आमच्या वसाहतीचे एक छोटेसे जीम व तरणतलाव आहे. गेले काही दिवस मी नित्यनेमाने जीम मध्ये जाते आहे. जीम व तलाव वसाहतीच्या मानाने फारच पिल्लू आहेत. पण आहेत हेही नसे थोडके या धरतीवर उपयोग करून घेण्याचा माझ्यासारखाच प्रयत्न इतरही करत असतात. सुरवातीला तरणतलावावर सकाळी व संध्याकाळी बराच गजबजाट असायचा. सकाळी भरणा असे तो बायकांचा. अगदी लहान पोरींपासून ते आज्यांपर्यंत. बराचश्या तेराचौदा ते वीसबावीशीतल्या पोरी स्वीमसूटमध्ये सनबाथ घेत पहुडलेल्या. तलाव रिकामाच. अगदी बापुडवाणा दिसायचा. एक डुबकी तरी कोणी मारेल पण नाही. अक्षरशः एक तरंगही उठत नसे. संपूर्णपणे पाण्याने भरलेला असूनही कायम तहानलेला भासायचा. आशेने कधी तारुण्याच्या उंबरठ्यावरील पोरींकडे पाही तर कधी आज्यांचे अखंड संवाद निमूट ऐकत राही. मात्र संध्याकाळी तलाव आनंदाने ओसंडून वाहत असे. धडाधड उड्या घेत डुंबणारी लहान मुले, त्यांची किंचाळाकिंचाळी, बारबेक्यू करणारे निरनिराळ्या वयोगटातील पुरुष, त्यांच्या मोठ्यामोठ्याने चाललेल्या निरनिराळ्या विषयांवरील गप्पा. मधूनच तलावात बुडी मारून पुन्हा बारबेक्युशी झटापट करण्यातली त्यांची लगबग. क्वचित गॅलऱ्यांमध्ये उभे राहून कॉफीचा घोट घेत घेत या सगळ्यांचा आस्वाद घेणारी मंडळी. तलावाची खुशी झलकत असे.
रोज ठराविक वेळी गेल्याने हळूहळू चेहरे ओळखीचे होऊ लागलेले. " हाय! हाव आर या? टेक इट ईझी मॅन... स्टे कूल." सारख्या संवादांची देवाणघेवाण होऊ लागलेली. एक दिवस गेले नाही तर लगेच येऊन दोघीतिघी विचारून गेल्या, " काय गं बरी आहेस ना? काल दिसली नाहीस? " हो. हो मी बरी आहे. काल जरा कामात होते नं म्हणून नाही आले. असे सांगून मी जीममध्ये आले. त्यांची ती विचारपूस मनाला आनंद देऊन गेली. मन एकदम गणेशवाडीत जाऊन पोहोचले. सकाळी ८.१५ ला घर सोडल्यावर कोण कुठल्या वळणावर भेटेल याचे गणित पक्के होऊन गेलेले होते. ज्या दिवशी कोणीच भेटणार नाही त्यादिवशी अक्षम्य उशीर झालेला असे. कुठली गाडी नक्की मिळेल याचेही गणित या साऱ्यांच्या टप्प्यातच गुंफलेले असायचे. पण ही नोंद बरेचदा मुकीच असायची. नजरानजर, हात उंचावून नोंद घेतल्याची पावती देणे, क्वचित दोन शब्द. पण जो तो स्वतःच्या नादात व घाईत असल्याने वर्षोनवर्षे रोज पाहिलेल्या कित्येकांची नावेही मला कधीच कळली नाहीत. कधी कधी ओळीने पंधरा दिवस एखादी गायब असायची. अचानक एक दिवस उत्फुल्ल चेहरा घेऊन समोर यायची. तिला पाहताच नकळत भुवया उंचावल्या जात. डोळे लकाकत. आपसूक हात, " काय गं? कशी आहेस? " विचारून जाई. तिही तितक्याच सहजपणे, " छान आहे सारे. " असे सांगून पुढे सरके. बरेच दिवसांनी कोटा पूर्ण झाल्यासारखा वाटे.
सातत्याने अनेक चेहरे पाहून पाहून ते आपल्या व आपण त्यांच्या ओळखीचे होऊन जातो. मग अवचित ते चेहरे अचानक नव्याच जागेवर दिसले तरी ओळख पटून जाते. असे असूनही मुद्दामहून कोणीही संभाषणाचा धागा छेडत नाही. खरे तर अगदी सहज जी प्रतिक्रिया मनात उमटते, " अय्या! इथे कुठे? " किंवा " अरे, काय म्हणताय? " ती गळ्यातून बाहेर येत नाही. नजरेतून, चेहऱ्यावरील हावभाव हे सगळे आधीच व्यक्त करून गेलेले असतातच, म्हणूनही असेल कदाचित. किंवा, आपण ओळख दाखवलेली आवडेल का नाही? उगाच खेटायला येते/येतोय असे तर वाटणार नाही. रोज तर आपण एकमेकांसमोरून जातो येतो पण अजूनपर्यंत एकदातरी संवाद झालाय का? नाही ना, मग आता कसा करावा? अश्या अनेक शंकाकुशंका मनाला मागे खेचतात. म्हटले तर ओळखीचे म्हटले तर अनोळखी असे हे धागे.
आज सकाळी नेहमीप्रमाणे जीम गाठले. बहुतांशी सकाळी नऊ ते दहा/साडेदहा जणू ते फक्त माझ्याच मालकीचे असल्यासारखे असते. क्वचित दोन तीन आज्या उगाच पाच मिनिटे सायकल पळवून पसार होतात. कधीतरी एक मुलगा वेटस करतो. मधून मधून डोकावून पंधरा मिनिटात गायब होणारे दोघे तिघे आज धडपडून गेले होते. धावपट्ट्याला दोन मैल दमवले. तिसऱ्याची सुरवात केली आणि जीमचे दार जोरात ढकलल्याचा आवाज आला. मागे वळून पाहिले तर चांगली साडेसहा फुटापेक्षा जास्त उंची व सहजी तीनशे पाउंड वजन असेल असा एक पस्तिशीचा गोरा धाडकन जीम मध्ये घुसला. मी त्याच्याकडे पाहायला आणि त्यानेही माझ्याकडे पाहायला एकच गाठ झाल्याने त्याने ' हाय ' केले. प्रत्युत्तर म्हणून मीही हाय म्हणायला जात होते तोवर तो माझ्या ट्रेडमिलशी येऊन पोहोचला. मी ३.८ चा स्पीड पकडलेला असल्याने चटकन घशातून आवाज निघाला नव्हता. त्यात तो माझ्या इतका जवळ का आलाय, या विचाराने मी गोंधळून गेले. एकतर मी एकटीच होते जीममध्ये त्यात असे कोणाच्या स्पेसमध्ये ढवळाढवळ करायला कोणीच कधी येत नसल्याने थोडी अस्वस्थही झाले होते.
माझ्या ट्रेडमिल शेजारीच अजून एक ट्रेडमिल आहे. पण ते बरेच दिवस झाले बंद पडलेय. तो त्याच्यावर उभा राहिला आणि त्याने पुन्हा मला, " हाय ! " केले. मी नुसते एक स्मित केले आणि पुन्हा नजर ट्रेडमिलच्या स्क्रीनवर केंद्रित करण्याचा प्रयत्न करत डोळ्याच्या कोपऱ्यातून तो काय करतोय त्याचा अंदाज घेत असतानाच, " अगं, मी आज फार फार चिडलोय. ही माझी गर्लफ्रेंड ना मला जगूच देत नाही. " हे बोलून तो वाकून माझ्या चेहऱ्याकडे पाहू लागला. अर्थातच, मी यावर काहीतरी बोलावे या अपेक्षेनेच. एकतर मी त्याला आयुष्यात प्रथम पाहत होते. त्यात त्याचा स्वर अतिशय गंभीर होता. नाहीतर इथे बरेचदा थट्टेने आपापल्या जीएफ/ बॉयएफ बद्दल बोलणारे खूप जण सापडतात. पण त्यांना कुठल्याच संवादाची अपेक्षा नसते.
त्याचे वाकून अपेक्षेने पाहणे थांबेना म्हणून मी त्याला म्हटले, " अरे, असे प्रत्येकालाच वाटते. तीही हेच म्हणत असेल बघ. " मला मध्येच तोडत तो म्हणाला, " तुझ्या लग्नाला किती वर्षे झाली गं? तू इंडियन आहेस ना? माझे काही इंडियन मित्र आहेत. त्यांची लग्ने होऊन दहा दहा वर्षे झालीत पण अजूनही किती आनंदाने एकत्र राहतात. मला खरेच खूप हेवा वाटतो त्यांचा. माझेच बघ ना... माझा ' एक ' घटस्फोट झालाय. एक मुलगीही आहे. पाच वर्षांची आहे ती. खूप गोड आहे. पण आता ती तिच्या आईबरोबर असते. ती तिच्या आईच्या नव्या बॉयफ्रेंडबरोबर राहते. लहान असताना मीही अश्याच वातावरणातून गेलो असल्याने किती त्रास होतो अश्या विभक्तीचा हे एकदा नव्हे तीनदा अनुभवले आहे. मूल झाले तर त्याला माझ्यासारखे अखंड फरफट होणारे बालपण देणार नाही असे प्रॉमिस मी, " स्वतःला व त्या न झालेल्या बाळाला केले होते. " पण प्रत्यक्षात झाले अगदी तेच. माझ्या लेकीचा उदास चेहरा पाहिला की स्वतःचीच घृणा वाटते. का नाही मी तुम्हा इंडियन सारखी तडजोड करू शकलो? कित्येकदा माझ्या मित्रांना, त्यांच्या बायकांना चिडताना, भांडताना पाहिलेय. अगदी कड्याच्या टोकावर पोचलेलेही पाहिलेय पण असे असूनही ते आजही एकत्र आहेत. केवळ मुलांसाठी तडजोड करावीच लागली असे त्यांनी कितीही म्हटले तरीही कुठेतरी त्यांचे एकमेकांवरचे प्रेम अजूनही संपलेले नाही. मी माझ्या गर्लफ्रेंडला म्हणत होतो की तू तुझ्या मुलाला आण मी माझ्या लेकीला आणतो आणि आपण त्यांना एक सुरक्षित, सुंदर बालपण, तारुण्य देण्याचा प्रयत्न करूयात. आश्वासक, उबदार भीतीरहीत घर. जिथे ते कुठल्याही ताणाखाली वावरणार नाहीत. पण माझी जीएफ अजिबात तयार नाही. ती फक्त तिचाच स्वार्थ पाहण्यात दंग आहे. तिला ना तिच्या मुलाला आणायचे आहे ना माझ्या लेकीला आणू द्यायचे आहे. बिनधास्त, कुठल्याही जबाबदाऱ्यांशिवाय मुक्त जगायचे आहे. "
एका दमात सगळी मळमळ त्याने भडाभडा ओकून टाकली. त्याच्या या सगळ्या बोलण्यातून, मधून मधून शेव्ह केलेल्या डोक्यावर, कपाळावर तळवे घासण्यातून, त्याची असहायता, लेकीची आठवण, अपराधीपण, सारे सारे माझ्यापर्यंत पोचत होते. तो अजूनही बरेच काही बोलत होता. मैत्रीण आणि एक्स वाइफही कश्या स्वार्थी आहेत याची उदाहरणे देत होता. मला तर वाटतेय की मी मैत्रिणी बरोबर आता राहूच नये... या निर्णयापर्यंत येऊन पोहोचला होता. अचानक त्याला जाणीव झाली की आपण बराच वेळ बोलतोय आणि ही तर आपल्या ओळखीचीही नाही. तरीही इतका वेळ शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल दहा वेळा माझे आभार मानून व मला आता खूप हलकं वाटतंय. फार फार गरज होती गं कोणीतरी ऐकून घेण्याची. तू किती चांगली आहेस. भेटू पुन्हा. तुझा दिवस शुभ जावो, असे म्हणून तो आला तसा निघून गेला. माझीही साडेतीन मैलाची तंगडतोड झालेली होतीच. मी ही घरी आले.
त्याच्या बोलण्याने माझे विचारचक्र धावू लागले होतेच. किती सहजपणे त्याने त्याच्या खाजगी गोष्टी माझ्याशी शेअर केल्या होत्या. हिने कधी कोणाला हे सांगितले तर... किंवा आपण एकाच सोसायटीत राहतो म्हणजे जीएफ सोबत कदाचित आपली पुन्हा भेट होऊ शकते. त्याला कुठलेच प्रश्न पडलेले नव्हते. त्याला थोडेसे सबुरीने घ्यावेस व कूल डाउन करण्याव्यतिरिक्त मी कुठलाही सल्ला त्याला दिला नव्हता की उगाच नाकही खुपसले नव्हते.
आपल्या समाजातील तडजोडी करण्याबद्दल, सहनशीलतेवर त्याने बरेच भाष्य केले होते. त्याला दिसलेले, जाणवलेले चित्र चांगले होते. वाटले, खरेच का या चांगल्या चित्रामागे फक्त तडजोड, प्रेम, सहनशीलताच दडलेली आहे? का निव्वळ अपरिहार्यता, नाईलाज व एकाचा अव्याहत सोशिकपणा आहे.का केवळ मुलांमुळे व फक्त मुलांसाठी दिवसागणिक विरत चाललेल्या चादरीला ठिगळं लावत जगायचे. जर तसे नसते तर चाळीस-पन्नास वर्षे संसार करून वयाच्या सत्तरीत आजींना घटस्फोट घ्यावासा का वाटतो? मला आता तरी जगायचे आहे असे त्या ठामपणे सांगतात आणि नुसत्या सांगतच नाही तर तो निर्णय त्या अमलातही आणतात. ऐंशी वर्षाचे आजोबा पंचावन्न वर्षांनी दुसरे लग्न करतात तेही मुलासुना-नातवंडांना सोबत घेऊन. आता कुठे आनंदात जगायला लागलो असेही नमूद करायला विसरत नाहीत. सहन करण्यालाही मर्यादा असायला हव्यात.पती-पत्नीमधले सामंजस्य सहवासाने, मानसिक गुंतवणुकीमुळे वाढत नसेल तर केवळ संसार रेटला इतकेच करावे का? केलेच तर किती काळ.कधीतरी निव्वळ साधेसरळ जगावे.
आज आपल्याकडे विभक्त कुटुंब बरीच दिसू लागलीत असे सारखे ऐकू येतेय, काही अवतींभोवती दिसतातही. पूर्वीपेक्षा जास्त आणि निर्णयाप्रती ठाम व सशक्त. पण समाज, घरचे-दारचे, मुलं आणि जोडीदाराची वाटणारी भीती यामुळे आहे तेच जीवन मरेस्तोवर रेटणारीच घरेच जास्त आहेत. ' नोन डेव्हिल इज बेटर दॅन अननोन ' हेही खरेच. शहर आणि गावं अशी तुलनेची तफावत या बाबतीत फारशी दिसून येत नाही. घटस्फोट घ्यावा असे कधीच कोणीच म्हणणार नाही. मात्र जेव्हा जगण्यापेक्षा मरण्याकडे कल वाढू लागतो तेव्हा तरी स्वतःला अन्यायापासून सोडवायला हवे. माणसाचा एकदाच मिळणारा जन्म कश्या पद्धतीने जगावा याचा हक्क तरी प्रत्येकाला असायला हवा. का तो हक्क फक्त जोडीदाराचा, मुलांचा असे म्हणत आयुष्य खंतावयाचे. जसा अन्याय करणे हा गुन्हा आहे तसेच अन्याय सहन करत राहणे हाही गुन्हाच आहे. आणि तो अखंड करत राहून ' त्याग ' या गोंडस भावनेतून स्वतःची फसवणूक करणे हा त्याहूनही अक्षम्य गुन्हा आहे. कधीकाळी एकमेकांवर भरभरून प्रेम केले होते, अत्यंत ओढ होती म्हणूनच लग्नही केले. म्हणून केवळ ते टिकवण्याचा अट्टाहास स्वत:चे आस्तित्व मिटवून करावा का? समपर्ण हे दोन्हीबाजूने व्हायला लागते. स्वभावानुसार त्याचे प्रमाण कमीजास्त असू शकेल. जात्याच झोकून देणारी वृत्ती व मुलत: आत्मकेंद्रित प्रवृत्ती एकत्र आल्या की एक जण भरडला जाणारच.
या नात्याचे एक अधिक एक बरोबर दोन इतके सोपे गणित नक्कीच नाही. या नात्याची व नात्यातून निर्माण होणार्या गुंतागुंतीची व त्यातून निर्माण होणार्या प्रश्नांची व्याप्ती फारच मोठी आहे. संसार म्हटला की तडजोड,त्याग,सहनशीलता हवीच. तीही दोन्हीबाजूने. अनेकविध बाबी यात गुंतलेल्या आहेत. कडेलोट होईतो सामंजस्याने एकत्र राहण्याचाच प्रयत्न दोन्ही बाजूंनी केला जातो हेही खरेच. परंतु अश्या घरामधला धुमसता तणाव सगळ्यांचेच मानसिक स्वास्थ्य उध्वस्त करत असतो. विभक्तीच्या निर्णयाच्या परिणामांपेक्षाही याचा असर दूरगामी व खोलवर रुतून राहतो. मग स्वतःचा बळी देऊन नेमके काय साधले हा प्रश्न जर आयुष्याच्या संध्याकाळी पडला तर बोल कोणाला लावावा....