जाता जाता एक नजर इथेही........

Monday, November 9, 2009

हुरहुर......

" आजोबा अहो आजोबा, इकडे या पटकन. तुम्हाला कंटाळा आलाय ना.... मी घालवतो तुमचा कंटाळा. " निलेशच्या हाकांचा जोर वाढला होता. आता न जाऊन चालले नसते. गेले काही दिवस जीव फार अस्वस्थ आहे. काळजातली हुरहुर कमीच होत नाहीये. सूनबाईही काल विचारीत होती, " अण्णा, बरं वाटत नाही का? तुम्ही नेहमीसारखे गुंगून पेपर वाचत नाही आहात की आधी बातम्या मग तुझे ते येडे कार्टून्स असे म्हणत निल्याबरोबर भांडतही नाही...... काल बाजारातून येताना तुमचा गृप दिसला कट्ट्यावर. चर्चा रंगली होती अगदी. नेहमीप्रमाणे परांजपे काकांचा आवाज होताच टीपेला. तुम्ही मात्र एका बाजूला तळ्याकडे नजर लावून हरवलेले होतात. मला सांगा अण्णा, लेक नसले तुमची तरी सून आहे ना? का वन्संना बोलावून घेऊ?"

माझी सून विजया. साधी मुलगी आहे. चारचौघींसारखीच. कधी मधी वैतागते-धुसफुसते. हिच्याबरोबर कुरबूरही चालत असे तिची पण मनाने प्रेमळ आहे. काळजात माया आहे तिच्या या म्हाताऱ्या एकट्या राहिलेल्या सासऱ्याबद्दल. फार बोलघेवडी नाही ती आणि माझ्याशी जरा कमीच बोलते, पण लक्ष असते तिचे बारीक. न चुकता मला आवडेल ते काहीतरी करेल, जेवण तयार झाले की लागलीच वाढेल. कधी वाट पाहायला लावणार नाही. औषधं संपलीत गं असे कधीही तिला सांगावे लागलेले मला आठवत नाही. रोज तिला विचारतो, अगं काही आणायचे आहे का? मी निघालोय बाहेर, येतांना घेऊन येईन. एक किलो वजनापेक्षा जास्त सामान होईल असे ती काही सांगत नाही. म्हटले तर त्यात काय मोठेसे? हे तर त्यांनी करायलाच हवे ना? हवे ना, नक्कीच. पण ते आवर्जून करतात याची पोचही कधीतरी त्यांना मनापासून द्यावी की. अरे मी तर भरकटतच चाललोय. हे म्हातारपण म्हणजे.... पण तरुणपणीही मी असाच एका विचारातून दुसऱ्या मग तिसऱ्या.... आवर्तनांवर आवर्तने ......

"आजोबा आता तुम्ही येताय की मी येऊन ओढत आणू इथे तुम्हाला."
" आलो रे आलो " आता नाही गेलो तर हा नेईलच ओढून. आताशा ताकद आलीये अंगात , मिसरूडही फुटू लागलंय. स्वारी आरशासमोर उभी राहून दंड काय पाहत असते. आईवर-अनघावर येताजाता प्रयोग चालतात ताकदीचे. आपणही या वयात....... "आजोबाssss........" बापरे! आता मात्र मेलो. आलो रे आलो.

" हा बोला निलेशमहाराज, कसली गंमत दाखवतो आहेस मला? "
" आजोबा, ती खुर्ची घ्या आणि बसा इथे. तुम्हाला एक मस्त टाईमपास दाखवतो. हां पण एक प्रॉमिस करा. मी घरी आलो की तुम्ही कॉंप्यू मला द्यायचा हं का. नाहीतर अरे एक मिनिट रे असं म्हणून चिकटूनच बसाल. हे पाहा, फेसबुक आणि ऑर्कुट. या दोन्हीवर आपण तुमचे अकाँट उघडूयात. मग तुम्हाला तुमचे जुने मित्र-मैत्रिणी, अगदी शाळेतलेसुद्धा बरं का, सापडतील यावर. मग लगे रहो.... जुन्या आठवणींमध्ये, काय? "
लागलीच निलेशने अकाँट उघडले, कसे शोधायचे, काय काय गेम्सही खेळता येतात. किती निरनिराळ्या कम्युनिटीज आहेत त्यावर भरपूर माहिती, धमाल असते हे दाखवून तो पळाला मित्राकडे. पुन्हा एकदा प्रॉमिसची आठवण देऊन.

सूनबाई गेली होती मार्केटमध्ये, अनघा क्लासला. विजय ऑफिसमधून आला नव्हता. घरात माझेच राज्य होते. निलेश म्हणून गेला जुने मित्र-मैत्रिणी..... अन या हुरहुरीचा शोध लागला. थरथरत्या हाताने आणि धडधडत्या हृदयाने ऑर्कुटवर टायपले, ' स्वाती निनावे '. पण एकदम पंचवीस नावे समोर आली. पहिल्याच नावापुढे दोन आडनावे दिसली. अरे मी पण काय वेडा..... लग्न झाले ना तिचे मग निनावे काय, संख्ये टाकायला हवे. हां.... आता...... पण कशावरून तिचे अकॉऊंट असेल ऑर्कुटवर? आज आत्ता पाच मिनिटापूर्वी माझे तरी कुठे होते? दूर गेल्यावर तिने कधी शोधले असेल का मला? निदान तीच्या आठवणीत तरी असेन का मी? अण्णांना पुन्हा खूप अस्वस्थ वाटू लागले. कॉंप्यू बंद करून ते उठले आणि गॅलरीत जाऊन आरामखुर्चीत बसले. स्वाती.......

एकाच शाळेत होतो आम्ही. ती तीन वर्षे मागे होती माझ्या. ती तिच्या नादात आणि मी माझ्या. एकमेकांशी बोलायचो, खरं तर बोलणे कमीच भांडायचोच जास्त. कुरापती नेहमी मीच काढायचो. मग तीही जाम चिडायची. कट्टी घेऊन मोकळी व्हायची. असेही शाळेत मुले विरुद्ध मुली ही हाणामारी जोरदार होतीच त्यात आमची वैयक्तिक भर. सुदैवाने ती माझ्याच कॉलेजमध्ये आली. आज मी सुदैव म्हणतोय पण तेव्हा नेहमी तिला छळायचो, " इथे पण ही बया आहेच. आली लागली याच कॉलेजात. वैताग नुसता. " प्रथम प्रथम ती भडकत असे, नंतर नंतर नुसतीच हसे.

सेकंड इयरच्या कॉलेज-डेला स्वाती साडी नेसून आली होती. त्या दिवशी मी धारातीर्थी पडलो. आधी तयारी केली, मग लढलो वगैरे काही प्रकारच नाही. डायरेक्ट संपलोच. हे ध्यान इतकं देखणं आहे हे कधीही लक्षातच आलं नव्हतं. त्यात हल्ली दोन-तीन वर्षे स्वाती खूप बदलली होती. खूपच शांत, मृदू, समंजस झाली होती. आम्ही दोघेही सतत एकमेकांच्या सोबत असायचो त्यात मी तिला कायमची गृहीत धरून टाकलेली. तिला काही वेगळे मत असू शकते हा विचार कधी आलाच नाही. जसा शिऱ्या, प्रमोद तशीच स्वाती. एकदम जवळ. अनेकदा मी तिला चिडवायचो, रडवायचो. खरे तर ती लहान सगळ्यात तरी तिच्याशिवाय आमच्या गृपला रौनक नसे. पण म्हणजे मी प्रेमात पडलोय असे मला त्या आधी कधीच जाणवले नव्हते.

या इतक्या देखण्या पोरीला स्वतःच्या सुंदरतेची बिलकुल जाणीव नव्हती. निदान आम्हाला कोणालाही असे कधीच वाटले नव्हते. माझे मास्टर्स संपत आलेले. रोज ठरवायचो आज स्वातीला सांगूनच टाकूयात.... पण तिला पाहिले की धीरच होत नसे. ती नाही म्हणाली तर.... नकोच. मला तो अपमान सोसणार नाही. हं.... फार फार अहम होता त्यावेळी मनात. हुशार होतो. रुबाबदार होतो. नोटसच्या निमित्ताने बऱ्याच मुली आजूबाजूला घोटाळायच्या त्याने शेफारलोही होतो. मुलींचा गराडा आवडायचाच ...... एक एक वय असते हेच खरे. तिलाही दिसायचे सारे.... कधीतरी म्हणायची, " अवी, जरा अभ्यासात लक्ष दे रे. काही न करता इतके चांगले मार्क्स मिळतात मग मन लावून अभ्यास केलास तर कुठे जाशील. " मी उडवून लावायचो, माझ्यावर जळते असे म्हणायचो. ती कशाला जळेल माझ्यावर..... पण ते मला कळते तर ना.

पाहता पाहता वर्ष संपले आणि मी लागलीच एका मल्टिनॅशनल कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरीला लागलोही. भेटी होत होत्या पण आताशा कमी झालेल्या. मला स्वाती हवीच होती. बरेचदा ती घरी येत असे. माझ्या पेंटिंग्जची वेडी होती ती. केवळ तिच्या भुणभुणीमुळेच मी चित्र काढत होतो. हल्ली तर तिने वारंवार यावे म्हणूनच मी चित्र काढत होतो. एक दिवस समुद्राकडे नजर लावून उभ्या एका मुलीची पाठमोरी आकृती मी चितारली. आजही ते चित्र आमच्या दिवाणखान्यात आहे. सौचे तर फार आवडीचे होते. म्हणायची ही जी कोण आहे ना तिच्यामुळेच तुम्ही मला मिळालात. तिचे आभार मानायचेत मला. जायच्या आदल्या दिवशीच अचानक म्हणाली होती, " अहो, तुमच्या आधी मी गेले आणि जर ही तुम्हाला भेटली तर तिला आवर्जून सांगा बरं का माझा निरोप आणि पुन्हा तिला अशी वाट पाहायला लावू नका बरं का. " या बायका कधी कधी मनातलं असं अचानक बोलून जातात.....त्याचा संदर्भ काहीसा नंतरच लागतो.

स्वाती ग्रॅज्युएट झाली व नोकरी करू लागली. एके दिवशी घरात मी एकटाच होतो आजच्यासारखा. दिवेलागण झालेली. रस्ट कलरचा पंजाबी घातलेली स्वाती झळझळत होती. ती आली आणि थेट तिच्या आवडत्या चित्रासमोर जाऊन उभी राहिली. पाच मिनिटांनी अचानक म्हणाली, " अवी, समुद्र अथांग आहे ना रे? ही वेडी त्या अथांगतेचा माग काढत किती दिवस अशी उभी राहील. शेवटी कधी ना कधी तरी तिला थांबावे लागेलच. इतकेही कळत नसेल का त्या समुद्राला? " त्यावर मी काहीतरी बोलून तिची खेचली. पण तिच्या बोलण्याचा अर्थ मला समजला तोवर फार उशीर झाला होता. एक दिवस आईने स्वातीचे लग्न ठरल्याचे सांगितले. मी उडालोच.

मी पुढाकार घ्यायला हवा होता..... पण आज-उद्या करत बसलो. लहानपणापासून बरोबर आहोत आपण अवी, अरे मी तुझ्याशी लग्न करेन असे वाटलेच कसे तुला? वगैरे छापाची वाक्ये तिने माझ्या तोंडावर मारली तर माझा भयंकर अपमान होईल या भीतीने व ताठ्याने गप्प बसलो होतो. तिथवर ठीक होते. तो काळच जरा वेगळा होता. आजकाल सारखी मुलेही तितकी डॅशिंग नव्हती-मी तर मुळीच नव्हतो. वर पुरषी अहंकारही होताच. आणि मुलींचे तर फारच चमत्कारिक प्रकार होते. शिवाय घरच्यांची भीतीही होतीच. तिचे लग्न ठरल्याचे कळल्यावर मी भयंकर चिडचीडा झालो होतो. तशातच एक दिवस स्वाती संध्याकाळी आली. घरी सगळे होते म्हणून मग तीच म्हणाली चल रे जरा पार्काच्या कट्ट्यावर जाऊ. मी फार चिडलो होतो तिच्यावर... ‌स्वत:वर. मला मुळीच इच्छा नव्हती पण गेलो.

कट्ट्यावर बसलो. दोघेही शांत..... म्हणजे मी आतून धुमसत होतो पण ती शांत होती. माझ्याकडे तोंड करून चक्क मांडी घालून ती बसली. एकटक पाहत होती. तिचे डोळे माझ्या मनाचा तळ शोधत होते. मी घाबरलो. आता मी तिच्यावर प्रेम करतोय हे तिला कळू द्यायला मी तयार नव्हतो. त्या भरात तिला विचारले, " काय पाहते आहेस? उगाच नको ते प्रयत्न करू नकोस. जे कधी नव्हतेच ते कितीही शोधलेस तरी दिसणार नाहीये. तू तुझ्या जगात जग मी माझ्यात मग्न, मजेत आहे. अशीही फार वर्षे डोक्यावर बसली होतीस आता पुरे झाले. मग काय..... नवरा बराय ना तुझा? का तुझ्यासारखाच येडचाप?"

ती काहीच बोलली नाही. तिचे डोळे अजूनही तसेच खिळलेले होते. ओठ एकमेकांवर गच्च रुतलेले. वाटले ही उरी फुटेल आता...... पण नाही. ती स्वतःवर संयम ठेवून होती. " अवी कदाचित हेच योग्य होते म्हणूनच तू..... " " काय काय म्हणायचेय तुला? म्हणूनच काय...... तुला काय वाटले गं? मी प्रेम करतोय तुझ्यावर? आणि समजा असलो करत तर आता काय त्याचे? तू नव्हतीस ना करत माझ्यावर प्रेम? असतीस तर कधीतरी म्हणाली असतीसच ना? तेव्हा आता माझे कसे होईल.... असल्या भलत्या गैरसमजात राहू नकोस. मी मस्त मजेत आहे. आणि नीट ऐकून ठेव, तुझे लग्न झाले की आपला संपर्क संपला. म्हणजे कधीमधी तू आलीस माहेरी आणि ओघाने आपण समोर आलो तर ठीक आहे पण मुद्दामहून संबंध ठेवायची काही गरज नाहीये. समजलं तुला." बिचारीवर मी विनाकारण तुटून पडलो होतो. खरे तर मी स्वतःलाच बोल लावत होतो. ती मात्र अतिशय दुखावली गेली.

मुकपणे तिच्या डोळ्यातून दोन अश्रू ओघळले. करंटा मी नुसताच पाहत बसलो. माझ्या जीवाचा माझ्याच हाताने मी गळा घोटला होता. ती कट्ट्यावरून उतरली. माझे दोन्ही हात स्वतःच्या हातात घेऊन माझ्या बोटांची चुंबने घेतली. जणू सांगत होती त्या समुद्रावर मात कर.... .. एकवार मला नजरेत साठवून घेऊन ती हलकेच दूर झाली. तिरिमिरीने मी घरी आलो. तिच्याशिवाय जगणे शक्य नाही हे कळून चुकलो होतो. अजूनही मी पुढाकार घेऊ शकत होतो. थोडा गोंधळ माजला असता तिच्या घरी पण इतके अशक्यही नव्हते. काय करू मी.... नुसता तळमळत होतो. कधीतरी झोप लागून गेली.

स्वाती नवऱ्याबरोबर जायला निघाली होती. गाडीत बसण्या आधी तिने माझ्याकडे पाहिले, जणू विचारीत होती, " का? का असे केलेस रे? " नाही नाही असे होता नये. अडव तिला.... अजूनही वेळ आहे. थांब थांब, स्वाती...... " काय रे? स्वप्नातही स्वातीबरोबर भांडतो आहेस का? कठीण आहे बाबा तुमचे. मला तर वाटले होते की ती माझीच सून होऊन या घरात येईल. पण ज्याला हे उमगायला हवे होते तोच डोळे बंद करून बसला आहे. नशीब एकेकाचे. इतकी चांगली मुलगी बायको व्हायलाही नशीबच हवे हो. " आई बोलत होती. मी झोपेचे सोंग घेऊन पडलो होतो. आईचे हे बोल ऐकले मात्र आणि पटदिशी उठलो. आईला मिठी मारली...... मातोश्री आपला विजय असो. असे म्हणून पटापट आवरून स्वातीच्या घरी पोहोचलो.

स्वाती ऑफिसला निघतच होती. तिचे आई-बाबा, बहीण सगळे आजूबाजूला होतेच. काकू म्हणाल्याही, " अरे अवी तू? आत्ता यावेळी? ही तर निघालीच आहे. तुला ऑफिस नाही का आज? " स्वाती गालातल्या गालात हसत होती. तिला मी येणार याची खात्रीच असावी. मी पुढे होऊन तिच्या बाबांना म्हटले, " काका मी अवी. तुम्ही मला लहानपणापासून ओळखताच. अजून काही माहिती हवी असेल तर आई-बाबा देतीलच. शिवाय ही स्वातीही देईल. काय गं देशील ना? " " अरे अवी हे काय सांगतो आहेस तू? तुझी कसली माहिती..... काय गं स्वाती काय म्हणतोय हा? " बाबांनी स्वातीला विचारले तशी तिने नुसतेच खांदे उडवत त्यालाच विचारा असे खुणावले. " पुन्हा सगळ्या नजरा माझ्यावर. त्यात भर आमच्या मातोश्री व पिताश्रीही तिथे येऊन पोहोचले. " अवी अरे इथे काय करतो आहेस तू? " " आई, अग माझे नशीब इथे आहे ना त्याला घेऊन जायला आलोय गं. " मग काकांकडे पाहत मला स्वातीशी लग्न करायचे आहे हे मी एका दमात सांगून टाकले. तशी टाळ्यांचा कडकडाट झाला. " स्वाती, अगं बोलला गं बाई हा मुखस्तंभ. चला आता तयारीला लागा." मातोश्रीं बोलल्या.

" म्हणजे, हिचे लग्न ठरले नव्हतेच का? तुम्ही सगळ्यांनी मिळून हा बनावं केला होता तर.... स्वाती तू पण? " मी आणखीनच बावळटपणा केला. आमचे लग्न झाले. पुढे बरीच वर्षे यावरून सगळे मला चिडवत. मी ही चिडवून घेत असे. माझी स्वाती मला मिळाली होती. काय सांगू सुनेला.....आजकाल माझ्या स्वातीची फार आठवण येतेय गं. पुन्हा एकदा ती त्या चित्रातल्यासारखीच समुद्राकडे एकटक नजर लावून उभी आहे. आता मला जायला हवंय. माझी स्वाती थकलीये आता........ तिष्ठत उभे राहून राहून तिची दुबळी कुडी दमून जाईल. जायला हवे...... उशीर करून नाही चालणार.

" निलेश अरे बाहेर का उभा आहेस? आजोबा कुठे आहेत? " विजयाने दार उघडत विचारले. तसे तिला बाजूला सारत निलेश आत घुसला. "अग, आजोबा घरातच होते. कधीचा बेल दाबतोय पण उघडतच नाहीयेत ते दार. आजोबाsss.... अगं हे बघ गॅलरीत त्यांच्या खुर्चीत बसलेत. आजोबा, किती वेळ मी बेल वाजवतोय. असे बघताय काय नुसते? आजोबा....... " असे म्हणत निलेश आजोबांचा हात हातात घ्यायला गेला. पण........

15 comments:

  1. मस्त जमलीय गोष्ट ।

    ReplyDelete
  2. आशाताई तुम्ही पावती दिलीत,बरे वाटले.अनेक आभार.:)

    ReplyDelete
  3. मस्त झालीये ग गोष्ट एकदम हळवी!!!

    ReplyDelete
  4. masta jhalie goshta..

    flow khup chhan aahe...

    ReplyDelete
  5. भावस्पर्शी गोष्ट झाली आहे. माझ्या मनाला हेलावून गेली. हळुवार नाते उलगडले, मनाचा संगणक सुरेख पद्धतीने साकारला आहे.

    ReplyDelete
  6. खुपच छान जम आहे कथा. हळुवार उमलत जाते. आवडली :).

    ReplyDelete
  7. मुग्धा,अनुक्षरे प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.

    ReplyDelete
  8. गौरी, रोहिणी तुम्हाला आवडली हे वाचून आनंद झाला. आभार.

    ReplyDelete
  9. विशाल स्वागत व आभार.:)

    ReplyDelete
  10. अग्ग खर म्हणजे कालच वाचली होती मी ही पोस्ट पण प्रतिक्रिया देण्याचे राहुन गेले.क्षमा असावी.
    तुझे प्रत्येक लिखाणाची किती आणि केवढी तारीफ़ करावी..शब्द्च अपुरे...खुप मस्त जमली आहे गोष्ट..

    ReplyDelete
  11. खुपच भावस्पर्शी !!

    ReplyDelete
  12. माऊ अग तुला आवडली ना यातच सगळे आले की.:)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !