचे नाव वारंवार ऐकून ऐकून आम्ही अक्षरशः भारले गेलेलो. गिरणी मालक भयंकर पिळवणूक करणारेच असतात व फक्त कामगार नेते श्री. दत्ता सामंतच एकटे त्या सगळ्यांशी निकराने लढा देत कामगारांचे भले करत आहेत. अगदी शाळेतही यावर नेहमीच चर्चा रंगे. सामंतसाहेबांचे सगळेच बरोबर नसेलही परंतु त्यांना कामगारांचा कळवळा आहे यावर आमच्यात नेहमीच एकमत होते. सहावी-सातवीतले आम्ही, जे समोर दिसे त्यावर गाढ विश्वास होता आमचा. पडद्यामागे काय चालते हे कधी दिसले नाही आणि दिसले असते तरी त्या वयात फारसे कळलेही नसतेच म्हणा.
जळालेल्या गिरणीचे नाव वाचले. ' गोल्ड मोहोर ', अरे देवा! केसरबागेच्या बरोबर समोरच आमची चाळ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर. आमची शाळा म्हणजे, ' तीर्थस्वरूप ताराबाई मोडकांची- शिशुविहार माध्यमिक विद्यामंदीर. ' ' दादासाहेब फाळके ’ मार्गावरूनच आम्ही रोज शाळेला जात-येत असू. ' गोल्डमोहोर ' मिल आमच्या वाटेवरच. ' रूपतारा स्टुडिओच्या ’ साधारण समोरच म्हणायला हवी. ' गोल्डमोहोर ' एवढे लांबलचक नाव फारसे कोणी घेत नसे. सगळे ' भोवंड ' म्हणत असत. ' भोवंड ' का व कधीपासून म्हणू लागले हे मला कधीच कळले नाही. कदाचित दिवसरात्रीतून बरेचवेळा मिलचे भोंगे वाजत आणि ते ऐकून लोकांना भोवळ येत असेल. त्यात तिथे भंगी वस्तीही फार होती. त्यामुळे भोवळचे भोवंड झाले असेल असा आपला आम्हा मुलांचा एक तर्क होता. ![](https://lh3.googleusercontent.com/blogger_img_proxy/AEn0k_v9o5O8ebiSP1122xb-SneF9uV9goiVe25sgWA9d2IP63E3sTS263698wdb_oJsuZHg_OwVzkE99qJovB2rR6AsHjQhvratMcVwmStBlJ9XiY6aHhk=s0-d)
मिल दादासाहेब फाळके मार्गावर असली तरी जराशी आतच म्हणायला हवी. रस्त्यावरून येता जाता मिलचे पिवळे गेट व गेटावर नेहमीच असलेली वर्दळ, कारणीक छुटकू-फुटकू दुकाने हेच ठळक नजरेत भरे. सकाळची उसळ-पाव, वडा-पावच्या गाड्यांची गडबड तर संध्याकाळ झाली की सगळ्याच मिल्सच्या आजूबाजूस दिसणारे ठरलेले दृश्य..... जवळच दोन-तीन देशी दारूची दुकाने व उकडलेली अंडी, शेंगदाणे, वाळूत भाजलेले काळे शिंगाडे व उकडलेले हिरवे शिंगाडे पुढ्यात घेऊन बसेलली लहान लहान मुले किंवा बाया. रात्र चढू लागली की बुर्जीपावच्या गाड्या लागत. मिल मधून कामगार बाहेर पडला की हातभट्टीची मारूनच घरला जानार.... त्या घेतल्याबिगर जमतच नाय. कायबी सुदरत नाय गड्या. एकदा का सांज झाली की ' दारवा ' पाहिजे म्हंजी पाहिजेच. मग बायको-पोरांना बडविणे प्रकारही रोजचेच. शिवाय उधारी प्रकारही होतेच. पठाणी व्याजही होते. मिलच्या दारावर दहा तारखेला किंवा रोखीच्या दिवशी पठाण उभे असत आणि जर कोणी ठरलेले पैसे दिले नाहीत तर तिथेच त्याला बडवतही. पैसे काढून घेत मात्र त्याच्या घरी जाऊन बायकोच्या हातावर राशनपाण्याचे पैसेही टिकवत. अर्थात अपवादही होतेच पण हाताच्या बोटावर मोजण्यापुरतेच.
असे असले तरी मिल्स सुरू होत्या तोवर रोजगार होता. अर्धा पगार ' दारवा 'वर उडाला तरी कच्च्याबच्च्यांच्या तोंडात घास पडत होता. सणासुदीला स्वतःच्या मिलच्याच कापडांचे फ्रॉक, सदरे-विजारी, साड्या अंगाला लागत होत्या. पाहता पाहता मिल्स बंद पडल्या. काहींनी एका क्षणात दम तोडला तर काही झिजून झिजून संपल्या. रडत खडत का होईना जोवर धूर निघत होता तोवर एक वेळचे अन्न तोंडात पडत होते. शेवटी एक एक करत गिरण्या संपल्या त्याबरोबरच गिरणगावही विझले. हळूहळू उभे राहिले टोलेजंग टॉवर-मॉल्स. स्वार्थ कोणाला सुटलाय हो... पण असा हजारो कुटुंबांना रस्त्यावर आणून साधलेला स्वार्थ....... बायका पोरांची लागलेली हाय-खपाटीला गेलेली पोटे, म्हाताऱ्या आईबापाचे कोरडे शुष्क ओठ अन आटलेले-फूल पडलेले धुरकटलेले डोळे. पांढऱ्या दाढीची खुंटे खाजवत गुडघे पोटाशी घेऊन उकिडवे बसून भकास नजरेने आकाशाकडे पाहत बसणारे वडील-बाप्ये-घरातले कर्ते पुरूष. अतिशय केविलवाणी अवस्था. आभाळच फाटलेले तिथे कोण कोणाला व कुठले ठिगळ लावणार हो.
माझ्या अनेक मैत्रिणींच्या घरी फार हलाखीची परिस्थिती होती. अनेकदा डबाही नसे. त्यांच्या आया इंडस्ट्रियल इस्टेट मधील छोट्या छोट्या दुकानांमधून घरी कामे आणत. ढिगावारी नग जोडायचे/घासायचे/वेगळे करायचे अशा प्रकारचे अतिशय कष्टाचे व कटकटीचे काही काम मिळे. ते करून दिले की दुकानदार त्यात हजार नुक्स काढणार आणि पैसे कमी करणार. मेहनत भयंकर व कमाई अतिशय मामुली. संपूर्ण घरदार पाठ मोडून काम करी तेव्हा कुठे चूल पेटे. आठवले तरी जीव कळवळतो.
दोनच दिवसांपूर्वी तीन गिरण्यांच्या आधुनिकीकरणाचा करार झाला आणि आज ही आग. घातपाताची शक्यता सर्वत्र एकमुखाने चर्चेत आहेच. आगीचे स्वरूप इतके भीषण असावे की २२ फायर इंजिन व फायर इंजिनच्या जोडीला १७ जम्बो टँकर असूनही आगीवर काबू मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. फायर ब्रिगेडच्या मदतीला सरकारी आस्थापनांचे पाण्याचे टँकरही होते तरीही दुपारी एकच्या सुमारास लागलेली आग विझवायला तीन- चार तास लागले. आता आगीने काय लागतानाच रौद्रावतार धारण केला असेल का? मग लागलीच का फायर ब्रिगेडला बोलाविले नाही?
थोडक्यात काय अजून एक मिल पद्धतशीर रित्या धारातीर्थी पडली. आता सगळे फार्स होतील पाहा. राजकारणी धडाधड आगीत उड्या टाकून रणशिंग फुंकतील. चौकशी झालीच पाहिजे. पूर्वनियोजित कटच आहे हा तेव्हा सुत्रधारांना शिक्षा व्हायलाच हवी वगैरे नाटके करत नाचतील मग, ' नेमके नेमक्या जागी पोहोचले ’ की चार-आठ दिवसात कुठली गोल्डमोहोर मिल अन कुठली आग? वरपर्यंत मिलीभगत आहे झालं. अपघात का घातपात हे सत्य वरकरणी गुलदस्त्यातच राहिलही नाही म्हणजे तीच शक्यता जास्त असली तरी सगळेच मनोमन जाणून आहेत. मन फार फार दुखलेय आज. आयुष्याची अनेक वर्षे गोल्डमोहोर मिलला व अश्या गिरणगावातील अनेक मिल्सना वाहून टाकलेल्या साऱ्या कामगारांच्या दुःखात मीही सहभागी आहे.