जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, September 19, 2009

सामान्य माणसा, तू जप रे स्वत:ला.......


काल दुपारी नेहमीप्रमाणे ऑनलाईन पेपर वाचायला सुरवात केली. प्रथम लोकसत्ता उघडला, तर काय दुसरीच बातमी होती, " आठवले यांचे बिऱ्हाड रस्त्यावर, दिल्लीच्या बंगल्यातील सामान बाहेर काढले. " त्याखालोखालच चौथी बातमी,"सूडबुद्धीने वागणाऱ्या काँग्रेसलाच रस्त्यावर आणेन -रामदास आठवले." जे अपेक्षित होते तेच सगळे व्यक्तव्य आणि कृती. मटा , सकाळनेही या दोन्ही पद्धतीच्या बातम्या सविस्तर दिल्या आहेतच. इतका वैताग आला हे सगळे वाचून. राजकारण आणि राजकारणी यांची ही नाटके कधीच न संपणारी आहेत. आता निवडणूक हरल्यावर पटकन बंगला सोडायला हवाच ना? आठवलेसाहेबांनीच नव्हे हो सगळ्यांनीच -जेजे हरले-पडले त्यांनी निदान एवढे तरी तारतम्य दाखवावे. पण काय असते एकदा का गोष्टी फुकट मिळायची - जनतेच्या जीवावर जगण्याची सवय लागली ना की मग ' ना जनाची ना मनाची. '

आता हेच पाहा काँग्रेस आहेच शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसही आहे आता यांच्या विरोधात तिसरी आघाडी उघडून उभे राहिलेत म्हणून ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली आहे असे म्हणत विधानसभा निवडणुकीच्या या रणधुमाळीत ' साहेब ' आले का नाही चर्चेत? बरे जर बारकाईने पाहिले तर लक्षात येईल जे सामान बाहेर काढून ठेवलेय त्यात कुठलेही मौल्यवान सामान दिसत नाही. फुटकळ गोष्टीच दिसत आहेत. म्हणजेच महत्त्वाचे ते सगळे कधीच हालवले गेले असून निव्वळ बंगला अडवून ठेवलाय. पण म्हणताना मात्र सोफा, गादी, संगणक, फ्रीज वगैरे होते असे म्हटलेय. प्रत्यक्षात दिसत मात्र काही नाही. आता कृपया असे म्हणू नका हो की फोटो ना उरलेल्या कचऱ्याचा घेतलाय. इतका पण लोकांच्या अकलेचा-समजूतीचा कचरा करू नका.

या सगळ्यात एक प्रकार नेहमीच दिसतो तो म्हणजे असे एखाद्या मंत्र्यावर-खासदारावर कार्यवाही झाली ना की लागलीच ते इतर अनेक मंत्र्यांचा कच्चा-चिठ्ठा मांडून टाकतात. आत्ताही पाहा ना किती जणांना त्यांनी घसिटले आहे. रामविलास पासवान आले, मणिशंकर अय्यर, रेणुका चौधरी , मोहन रावले , रेंगे पाटील नावांमागोमाग नावे धडाधड बाहेर आली. पुन्हा काय तर मी सरळ मार्गी नेता म्हणून माझ्यावर ही कठोर कारवाई पण या इतरांचे काय हो? म्हणजे थोडक्यात त्यांना म्हणायचेय हे बाकीचे सरळमार्गी नेते नाहीत म्हणून प्रशासन त्यांना घाबरून आहे. आता यावर हे नेते उद्या हल्ला बोल करतील. ऍक्शन-रिऍक्शन, आग पेटत ठेवायचीच. बहुतेक एकमेकांना फोन करून पर्फेक्ट स्ट्रॅटेजीक प्लानींग करत असतील नाही.

आता एका बाजूने ऍक्शन झाली म्हणजे रिऍक्शन हवीच -- ठोशास ठोसा झालेच पाहिजे ना. म्हणजे त्यासाठीच तर हा ड्रामा घडवलाय. लागलीच मी दलित पक्षाचा नेता असून कॉग्रेस विरोधी भूमिका घेतल्यामुळेच हा सूड काँग्रेस घेत आहे, वगैरे वगैरे. शिवाय काय तर ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर ' यांचा फोटो व पुस्तके रस्त्यावर टाकलीत. हरे राम! अरे बाबा किती किती यातना देत राहणार त्या ' महान नेत्याच्या जीवाला.' घरात ना फ्रीज सापडला ना टीव्ही, म्हणजे साहेबांना डॉ. बाबासाहेबांच्या फोटोंची-ग्रंथांची जर तितकीच किंमत असती तर असे सोडून गेले असते काय? पण आता मात्र बाबासाहेबांना नेहमीप्रमाणे हाताशी धरून, नाही नाही वापरून बोंब ठोकलीये. लागलीच कार्यकर्त्यांनी मुंबईत काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली. आता सुरवात झालीच आहे, हे प्रकरण जितके चिघळवता येईल तितके हे चिघळवणार पण कसे तर स्वतः एअर कंडिशनर मध्ये सुरक्षित बसून. मुख्यमंत्रिपदावर दावा करणारे हे नेते लोकांपुढे हा असाच आदर्श ठेवून ठेवून स्वतः कसे कंटाळत नाहीत. एकतर भाडे थकवायचे , इलेक्ट्रिसिटी बील, पाण्याचे बील भरायचे नाही. टेलिफोन, गाड्या सगळ्या गोष्टी फुकटच्या वापरायच्या. वर काय तर ऍट्रोसिटी ऍक्ट चा आधार घेत दावे ठोकायची भाषा. अरे बिचारा एखादा गरीब दोन महिने जर इलेक्ट्रिसिटी बील भरत नाही तर त्याची वीज तोडता तुम्ही. जरा थोडी तरी लाज वाटू द्या.

शिवाय यात आणिक एक वेगळा पदर आहेच. लखनौत उभारलेल्या आंबेडकर स्मारकाचे बांधकाम जनहितासाठी थांबवावे म्हणून दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हे बांधकाम थांबवण्याचा निकाल दिला आहे. या अशा अडवून ठेवलेल्या सरकारी निवासस्थानांबाबतही अशीच एक याचिका दाखल करण्यात आलेली असून जर न्यायालयाने तातडीने निवासस्थाने खाली करवण्याचा आदेश दिल्यास हे पाहा आम्ही तर आधीच सुरवात केली आहे हे दाखवता येईल. आठवले साहेबांचे दुर्दैव की नेमके ते यात पहिले सापडलेत.

हे असले प्रकार कोणालाच नवीन राहिलेले नाहीत. प्रश्न हा आहे की राजकारणी लोक त्यांची खेळी खेळतात. दोन्ही बाजूने धुरळा उडवतात. रकानेच्या रकाने भरून वाहतात. मोडतोड-दंगली घडवून आणतात. पण या सगळ्यात बळी कोण जातेय? 'सामान्य जनताच ' ना? म्हणजे सामान्य जनतेच्या जीवावर बसून वर्षोनवर्षे स्वतःची पोळी भाजून घेतच आहेत. पण तेवढ्याने यांचे समाधान कधीच होत नाही. या दंगली घडवून आणून सामान्य माणसांचे जीव घ्यायचे. ' वेन्सडे ' मधले शब्द किती सत्य आहेत. इसमें मरता मेंही हूं. दुकान खोलू तो सोचना पडता हैं की नाम क्या रखूं? नाम देखके दंगेमें मेरी दुकान न जला दी जाये. ही भीती कधी संपणार?

आज इतकी वर्षे झाली आपला भारत स्वतंत्र होऊन तरीही अफझलखानावरून मिरजेत दंगल होते. सामान्य माणसे मरतात- जीवन विस्कळीत होते. अफझलखानाने जिवंत होता तेव्हा आपल्याला लुटले, मारलेच पण आज मरूनही स्वतंत्र हिंदुस्तानात-माझ्या भारतात हा नीच माणूस आमचे बळी घेतो आहेच. आणि हे राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी या घटनेला आणिकच चिथावतात. यापरीस दुर्दैव काय असावे. आपण कधीतरी ऐकले काहो पाकिस्तानात शिवाजी महाराजांवरून दंगल झाली. पाकिस्तानातील माणसे जखमी झाली/ मारली गेली. नाही ना? का? मग आपल्याकडेच का असे वारंवार होतेय? कुठल्याही नेत्याला याचा विचारही करावासा वाटू नये. सामान्य माणसा तू स्वतः तरी याला बळी न पडण्यासाठी विचार कर रे. तुझा वाली तुझ्या स्वतःशिवाय कोणीही नव्हता- आजही नाही व कधीही असणार नाही. हे घरातले अतिरेकी असेच तुझ्या छातीवर वार करत राहणार आहेत. तेव्हां सामान्य माणसा, तू जप रे स्वतःला.

3 comments:

  1. अगदी माझ्याच मनातलं लिहिलं . खरं तर मीच लिहिणार होतो या वर.. पण आता काहिच गरज नाही.
    इतके नेते गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत की त्यांना कांहीच फरक पडत नाही.
    ज्या इतर लोकांची नावं बाहेर पडली आहेत, त्यांचं काय होतं ते पहायचं..

    ReplyDelete
  2. महेंद्र,काहीही होणार नाही. यातला एकजण तरी स्वत:हून बंगला सोडेल? कालची गंमत वाचलीस ना?निरनिराळे रंग बाहेर येत आहेत, शिवाय सरड्याच्या जातीच्यांचे नित्याचेच प्रकार आहेतच.ह्म्म्म, कठीण आहे.
    आभार.

    ReplyDelete
  3. मालतिनन्दनSeptember 23, 2009 at 3:11 AM

    माझ्या मना बन दगड!

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !