जाता जाता एक नजर इथेही........

Monday, December 21, 2009

दाद द्यायलाच हवी असे........

हल्लीच माझ्या मैत्रिणीच्या मुलाची बॅग गडबडीत रिक्शातून घ्यायचीच राहून गेली. मुलगा बिचारा अगदी घाबरला, गोंधळला....कपडे-सामान सुमान गेले वर आई-बाबा ओरडतील ही भिती. रिक्षा तर गेली निघून. बरे याच्याकडे सामान जास्त असल्याने मित्र आलेला सोबत दुसऱ्या रिक्शातून आणि त्याने हा घोळ केलेला. आता मित्राला किती दोष देणार आणि देऊनही उपयोग काय..... बॅग थोडीच मिळणार होती. शेवटी मन खट्टू करून हा घरी पोचला. दुसऱ्या दिवशी मित्राचा फोन.... रिक्षावाल्याने बॅग घरी आणून दिली आहे. एका क्षणात सगळ्यांचे चेहरे खुलले. आनंदीआनंद पसरला. त्या रिक्षावाल्याला बक्षीस द्यायलाच हवे असे पटकन मैत्रीण म्हणाली. हल्लीच्या जगात इतके चांगले कपडे, इतर सामान कोण आणून देतेय परत. प्रामाणिक होता गं अगदी. रिक्षावाल्याच्या या प्रामाणिक कृतीने या सगळ्यांची रुखरूख संपली. मुलाची सुटी आनंदात जाणार.

ही घटना जितक्या लोकांना कळली तितक्या सगळ्यांचा चांगुलपणावरचा विश्वास वाढीस लागला. उद्या जर आपल्याला कोणाचे काही सामान सापडले आणि त्यात त्याच्या मालकापर्यंत पोचण्याचा कुठलाही मार्ग उपलब्ध असेल तर ते नक्कीच पोचते केले जाईल हा मनात असलेला भाव अजून दृढ झाला. मला वाटते तात्कालिक फायदा तर झालाच पण दूरगामी परिणामकारक फायदा जास्त महत्त्वाचा. या घटनेतून काही घटना आठवल्या. प्रामाणिकपणा हा वयातीत व सांपत्तिक स्थितीशी अजिबात संबंधीत नसतो. तो मुळात मनातच असावा लागतो. अतिशय पैसेवाले लोकही उचलेगिरी, भामटेगिरी करताना आपण पाहतोच. आणि एखादा अत्यंत गरीब अचानक सापडलेले कोणाचे पैसे सचोटीने परत करताना दिसतो. खरे तर त्याची परिस्थिती फार वाईट असते पण मनाने तो सच्चा असतो. विश्वास या शब्दाचा अर्थ त्याला कळलेला असतो. बरेचदा बाहेरच्या देशात हे चांगुलपणाचे अनुभव जास्त येतात असे दिसते परंतु मला मात्र नेहमी वाटते प्रामाणिकपणा देशातीत आहे. कारण त्याचे मूळ तुमच्या संस्कारात-मनात रुजलेले असते.

लोकलने रोज प्रवास करणाऱ्या सगळयानांच डब्यात येणाऱ्या कानातले, क्लिप्स, पिना, तत्सम खजिना घेऊन येणाऱ्या बायका-पोरी म्हणजे खास जिव्हाळ्याच्या. घ्यायचे असो वा नसो स्त्रीसुलभ हौस असतेच प्रत्येकीला. मैत्रिणींसोबत चर्चा करत हे बघ गं... कसे दिसतेय? घेऊ का? वगैरे संवाद नेहमीचेच. या विकायला येणाऱ्या पोरी-बायकाही उत्साहाने व धंद्याचे टेक्नीक अंगी बाणवून असतात. मग कधी कधी एखादी नेहमीची खास सलगीने जवळ येईल व ताई हे बघा खास तुमच्याकरता आणले मी. खूप छान दिसेल तुमच्या कानात. घेता का? अशी साखरपेरणी करत हक्काने तुम्हाला घ्यायला भाग पाडेल. अशातलीच ती एक. संध्याकाळची ठाणा लोकल ठरलेली होती. अगदी ती चुकलीच तर तिच्या मागची. रोजच ही साधारण विशीच्या आसपासची मुलगी पाठीवरच्या झोळीत तान्हुले आणि हातात चार खच्चून भरलेले ट्रे घेऊन भायखळा- करी रोडच्या मध्ये चढे. मरणाची गर्दी त्यात बाळ आणि या ट्रेंचे वजन. मला तर भितीच वाटे. पण ही एकदम बिनधास्त.

स्वच्छ धुतलेली टेरीकॉट-पॉलिएस्टर मिक्स साडी, नीट विंचरलेले केस. पावडर-टिकली लावून हसतमुखाने गोड गोड बोलत माल खपवत असे. दिवाळी अगदी दोन दिवसावर आली होती. जोतो काही न काही खरेदीच्या मागे होता. सगळ्यांच्या मनातला उत्साह चेहऱ्यावरही दिसत होता. ही लगबगीने माझ्याजवळ आली. ताई हे पाहिलेत का? तुम्हाला आवडतात ना तसेच खडे व मोती एकत्र असलेले सुंदर कानातले आणलेत मी. थोडे महाग आहेत पण खऱ्या मोत्याला मागे टाकतील, एकदम झकास आहेत. घ्या न ताई. ती आर्जवे करू लागली. कानातले खरेच छान होते. मी एक घेतले. पैसे द्यायला पर्स उघडली आणि लक्षात आले की एकदम पाचशेचीच नोट आहे. नाहीतर दहा व पाच. कानातले पंचावन्न रुपयांचे होते. शिवाय मी टिकल्याही घेतल्या होत्या. सगळे मिळून साठ रुपये झालेले. तिच्याकडे सुटे नव्हतेच. आता आली पंचाईत. ती म्हणाली ताई ठाण्याला खूप वेळ आहे मी तोवर आणत्ये सुटे करून.

मी तिला पैसे देऊन टाकले. समोरच बसलेल्या दोन-तीन अनोळखी बायकांनी, अहो कशाला दिलेत इतके पैसे?काय मूर्खपणा.... असा दृष्टिक्षेपही टाकला. पण मी दुर्लक्ष केले. दादर आले आणि पाहता पाहता डब्यात प्रचंड गर्दी झाली. जरा इकडचे तिकडेही व्हायला जागा नव्हती. करता करता भांडुपाला गाडी आली.... निघाली आणि ती मला प्लॅटफॉर्मवर दिसली. माझ्या समोरच्या बायांना पण दिसली. एक पटकन म्हणाली, " आता ही बया कसली परत करतेय तुमचे पैसे. गेले समजा. नको तिथे विश्वास कशाला ठेवायचा मी म्हणते. " मलाही एक क्षणभर वाईट वाटले. निदान हिने मला सांगायचे तरी.
मी पैसे तीच्या लेकराला दिले असते तर मला आनंद तरी झाला असता. आताही लेकरालाच मिळतील पण कुठेतरी माझी रुखरूख असणार त्यात. आणि पुढे मी कधीही कोणावर विश्वास ठेवणार नाही. जाऊ दे झालं....एक धडा मिळाला. असे म्हणून मी विषय डोक्यातून काढून टाकला.....अर्थात म्हणून तो गेला नाहीच.

दिवाळी धामधुमीत गेली. जोडून चौथा शनिवार व रविवार आल्याने मस्त मोठी सुटी मिळाली. या सगळ्या मजेतही कुठेतरी मनात ठसठस होतीच. नंतरचा आठवडाही काहीतरी होत राहिले आणि माझी नेहमीची ट्रेन काही मिळाली नाहीच. पंधरा दिवसांनंतर संध्याकाळी खिडकीत बसून छान डुलकी लागलेली तोच माझ्या हातावर एकदम काहीतरी जड वजन जाणवले. कोणी काय ठेवलेय म्हणून डोळे उघडले तर ही समोर. " ताई, जीवाला नुसता घोर लावलात माझ्या. अवो माझा नवरा एक नंबरचा उडाणटप्पू. रोजच माझे पैसे हिसकून घेतोय. कसेबसे लपवत फिरते मी. त्यात तुमची ही जोखीम गेले पंधरा दिवस सांभाळून जीव दमला माझा. हे घ्या तुमचे उरलेले पैसे. मोजून घ्या नीट. म्हनला असाल ना चंद्रीने पैसे खाल्ले म्हणून. ताई अवो हे पैसे घेऊन कुठं बंगला बांधणार का मी. रोज तुम्हाला तोंड कसे दाखवले असते सांगा बरं. या लेकराची शपथ. आपल्याला नग बा कोनाचा पैसा." असे म्हणून तिने ४४० रुपये माझ्या हातावर ठेवले. तिचा तो आवेश आणि खरेपणा मनाला भिडून गेला. त्यातलेच शंभर रुपये तिच्या लेकराच्या हातावर ठेवले आणि थँक्स मानले. खुशीत गाणे गुणगुणत मला टाटा करून गेली.


गावदेवी मार्केटमध्ये जुनेपुराणे कपडे घरी येऊन घेऊन जाणारे चारपाच जण बसतात. एकदा असेच तिथे चौकशी करत होते. तिथलाच एक मुलगा...साधारण बारा तेरा वर्षाचा असेल. म्हणाला, तुम्ही व्हा पुढे मी सायकलवरून येतोच मागोमाग. मी बरे म्हटले आणि निघाले. घरी गेले पाच मिनिटातच बेल वाजली. तो आलाच होता. कपडे बरेच होते. मग त्याने अगदी धंद्याच्या खास सराईत नजरेने प्रत्येक कपड्याचे मोजमाप केले. सिल्क कसे उपयोगाचे नाही. अजून पँट नाहीत का? साड्या काढा ना ताई अजून वगैरे बडबड करत शेवटी कसे उपयोगाचे कपडे कमीच आहेत मग कसे जमायचे अशी गोळाबेरीज करून काही पैसे माझ्या हातावर ठेवले आणि तो गेला. दुसऱ्या दिवशी दुपारी बेल वाजली, पाहिले तर हा उभा. मला पाहिले आणि खिशातून पाकीट काढले आणि माझ्या हातावर ठेवले. " अग बाई! हे तुला दिलेल्या कपड्यात का गेले होते?" नवरा नियमीतपणे सात वर्षे वैष्णवदेवीला जात होता त्यातल्या शेवटच्या ट्रीपचा प्रसाद, आठशे-नऊशे रुपये व एक मोठे देवीचे चांदीचे नाणे त्या पाकिटात होते. आणि पाकीट मी देऊन टाकलेल्या कोटाच्या खिशातल्या आतल्या कप्प्यात होते. त्यामुळे कळलेच नव्हते.

त्या पोराने इतके पैसे व नाणे परत आणून दिलेत हे मला खरेच वाटेना. त्याचे आभार मानून त्याला शंभर रुपये बक्षीस म्हणून दिले. तशी स्वारी खूश झाली. म्हणाला, " दिदी भगवान का प्रसाद हैं ना उसमें. में अगर ये सब नही लौटाता तो बहोत पाप लगता. और मैं जानता था आप बहोत खूश होके मुझे बक्षीस दोगी. अब ये मेरा हक का पैसा हैं. बराबर ना? " मी हो म्हणून त्याचे पुन्हा कौतुक केले तशी, फिर कपडा देना हो तो बुला लेना मैं आजाउंगा. असे म्हणत उड्या मारत पळाला.

माझी आजी एकटीच एकदा एशियाडने प्रवास करत होती. नाशिक-पुणे. मध्ये कुठेतरी बस थांबली तशी ही बाथरुमला जायला उतरली. बाजूच्या माणसाला सामान ठेवलेय रे बाबा, आलेच मी पटकन असे सांगितलेले. पण काहीतरी गडबड झाली आणि आजी परत आली तर बस गायब. आजी गोंधळली. सामानही गेले. शिवाय आजीने पैसे बॅगेत ठेवलेले होते त्यामुळे आता घरी पुण्याला कसे जायचे हा प्रश्न पडला.

आजीभोवती गर्दी जमली. ती पाहून दुसऱ्या एशियाडच्या ड्रायव्हरने आजीला काय झाले म्हणून विचारले असता हे रामायण कळले. त्याने लागलीच फोन करून पुढच्या थांबण्याच्या ठिकाणी कळवले काय झालेय ते. वर त्यांना आजीला टाकून गेलेच कसे असा दम भरून आजींचे सामान उतरवून घ्या आजी मागच्या बसने येतच आहेत असे सांगितले. आजीला दुसऱ्या बसमध्ये बसवले. आजी म्हणाली, " दादा तिकिटाला पैसे तर नाहीत रे माझ्याजवळ. " तसे," आजी अवो चूक आमची हाये. आता त्या बसवाल्याने तुम्हाला शोधायला नको होते का? सांगा बरं....असे कोणी आजीला टाकून जाते का? काही काळजी करू नका. सामान वाट पाहतंय तुमची. नीट सुखरूप जा बरं का आता. "

आणि खरेच की, सामान आजीची वाट पाहत होते. बस पोचल्या पोचल्या एका कंडक्टरने आणून आजीच्या ताब्यात दिले वर सॉरी पण म्हणाला. नंतर आजीला मी विचारले, " आजी तुला भिती वाटली असेल ना गं....एकतर सामान गेले त्याचे दु:ख् राग व आता घरी कसे पोचणार याची चिंता. " आजी पटकन म्हणाली, " अग चिंगे सामानाची मला बिलकूल चिंता नव्हती. ते मिळणार होतेच. हा फक्त पुण्याला मिळतेय का मध्येच आणि मी घरी कशी आणि कधी पोचणार हा प्रश्न मात्र पडला होता. मला बराच वेळ आजीच्या विश्वासाचे नवल वाटत राहिले.

27 comments:

  1. तुझ्या पोतडीत मस्त मस्त अनुभव आहेत त्यामुळे आम्हाला अशा छान छान पोस्ट्स वाचायला मिळतात...छान लिहिलंय अगदी तुझ्याशी गप्पाच मारतोय असं वाटतंय...

    ReplyDelete
  2. अपर्णा अनेक धन्यवाद.:)

    ReplyDelete
  3. काय बोलावं एवढे प्रसंग? वाह कमाल आहे तुमची व त्या लोकांची.छान वाटलं वाचताना.

    ReplyDelete
  4. साधक कमाल त्या सगळ्यांची...:)धन्यवाद.

    ReplyDelete
  5. भाग्यश्रीताई,
    खरच खूप अनिभव आहेत तुमचे.

    माझ एक निरिक्षण आहे. बरेच वेळा गरिब माणसेच जास्त प्रामाणिक असतात. आपण गरिब असल्याचे त्यांना जास्त दु:ख नसते पण कोणी चोर किंवा फसवा म्हणल्यास त्यांना जास्त वाईट वाटते. सधन माणसे त्या मानाने कमी प्रामाणीक असतात.
    गावाकडचे १ डॉक्टर त्यांचे अनुभव सांगत होते. ते म्हणाले की त्यांचाकडे येणारे गरिब रुग्ण लगेच पैसे देतात. पण अनेक श्रीमंत लोक मात्र एकदम देतो म्हणत बरेच दिवस तंगवतात.


    अनिकेत वैद्य.

    ReplyDelete
  6. अनिकेत प्रतिक्रियेबद्दल आभार. खरे आहे तुमचे, बरेचदा असेच घडत असल्याचे दिसून येते.

    ReplyDelete
  7. मस्त मस्त पोस्ट आहे...या लोकांचा प्रामाणिकपणा आपल्यालाही शिकवून जातो ग!!!!
    आणि अनिकेत म्हणतोय ते खरेय हा प्रामाणिकपणा गरिबांकडे जास्त असतो!!!!

    ReplyDelete
  8. mastach lihile aahes ... ase kaahi baghitale mhanaje divas phaar chaan jato, punha punha vishwas thevavasa vatato.

    ReplyDelete
  9. अतिशय सुंदर आहेत अनुभव.. कधी तरी विश्वास बसतो, की आयुष्य सुंदर आहे.. लोकं चांगली आहेत या जगात.. सुंदर... !!

    ReplyDelete
  10. आयुष्यात अस काही घडल की खूप छान वाटत!! अन् चांगुलपनावरचा विश्वास अजुन वाढतो!!!

    ReplyDelete
  11. भानस, मी टॅगलंय तुला. माझी आजची पोस्ट बघ.

    ReplyDelete
  12. अनिकेतच्या मुद्याला दुजोरा!
    अनुभवाचे कलेक्शन छान आहे!

    ReplyDelete
  13. तन्वी गरिब जाणून असतो जरा काही झाले की त्याचा बळी जाऊ शकतो.

    ReplyDelete
  14. गौरी आजकाल दोन्ही बाजू इतक्या ठळक दिसत असतात. वाईटाची संख्या जास्त आहेच पण त्यात हे अनुभव आशा टिकवून धरतात.

    ReplyDelete
  15. मनमौजी खरेच आहे.

    ReplyDelete
  16. गौरी अग आत्ताच वाचले...सहीच. धन्स गं मला टॆगलेस. आता मलाही त्या धाग्यात घुसायला हवे...:)

    ReplyDelete
  17. आनंद प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  18. अहो जगात चांगुलपणा आहे म्हणूनच जग चाललेलं आहे. मुंबईला मी राहत असतांना असे चोराने लोकल मध्ये टाकून दिलेली कागदपत्रे, पास, लायसेन्स, आय कार्ड कोणाला जरी सापडले तरी मालकाच्या पत्त्यावर पाठवून देतात असा अनुभव घेतलेला आहे. एकदा तर कल्याणला उतरतांना माझ्या हातातील बेग व शर्ट या मधल्या जागेत एका विध्यार्थ्याचे आय कार्ड व पास चे पुच सापडले होते. बाहेर उतरल्यावर टे खाली पडले मी सुद्धा त्याच्या पत्त्यावर पाठविले होते. माझी एक सहपाठी स्त्री आहे. तिची बेग लोकल मध्ये चढतांना धक्क्याने विरुद्ध बाजूच्या गेटने बाहेर फेकली गेली होती. ती डब्यातच शोधात बसली. दोन दिवसांनी एक सदगृहस्थ तिच्या घरी येऊन बेग देऊन गेले होते.

    ReplyDelete
  19. रविंद्रजी अशी माणसे आहेत म्हणून तर थोडीतरी धुगधुगी आहे.आभार.

    ReplyDelete
  20. अगं तुझ्या ह्या दाद द्यायलाच हवी मध्ये माझा ही एक अनुभव घुसडते. आम्ही ४-५ वर्षांपूर्वी ३-४ दिवसांकरिता कोल्हापूरला जायचं ठरवलं. माझ्याकडे काही पैसे होते. त्यातले मी थोडे सॉर्टींग केले व निरनिराळ्या ठिकाणी ठेवले. ट्रीप करून आल्यावर काही कपडे इस्त्रीला दिले. एक साडी होती ती ड्रायक्लिन की रोल-प्रेस ला म्हणून दिली. इस्त्रीवाला नेहमीचाच होता. ३-४ दिवसांनी त्याच्याकडे गेले ते त्याने एक पाकिट काढून दिले. म्हणाला हे तुमच्या साडीमध्ये होतं. बघितल्यावर डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्या पाकिटात ११००० रुपये होते. मग त्या इस्त्रिवाल्याला शर्टचं कापड वगैरे दिलं. ह्या जगात अजून अशीही माणसं आहेत गं.

    ReplyDelete
  21. megh Swagat va anek aabhaar. kharech ase anubhav aale ki ajunhi jagat ashi manse aahet hyavar vishwas basato.

    ReplyDelete
  22. अनुभव चांगले आहेत. अशी फारशी माणसे राहिलेली नाहीत पण... किमान माझे स्वतःचे चांगले अनुभव नाहीत ह्या बाबतीत. असो...

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !