जाता जाता एक नजर इथेही........

Monday, September 14, 2009

आनेवाला पल जानेवाला हैं.........

" अजय, आजकाल तुझं स्वतःतच राहणं फार वाढलंय..... , अरे मी काय म्हणतेय? आहेस का जागेवर? तुझं लक्ष कुठेय? "
" काय गं उगाच काहीही बोलतेस, हा काय तुझ्यासमोर आख्खा बसलोय ना? आणि लक्षही तुझ्याकडेच आहे. मोतिया रंगावर प्राजक्ताच्या देठाची फुले सगळीकडे फुलली आहेत. तू आज खासच दिसते आहेस. बाहेर भुरभूर पाऊस पडतोय मध्येच एखादा मोठ्ठा ढग आकाश व्यापून म्हणतोय मी कोसळणार आहे. चार टेबले मागे बसलेला मुलगा सारखा तुझ्याकडे पाहतोय. जितक्या वेळा तू मान वेळावलीस तितक्या वेळा तो अजूनच खेचला जातोय. कदाचित तो मनात मला शिव्या देत असेल,जळत असेल ...... म्हणत असेल काय लकी आहे. असल्या फाटक्या पोराबरोबर एवढी सुंदर पोरगी काय करतेय? "
" पुरे..... मला कळले की तुझे माझ्याकडे लक्ष आहे. अगदी मोतिया अन प्राजक्ताचे देठ वगैरे रंग कळत असल्याचे प्रमाण दिल्यासारखे बोलू नकोस. आणि तू कशाला त्या पोराकडे पाहतो आहेस? "
" बरं नाही पाहत. फक्त तुझ्याकडे पाहतो.... तू मघाशी काय म्हणत होतीस? हा, स्वतःतच राहणं...... झालंय खरं तसंच. "
" चला, निदान मान्य तर केलंस. आता काय घोळतंय, सलतंय, हवंय, खटकतंय.... ‍ जे काही असेल ते पटकन सांगून मोकळा हो बरं. "
" मोकळा होऊ? असं खरंच मोकळं होता येईल का गं? सगळ्या बाजूने आभाळ दाटून येतं अन धडाधडा पाऊस कोसळतो, अविरत, मूक्तपणे... तसंच भावनांच, विचाराचंही झालं असतं तर? "
" तू प्रयत्न तरी कर ना, असेही मनात कोंडून ठेवून काय साधतो आहेस तू? त्यापेक्षा कदाचित होशीलही मोकळा. "
" रमे, मानलं मी तुला. तू खरेच फार चिवट आहेस गं. माझ्याकडून काय ते वदवल्याशिवाय गप्प बसायची नाहीसच. "
" चला, निदान एवढे तरी तुला कळलेय ना, मग सुरू कर ....... ऐकतेय मी. "

" अगं फार काही नाही, नेहमीचंच वाक्य गं...... उद्या घेऊ, आणू, करू..... म्हणजे काय झालं, आज शेजारची पिंकी आईपाशी हट्ट करत होती. बार्बी हवी.... आईने समजूत काढत उद्या आणू हं का असे म्हटले. आता पिंकी पुन्हा उद्या हट्ट करेल ..... पुन्हा तेच संवाद होतील. बरं पैसे नाहीत म्हणून बार्बी आज आणता येत नाही हे आई पिंकीला सांगू शकत नाही. म्हणजे हे सत्य सांगायची तिची इच्छा नाही. पिंकी दररोज उद्या बार्बी मिळेल या स्वप्नात रममाण होईल आणि रोज आई तिला उद्याचा वायदा करत राहील.

आपणही अनेकदा स्वतःशीच जाणूनबुजून हा खेळ खेळत असतोच. त्या नादात आज जगायला मात्र विसरतो. ते वाण्याच्या दुकानावरील पाटीवर लिहिलेले असते ना गं, ’ आज रोख उद्या उधार ’ तसेच झाले आहे आपल्या ’ आजचे ’. अनेक भावना, प्रेम, संवेदना, जाणीवा हे सगळेच पैशाप्रमाणेच उधार ठेवायला लागलोय आपण. आपल्याला हवं ते मिळणारच नाही या मनात कुठेतरी खोलवर रुजलेल्या भयाने आजचा दिवस कधीच जगत नाही. अगं, आपली सगळी धडपड, कष्ट, मेहनत कशाकरिता करतो आहोत आपण? आनंदासाठी, सुखाने जगण्यासाठीच ना? हे सुखाने जगणे कधी तर उद्या-भविष्यात, बरोबर? अग पण मग आजच्या जगण्याचे काय? आणि कधी काळी आज जो मागे भविष्यात होता तेव्हाही आपण जगलोच नाही ना. हे चक्र संपतच नाहीये गं. त्यामुळे आजचा ’आज’ फार दु:खी व पोकळ झालाय. कंटाळलाय तो आता, हे धड ना ’ उद्या ’ धड ना ’ आज " व धड ना ’काल ’ मधले बेचव जीवन जगून. दोन क्षण थांबून मनातल्या भावना मोकळ्या कराव्यात म्हणून पराकाष्ठेने ह्या दुष्टचक्रातून स्वत:ला सोडवावे तर काय आजूबाजूला कोणाला वेळच नाहीये. जो तो माझ्यासारखाच धावतोय. अग ह्या उद्याच्या सुखाच्या सुप्त आशेने आपल्या सगळ्यांच्या मनाचा संपूर्ण कब्जा घेतलाय. एखाद्या अमली पदार्थाच्या नशेपासून सुटका मिळेल एकवार पण या संपूर्ण अशाश्वत हव्यासाला अंतच नाही. कुठेतरी आणी काहीतरी ठोस करून ’ आज ’ ला आजच जगायचेय गं मला. जमेल का, नाही जमवायलाच हवेय. आधीच उशीर झालाय. हे अंगवस्त्रासारखे त्वचेला चिकटलेले अपेक्षांचे-सुखाच्या व्याख्यांचे बांडगूळ माझा जीवनरसच शोषतेय. आता बास, यातले फोल फसवेपण मला गिळंकृत करण्याच्या आत मला यातून बाहेर पडायला हवे. आजच्या आज मध्ये भरभरून जगण्यासाठी. "

" ए रमे, अग अशी काय पाहते आहेस? काय मला पिटवायचा विचार आहे का? त्या पोराला वाटतेय की मी तुला काहीतरी भयंकर सांगतोय. अग तो भराभर फोन करतोय. बहुतेक मित्र जमवत असेल मला धोपटायला. एका सुंदर मुलीची राक्षसाच्या तावडीतून सुटका......हाहाहा...अग बाई आता तरी हस ना? पाहिलेस का, पाऊसही उद्याच्या उधारीचा वायदा सोडून आजच कोसळू लागलाय. चल मनमुराद भिजूयात, भिजता भिजता मी गुणगुणतो तू ही साथ दे....... चल चल गं......आनेवाला पल जानेवाला हैं, होसके तो इसमें जिंदगी बिता दो " (गाणे येथे ऐका)

4 comments:

  1. Aanewala pal janewala hai kharay. chan aahe gosht pan.......................kiti porkat pana watato ha ata

    ReplyDelete
  2. आशाताई प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  3. भानस,
    अगदी खरे आहे...सध्या जगात असलेल्या ह्या धावपळीच्या जीवनात आपण जगणेच विसरून चाललो आहे...
    आला दिवस ढकल्तो आहे..कधी तरी बसून शांत विचार करतो की ही सर्वी धावपल कसा करिता...नंतर चे आयुष्या सुखात जावे म्हणून? पण एथे घडीचा भरोसा नाही नंतर मिळणार्या सुखकारिता आताचा आनद आपण हरवतोय....नंतर ते सुख मिळे पण की नाही ह्याची शाश्वती नाही.....असो
    छान झाले आहे पोस्ट...

    ReplyDelete
  4. गणेश,अनेक धन्यवाद.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !