जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, August 20, 2009

अजीब दास्तां हैं ये......

पावसाने जोर धरला होता. पहाटेच उठून माझ्या रूमची खिडकी सवयीने उघडली होती. मस्त ओले थंडगार वारे अन मध्येच पावसाचे तुषार आत झेपावत होते. जरासे कुंद वाटत होते पण मला आवडतो पाऊस. रह रहके समीर समोर दिसत होता. अरे हो, मी - दिशा. जिथे आनंद, चैतन्य भरभरून नांदत असेल तिथेच मी रमते. आयुष्याला ओझे समजून वाहणारे लोक पाहिले की फार त्रास होतो मला. मी त्यांना सरळ नजरेआड करते. ही अशी जमात आहे ना की त्यांना कोणीही कितीही समजावले तरीही ते करंटेच राहणार. तेव्हा छोड दो. हां आता अगदी जवळचे काही असे वागतात ना तेव्हा चांगली हजेरी घेते त्यांची.

परवाचीच गोष्ट, रजत दोन दिवस डोक्याला हात लावून बसला होता. मान्य आहे नोकरी जाते का राहते हेच कळत नव्हतं त्यामुळे फार अस्वस्थ वाटत होत. पण असे न खाऊन, सुतकी चेहऱ्याने बसून काय होणार होते. नोकरी जायची तर जाणारच होती. त्यापेक्षा वाईटच घडणार आहे असे गृहीत धरून जॉब ऍप्लिकेशन्स कर म्हणून किती समजावलं तेव्हा कुठे हातपाय हालवले. त्याचे लक जोरदार होते, नोकरी गेली नाहीच पण नवीन नोकरीचे दोन कॉल्स आले. इंटरव्यूव्ह ही झाले आणि रजत आत्तापेक्षा चांगल्या कंपनीत व एक स्टेप वर पर्फेक्ट पॆकेज मिळवून पंधरा दिवसात जॉईन होतोय.

दिशू फक्त तुझ्यामुळे झाले बघ हे सगळे असे म्हणत होता. वेडाच आहे, सगळे तूच केलेस रजत फक्त असे हातपाय गाळून बसण्यापेक्षा तू किती आणि कशा कशात यश मिळवू शकतोस याची उदाहरणे देऊन देऊन मी तुला भंडावून सोडले. शेवटी कोपरापासून हात जोडत या शरणागतास जीवदान द्या देवी असे म्हणत तू उठलास अन हे फळ मिळाले. ती निमाही तशीच सदा रडतराउ, तिला तर कारणही लागत नाही. थोडे झापडले की येते ताळ्यावर मग दिलखूश हसते. म्हणते," खरेच दिशे तू नुसती आजूबाजूला असलीस ना तरीही मस्त लाइट मूड राहतो." अरे पण मी कशाला हवी सतत. तुम्ही स्वतःच बना की आनंदाचे कारण. ह्म्म्म्म, मरो. कधी न सुधारणारे गाडे आहे यांचे.

आता इतका मस्त पाऊस लागलाय, छान आले- गवती पात घालून आईने सही चहा बनवलाय. तो घेत केनच्या झोपाळ्यावर बसून मी भिजतेय पण आमच्या गृपमधले तिघेचौघे चिडचिडत असतील नुसते. रेश्मा तर नंबर एक आणि शेखर म्हणजे, पोचलाही असेल स्टेशनवर. आता मध्यरेल्वे म्हणजे जरा चार थेंब शिंतडले की आमची रडारड सुरू. सुखाने उबदार दुलईत गुडुपं झोपायचे सोडून हा बसला असेल सात पासून प्लॅटफॉर्मवर. दिशे चल जरा खबर घे त्याची, कुठे गेला माझा सेल? अरे काल तर इथेच........, हां सापडला. चार मिस कॉल, कमालच झाली. कोण बरे हवालदिल झालेय एवढे? ओहह्हह, समीर. सही यार दिशा, दम हैं तुझमें....पहाटेपहाटे आठवण काढत होतीस ना. हा अल्याड कधी आला? गेल्याच आठवड्यात चॅट केले तेव्हा बोललाही नाही येतोय ते. सहा महिन्यांनपूर्वीच तर गेला होता मग........ आणि पहाटे चारला पहिला कॉल, काहीतरी घोळ घातला वाटते. समीर तरी मी तुला म्हणत होते सुखाचा जीव दुःखात घालू नकोस. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावायची सवय जायची नाही रे तुमची. नोकरीच काय प्रेमातही तुम्ही सारखे उडाच इकडेतिकडे. छे! कधी कळणार रे तुला?

तोच पुन्हा सेल वाजतो, समीरचाच नंबर दिसतो. तशी, " हाय, हँडसम. तू कधी आमच्या देशात टपकलास? आणि काय पहाटे चारला पहिला कॉल, अरे मी मस्त गुरगुटून झोपले होते छान छान स्वप्ने बघत. ती सोडून तुझा कॉल घेईन असे वाटलेच कसे तुला?" पलीकडून काहीच आवाज येत नाही. काय झाले असावे बरे, " सम्या गाढवा आता बोलशील का काही का ठेवून देऊ फोन? काय, काय अरे मला ऐकू येईल इतक्या आवाजात तरी बोल. आणि रडतो आहेस का तू? काय झाले समीर? अनुजा कुठेय? भांडलास का पुन्हा? सॊरी बहुवचनात विचारते, तुम्ही भांडलात का एकमेकांशी? छान. अरे इतके हजारो मैलांचे अंतरही तुम्हाला रोखू शकत नाही म्हणजे शर्थ झाली तुमची. आणि काय रे, तू इकडे कसा? नाही म्हणजे, जॉब गेला- सोडला? ओके. संध्याकाळी सात वाजता नेहमीच्या ठिकाणी. चल देन. वडापाव हाण कोपऱ्यावर जाऊन आणि मस्त ताणून दे. संध्याकाळी भेटूच, डोक्याला आराम दे तोवर....बाय बाय. " चला हसला थोडंसं तरी. हा सम्या म्हणजे, मोजून दहा शब्द बोलला. काहीतरी बिनसलेले दिसतेय. याच्या नादात चहाही गार झालाय आणि पाऊसही हिरमुसलाय. शी यार समीर, ठंडी हवा का झोका बनके रहो बोल बोल के थक गयी में, पर तू सुनताच नही.

आईची हाक येते, "दिशा... ए दिशा, अग उठलीस ना? ऑफिसला दांडी मारून चालणार नाही. म्हणजे तूच काल म्हणालीस ना असे त्याची आठवण करून देतेय. हो नाहीतर म्हणशील, का हाकलते आहेस घराबाहेर?" " ममा, मी उठलेय कधीच, अग सम्या अवतरलाय पहाटे पहाटे. संध्याकाळी उशीर होईल गं. मी बाथरुम मध्ये घुसलेय." आरशात स्वतःला पाहते, चेहरा जरा जास्तच खुललाय. समीर, माझा समीर...... चूप. दिशा, काय..... ताळ्यावर राहा. समीरला मनात दडवून ठेवायचे ठरलेय ना, मग? खसखसून तोंड धुते, समीर अनुजाचे लग्न ठरतेय हे लक्षात ठेव. हॆं म्हणे लग्न ठरतेय...... सारखी तर भांडत असतात. असू दे ते पाहतील भांडायचे का लाडात यायचे ते. संध्याकाळी चेहरा कोरा राहायला हवा. समीर तुझा नाही, कधीच नव्हता.... हे दिवसभर घोकत राहा. लडकी खुद को सम्हाल, रेस्ट यू वील मॅनेज. चल हस बरं आता. आरशातल्या दिशाला सलाम ठोकते अन खुदकन हसते. भरभर तयार होऊन आईकडे येते. " दिशा, अगं काय खास? खूप दिवसांनी मरून कलरचा तुझा आवडता चुडीदार घातलास, सुंदर दिसते आहेस. पण हे काय, फक्त घड्याळ. कानातलेही नाही घातलेस? थांब, मोत्याचे टॉप्स घाल हे. हा..... आता कसे. बरं हे घे सँडविच, गाडीत खा गं. पळ आता. "

" बाय ममा, संध्याकाळी उशीर...... गेले गं. " जाते. " कारटी मुद्दाम करेल, किती वेळा सांगितलेय येते म्हणावे पण छे..... वर काय तर म्हणे बाँबस्फोट झाला त्यातल्या सगळ्यांनी येत्येच म्हटले होते ना घरच्यांना...... दिशू तू कितीही लपवलेस तरी मला माहीत आहे तुला समीर आवडतो. एकदा तरी त्याला सांगायचेस ना मनातले. पण तू ऐकणार नाहीस कोणाचे..... " सुस्कारा सोडत आत जाते. स्कूटीवर दिशा गुणगुणत असते, " अजीब दास्तां हैं ये, कहाँ शुरू कहाँ खतम,ये मंझिले हैं कौनसी, न वो समझ सके न हम.........."

क्रमश:

5 comments:

  1. मस्तच... पुढच्या भागाची वाट पाहतोय...

    आणि हो, तळटीपेतल्या गाण्याने मन प्रसन्न झालं अगदी !

    ReplyDelete
  2. Sahi Hai Bhidu !

    Bole to, ekdum mood fresh ho gaya !

    ReplyDelete
  3. मालतिनन्दनAugust 21, 2009 at 3:28 AM

    मस्त कथा. उत्कंठा वाढली आहे. पण इतक्या चांगल्या मूडमधल्या दिशाला ते गाणे कां सुचावे हे समजत नाही. कारण ते तर एक विरहगीत (किंवा वैफल्यगीत आहे) असा माझा समज आहे. चु.भू.द्या.घ्या.

    ReplyDelete
  4. सतीश, दिपू स्वागत व आभार. फ्रेश मूड झाला एकून छान वाटले. प्रयत्न करते आहे, कळवालच.:)

    मुग्धा,अरूणदादा आभार.
    अरूणदादा ते गीत विरह-वैफल्याचेच आहे, पण इथे का टाकलेय..... आत्ताच नाही सांगत. :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !