जाता जाता एक नजर इथेही........

Friday, January 22, 2010

नटरंग....



चार दिवसांपूर्वी ऑरकुटवरील माझ्या एका मैत्रिणीने आवर्जून सांगितले की ' आपली मराठी ’ वर फक्त मोजक्याच दिवसांसाठी ' नटरंग ’ पाहता येईल. मग काय मी सगळी कामेधामे सोडून आपली मराठीचा रस्ता धरला. बैठक मारून अगदी तल्लीन होऊन संपूर्ण सिनेमा पाहिला. मुळात ' नटरंग ’ चे लेखक श्री. आनंद यादव म्हणजे, " झोंबी, नांगरणी, स्पर्शकमळे, गोतावळा, पाणभवरे आणि बरेच काही सशक्त लेखन करणारे माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक व माझा मित्र श्री. मिलिंद मुळिक( प्रसिद्ध चित्रकार ) याचे सासरे असल्याने अजूनच जिव्हाळ्याचे. तश्यांत मायदेशी आलेली असताना त्यांच्याघरी गेलो असताना, ध्यान-जप-मन:शांती अन इतरही काही बाबींवर बरीच चर्चा केलेली. शिवाय काकूंच्या हातची झकास ' कच्छी दाबेली व फर्मास चहाची ' मेजवानीही हाणलेली. आणि ' अतुल ’ आहे म्हणजे ' न पाहणे ’ हा पर्याय खुला नाही. दोस्त आहे राव - शूटिंग सुरू झाल्यापासून खबरी मिळत होत्या. तेव्हा कधी एकदा सिनेमा येतोय आणि मी पाहतेय असे झालेले. पण आम्ही पल्याडकर- जोवर डिवीडी-विसीडी बाजारात येत नाही आणि ती माझ्यापर्यंत पोहोचत नाही तोवर नुसती वाट पाहत राहायची. त्यामुळे मैत्रिणीचा निरोप मिळताच एका झटक्यात ' नटरंग ’ पाहिला. एका कलंदराच्या जीवनाचा कलेच्या वेडापायी झालेला तमाशा म्हणजेच ’ नटरंग ’.

गेले काही महिने या चित्रपटाची गाणी-विशेषतः अमृता खानविलकरचे ' वाजले की बारा ’ व सोनालीचे ' अप्सरा आलीs...’ व ’ नटरंग उभा - टायटल सॊंग ’, बरेच वेळा ऐकली होतीच. नटरंगच्या सगळ्याच गाण्यांचे बोल जास्ती परिणामकारक आहेत. खालोखाल संगीत. शिवाय झी ने प्रचंड गाजावाजा केल्याचेही ऐकत होते. मी ही कादंबरी वाचलेली नाही. त्यामुळे मूळ कादंबरी व लिहिलेली पटकथा यात किती फेरफार केले आहेत हे मला कळलेले नाही. तरीही श्री. यादवकाका व अतुल ही दोन अस्सल खणखणीत नाणी असल्यामुळे व झी ची प्रचंड प्रसिद्धी पन्नास टक्के डिस्कॉउंट करूनही माझ्या या चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा फारच जास्त असल्या पाहिजेत. लागोपाठ दोन वेळा एका दिवसाचे अंतर ठेवून ' नटरंग ’ पाहिला. गेले चार दिवस मनात तोच घोळत आहे. प्रथम पाहताना, दुसऱ्यांदा पाहताना व दोन दिवस उलटून गेल्यावरही काही विचार तेच राहिलेत. तेव्हा तो पाहून मला काय वाटले ते लिहीत आहे.

गेली बरीच वर्षे म्हणजे - ' आशिकी ’ ( १९९० साली आलेली, महेश भट दिग्दर्शित ) पासून चित्रपट येण्याआधीच सहा महिने आधी गाणी जिकडेतिकडे वाजवायची आणि एक जबरदस्त हवा निर्माण करायची हा पायंडा पाडला व रुजलाही गेला. अर्थात त्यासाठी गाण्यांमध्ये थोडा तरी दम हवाच. पण तो नसला तरीही सतत ऐकून गाणी लोकांच्या कानावर तरी रुळतातच. मराठीतही गेली काही वर्षे असे करण्याचा प्रयत्न दिसतो आहे. प्रसिद्धी हवीच त्याशिवाय निभाव लागणार नाहीच. परंतु मराठी सिनेमात यापेक्षाही अतिशय चांगली गाणी आलेली आहेत. तरीही 'वाजले की बारा ’ व ' अप्सरा आली ’ ही संगीत व अप्सरा-सोनालीमुळे जास्त प्रभावी झालीत असे वाटत राहते.

मुळात ’ गुणा ’ हा पैलवान गडी आहे. शेतमजुरी हा त्याचा पेशा. कमावलेलं शरीर असलं तरी मनात कुठेतरी तमाशा-त्यातला वग-लावण्या यावर त्याचा जीव - ओढा आहे. परंतु तो बाईलवेडा नाहीये. त्यामुळेच जेव्हां तमाशा काढायचा हे ठरते तेव्हा त्यात बाईही हवीच हे समीकरण त्याच्या डोक्यात नसतेच. कलेवरील प्रेमाने भारलेला कलावंत गडी. कलेवरच्या प्रेमापायी आणि घरातील दारिद्र्याने, ओढग्रस्तीने त्रासलेल्या गुणाचा हा एक प्रयत्न.

आता जेव्हां यात ' नयना ’ चे पात्र येते तेव्हा काही बदल होणारच हे अपरिहार्य आहेच. नयनाच्या पहिल्याच दोन तीन प्रसंगातच हा मर्दगडी तिला आवडतोय हे सहज कळून येते. म्हणजे तसे दिग्दर्शकाने हेतुपुरत्सर दाखवले आहेच. नयनाच्या जन्माचा/बापाचा उल्लेख असला तरी नयनाच्या पूर्वायुष्याचा अजिबातच उल्लेख नाही. परंतु एकंदरीत तिने तमाशात नाचण्यास तयार होणे, गुणाकडे पाहताना डोळ्यांतून, आवाजांतून- नखरेलपण-लाडिकपणा-आव्हान आणि लचकणे-मुरडणे पाहता तिला या मर्द गड्याची ओढ असावी असे जाणवते. त्याचे लग्न झाले आहे-पोरे-बाळे आहेत हे तिला माहीत असेल असे गृहीत धरले तर, तरीही तिचे गुणाला आकर्षित करणे म्हणजे तिला समाजाची-लोकलाजेची किंवा नीतिमत्तेची फारशी काही पर्वा नसावी हेही गृहीतच धरायला हवे. तमाशात नाच्या हवाच ही अट घालणे समजू शकते परंतु गुणा नाच्या बनतोय म्हटल्यावरही ती तिच्या अटीवर अडून राहते. एवढेच नाही तर तिचे डोळे खट्याळपणे व काहीसे कुत्सितपणे लकाकतात हे मात्र पटले नाही. नयनाला मर्द गडी हवा आहे मग खरे तर तिने गुणाला हे काम करूच देता नये. घडते उलटच.

तमाशा नाच्याबिगर होऊच शकत नाही आणि दुसरे कोणी तयार होत नाही हे पाहून एका असहाय क्षणी नाच्याची भूमिका स्वतःच करायचा उरफाटा निर्णय गुणा घेतो. " अरे पर म्या तर राजा हाय नवं........मग......." हा प्रश्न खरे तर तो स्वतःलाच विचारत असतो. गुणाची ती अगतिकता अतुलने चांगली व्यक्त केली आहे. केवळ सदैव पाहिलेले-खरे झालेच पाहिजे असे स्वप्न पूर्ण व्हावे, आपले-घरादाराचे भविष्य घडावे या आशेने नाचा होण्याची तडजोड स्वतःहून स्वीकारतो. पण मुळातला तो पैलवान गडी. केवळ मंचावर फालका माणूस आहे हे समाज पाहत नाही त्यामुळे पुढे जे जे घडते अन गुणाला ही औटघटकेची भूमिकाच खाऊन टाकते याचे चित्रण परिणामकारक झाले आहे.

अजून एक अतिशय खटकलेली घटना म्हणजे गुणाला पुढे करून काम साधणे. हे गळी उतरणे कठीणच आहे. क्षेत्र कुठलेही असेल पण काम साधण्यासाठी नाचाला पुढे करणे हे अशक्यच आहे. तमाशात नयना सारखी नखरेल, नाजूक तरुण नार असताना नाचाला शिंदेशी अशी जवळीक करायला लावून सुपारी मिळवणे म्हणजे अजब गणित आहे. बरे हा शिंदे काही ' त्यातला-समलिंगी संबंधातला ’ दाखवलेला नाही की साधा बोलण्यातूनही तसा उल्लेख नाही. आणि गुणाचे हे असे लाडेलाडे बोलणे-घोळात घेणे एकवेळ नयनाबाई तिथेच बसलेली असताना झाले असते तरीही खपले असते. तिचे मादक कटाक्ष-देहबोली व गुणाचे शब्द. पण तसेही घडत नाही. केवळ पुढचे नाट्य घडवता यावे यासाठी हा प्रसंग रचला गेलाय असेच वाटत राहते.

पुढचा सारा प्रवास-प्रसिद्धी भरभर होते. मग लगोलग पुरस्कारही मिळतो. मग येणाऱ्या सुपाऱ्या, राजकारणी लोकांची कारस्थाने- हेवेदावे आणि त्यातून नाचावर - गुणावर झालेला बलात्कार. नयनाबाईला सोडून गुणाला पळवणे- म्हणजे दोघांनाही पळवले गेलेले दाखवले असते तर जास्त खरे वाटले असते. गुणाचे घरी परत येणे. बाप मेलाय हे तेव्हा तरी कळले असेलच ना..... पण दोन मिनिटांचाही प्रसंग - विवशता - बोच काहीच नाही. अतुलने त्या दोन मिनिटांचेही सोने केले असते. मुळात गुणाची व्यक्तिरेखा व्यवस्थित खुलवायला हवी होती. त्याच्यातला कलाकार, लेखन सामर्थ्य फारसे काही भरीव दाखवले गेलेच नाही. चार टाळकी जमून जेव्हां एखादी सुरवात करतात तेव्हा एकदम काही बेष्ट असत नाहीत पण हळूहळू बदल होतोच ना? इथे तसे काही जाणवतच नाही. तसेच एकदा उध्वस्त झाल्यावर पुन्हा उभारी धरून झालेल्या गुणाच्या आयुष्याची कहाणी अक्षरश: गुंडाळली--नाही उरकूनच टाकली आहे. ' जीवन गौरव ' इतका मोठा मानाचा पुरस्कार प्राप्त व्हावा असे गुणाने काय केले हे उलगडतच नाही. म्हणजे प्रेक्षकांनी सगळे समजून घ्यायचे का? गुणातला ' तो-स्पार्क ' ना आधी नीट व्यक्त होत ना नंतर. मूळ कथानकात हे दाखवले असल्यास पटकथेचा जीव दुबळा झाला असे म्हणावे लागेल आणि मूळ पुस्तकातही ते नसेल तर मात्र तसे मुद्दाम असायला हवे होते असे वाटत राहते.

काही चित्रपट, दिग्दर्शक स्वतःच्या कसबावर जिंकून नेतात तर काही टीम वर्कने तरून जातात. इथे कलाकारांनी अभिनय सामर्थ्यावर व अजय-अतुलच्या संगीतावर सिनेमा तडीस लावला आहे. ’ गुणा-अतुल कुलकर्णी ’. नव्याने काहीही सांगायची गरज नाही. किती ताकदीचा व कसदार अभिनेता आहे हे सगळ्यांनाच ज्ञात आहे. या सिनेमातही प्रचंड मेहनत घेऊन अतुलने गुणाची दोन्ही रुपं अप्रतिम सादर केलीत. बायकापोरांची-बापाची जबाबदारी असूनही फारसे त्यात न गुंतता स्वतः:च्या स्वप्नांसाठी आयुष्य झोकून टाकणाऱ्या - भारलेल्या वेड्याची भूमिका अतुलने समरसून केली आहे. मुळात अतुलची शरीरयष्टी पैलवान प्रकारातील नाहीच. त्यामुळे मेहनत घेऊन तितके मजबूत-पीळदार शरीर कमावले आणि लगोलग इतके उतरवले की नाचाच्या चेहऱ्याला गरजेचा तो उभेपणा, गालफडे आत, मान काटकुळी...... मानले पाहिजे. नुसतेच अभिनय कसब या चित्रपटासाठी पुरेसे नसून भूमिकेसाठी देहबोलीची तितकीच नितांत गरज आहे हे जाणून ती गरज समर्थपणे पुरी केली आहे. मात्र कधीकधी जास्त शुद्ध बोलतो -शिक्षणामुळे आपसूक होणारे उच्चार डोकावतात. शिवाय नाच्याचे काही संवाद तोंडातल्या तोंडात वाटतात. लेकरू तोंडावर थुकते अन पाठ फिरवते त्यावेळी गुणाचा चेहरा जास्ती विदीर्ण व्हायला हवा होता - फाटलेले काळीज दिसायला हवे होते.

सोनाली कुलकर्णी( नंबर-२...
) ने मात्र झकास काम केले आहे. मला तिची एंट्रीच एकदम आवडून गेली. जत्रेत तिचे स्वतःच्याच मस्तीत बेभान होऊन नाचणे सहीच झालेय. तिचे लटके-झटके, मुरडणे मस्तच. तमाशाप्रधान नृत्यात तेच तेच असते तरी सोनालीने त्यात जान ओतली आहे. गुणाची बायको- विभावरी देशपांडे यांनी मन लावून भूमिका केली आहे. घर चालायला हवे म्हणून नवऱ्याने कामाला जावे, शेती करावी याकरिता तिचे गुणाला मनवणे, सासऱ्याची तगमग, नवऱ्याचे स्वप्न- त्याची ओढ, त्याची अगतिकता समजून घेण्याचा प्रयत्न, नाचा झाल्यावर ते काम सोडून दुसरे काहीबाही करावे चा वडिलाबरोबर केलेला प्रयत्न व सरतेशेवटी घडलेल्या घटनेने, समाजातील छीः थूने पोळलेली, आयुष्याचे वाटोळे झाले या भावनेने खचलेल्या गुणाच्या बायकोचे काम नीटस केले आहे. किशोर कदम यांचे काम नेहमीप्रमाणेच आहे. खास वेगळेपणा काहीच जाणवत नाही.ते आता टाईप कास्ट होऊ लागलेत. उदय सबनीस यांनी छोटेसेच काम नेटके केलेय. गुणाच्या बरोबरीला सगळ्याच कलाकारांनी योग्य ती साथ दिली आहे.

अजय-अतुल चे संगीत एकंदरीत चांगले झाले आहेच. गाणी मनात रेंगाळतात - काही काळाने आपण गुणगुणू लागतो. ’ खेळ मांडला ’ काळजाचा ठाव घेणारे बोल आणि अजय-अतुलचे संगीत, लाजवाब.

तुझ्या पायरीशी कुनी सान-थोर न्हाई,

साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई,

तरी देवा सरना ह्यो भोग तशा पाई,

हरवली वाट दिशा अंधारल्या धाई,

वोवाळुनी उधळतो जीव मायबापा,

वनवा ह्यो उरी पेटला,

खेळ मांडला,... देवा....खेळ मांडला |


सांडली गा रीतभात, घेतला वसा तुझा,

तुच वाट दाखीव गा, खेळ मांडला,

दावी देवा पैलपार, पाठीशी तू र्‍हा उभा,

ह्यो तुझ्याच उंबर्‍यात खेळ मांडला ||धॄ||


हे... उसवलं गणगोत सारं, आधार कुनाचा न्हाई,

भेगाळल्या भुईपरी जिनं, अंगार जीवाला जाळी,

बळं दे झिजायाला, कीरतीची ढाल दे,

ईनविती पंचप्रान, जीवारात ताल दे,

करपलं रान, देवा जळलं शिवारं,

तरी न्हाई धीर सांडला, खेळ मांडला ||१||

एकंदरीत दोन वेळा सिनेमा पाहीला, गेले काही दिवस अनेक ठिकाणी आलेला वृत्तांत, समीक्षाही वाचली. मुळातच माझ्या मनात शूटिंग सुरू झाल्यापासूनच एक अपेक्षा तयार होत होती. त्यात अतिरेक प्रसिद्धीचा मारा. हा सिनेमा नक्कीच एका उंचीवर नेणारा असेल हे मनाने आधीच ठरवून टाकल्यामुळे असेल पण काहीसा अपेक्षाभंगच झाला. मी चित्रपट मनाची पाटी कोरी ठेवून पाहिला असता तर कदाचित मत थोडेसे( थोडेसेच ) वेगळेही झाले असते. असे असले तरीही आपण सगळेच हा सिनेमा नक्कीच पाहणार व जरूर पाहायला हवा यात दुमत नाही. सिनेमा प्रभावी आहे व बराच काळ गुंतवून ठेवणारा - मनात रेंगाळत राहणारा आहेच. मुख्य म्हणजे नेहमीचा घिसापीटा मराठी सिनेमांचा मामला नसून वेगळेपणा आहे. तमाशाप्रधान, नुसतीच यथातथा करमणुक करणारा चित्रपट इतकेच समीकरण नाही, जरूर पाहा.

22 comments:

  1. link deshil ka? aapli marathichi..mala pahaychaay..
    lekh chhaan jhalay..

    ReplyDelete
  2. मी उद्या जाणार आहे पहायला. आजच तिकिट बुक करतोय.
    रिव्ह्यु साठी आभार.

    ReplyDelete
  3. मला ओळ ना ओळ पटलेली आहे. अगदी मीच लिहिलाय हा लेख असं वाटत आहे ! अर्थात श्रेय तुम्हाला हां !
    मला सुद्धा गुंडाळल्या सारखा वाटला चित्रपट. सगळं काटून छाटून थोडं थोडं दाखवलं आहे. तो कसा यशस्वी होतो हे बाजुलाच राहिलं.
    अतुलाचा पार्ट २. (जरा धाडसानेच लिहितोय हां)
    मला आवडला नाही. आवाज डब करायला हवा होता अतुल ने. मावशीचे संवाद ऐकूच येत नाहीत. नृत्यात अतुल एकच एक नृत्य करत राहतो. म्हणजे आपल्या सोनाली सोबत त्याने जे प्रशिक्षण घेतले त्याचा उपयोग मंचावर करताना अतुल दिसलाच नाही !

    मी गाण्यावर जास्त फिदा आहे की सोनालीवर हे अजून ठरवू शकत नाहीये !

    ReplyDelete
  4. अगं राणी "बाराची गाडी" अमृता खानविलकरची आहे...कदाचित फ़ुलवाच्या नृत्यदिग्दर्शनाचा प्रभाव असेल...(नवर्याच्या मित्राची बायको म्हणून आपलं उगाच फ़ुशारकी झालं...हे हे...)
    पण बाकी ही कथा थोडी अपुर्णच वाटली मलाही..कदाचित आपलीमराठी.com वर कापाकापी असेल असं वाटतंय पण तरी किती माहित नाही....झालं काय भरपूर हवा केली नं त्यामुळे आपण अपेक्षाही वाढवल्यात....

    ReplyDelete
  5. chhan jhalay lekh..as usual !!

    ReplyDelete
  6. ह्म्म्म, तीन वेळा झाला पाहून तोपण थिएटर लाच. :-)

    -अजय

    ReplyDelete
  7. मुग्धा, येथे पाहायला मिळेल ग. अजूनही दिसतो आहे. http://www.apalimarathi.com/Default.aspx

    ReplyDelete
  8. महेंद्र, कसा वाटला ते कळव. चित्रपट पहावा असाच आहे. आवडेल.

    ReplyDelete
  9. साधक,खरेय. अतुलचे मावशीच्या रूपातले संवाद सुस्पष्ट नाहीत. कदाचित पातळ आवाज काढायचा यावर जास्त लक्ष केंद्रीत झाले असावे. आणि नृत्याबाबत बोलायचे तर अतुल अजून चांगले करू शकला असता.निदान दोन मिनिटांचा एक ’पीस ’ टाकायला हवा होता.असो. मात्र एकंदरीत चित्रपट चांगला आहे. त्रुटी टाळता आल्या असत्या तर अजून उत्तम झाला असता.

    ReplyDelete
  10. अपर्णा, ’बाराची गाडी ’ अमृताचेच आहे.:)
    खरेयं ग, कधी कधी अती प्रसिध्दी झाली की अपेक्षा फारच वाढतात मग... तरीही मी पुन्हा एकदा पाहणार आहेच सिनेमा.:)

    ReplyDelete
  11. अजय, मलाही थियेटरमध्येच जाऊन पाहायचा आहे रे. पण नाईलाज झालाय. आता एकच आशा आहे की मी येईन मायदेशात तेव्हां कुठेतरी सुरू असेल.

    ReplyDelete
  12. एकूण एक म्हणणं पटलं. पूर्णत: अनुमोदन.. आणि मूळ कादंबरी बरीच वेगळी आहे असं मी ऐकलंय (वाचली नाहीये) .. कादंबरीत गणा यशस्वी होत नाही. शेवट दु:खद आहे. :-(

    ReplyDelete
  13. हेरंब, मीही कादंबरी वाचलेली नाही.:( मायदेशी आले की लागलीच आणेन. प्रतिक्रियेबद्दल आभार.:)

    ReplyDelete
  14. जोगवा पाहिलात का? http://ibollytv.com/imarathi.php इथे उपलब्ध आहे.

    ReplyDelete
  15. साधक, अनेक आभार. आपली मराठीवरही जोगवा आहे. परंतु प्रिंट तितकीशी छान नाही.( त्यामुळे पुन्हा पहायचा आहे.) आता तुम्ही दिलेल्या लिंकवर जाऊन पाहते.:)जोगवाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. खास करून उपेंद्रचे.

    ReplyDelete
  16. me hech blogwar taknar hote pun ata repeat karat nahi.

    apeksha far wadhlya ki ase hote mazehi tech zale. khup tutak tutak watle. Apan sadhi ekankika baghtanahi continuty ucchar yacha wichar karto....Atul kulkarniche kam thik watle...wajan chadh utar matra jabardast. suruwatila tyache bolne agdi kulkarni style ahe khedwal watat nahi. nantarche dialogus kalat nahit kadcahit changli print baghitli tar asteel.

    any ways far apeksha thevu nayet he khare.
    gani chan ahet

    ReplyDelete
  17. Mast lihilay.... ekdum 100% agree... mala ya picture madhlya khataklelya ajun kahi goshti mhanje

    1) Tamashacha fad chalu kelyavar lagolag milaleli prasidhi, sagla 2-3 divsat zalay asa vatat....madhe 1 line takli asti "After 6 months" like this tar challa asta..

    2) Guna varch Balatkar....to dakhvaychi kahi garaj nhavti asa maaz personal opinion aahe

    3) Amruta Khanvilkar cha dance, Ti distey changli, nachley pan changli...pan to nach Lavni ya prakarat yet nahi asa watat...

    Baki purna Movie mast aahe, Music tar Byesht aahe 1dum ;) Hats off to Ajay-Atul

    Me pan 2da baghitla movie Red Lounge madhe te pan :D

    ReplyDelete
  18. माधुरी,खरे आहे.गुणा किंवा अगदी इतर कोणाच्याही तोंडी एक वाक्य जरी घातले असते ना.... सहा महिने-वर्ष सरलेय, तरीही पुरेसे होते.थिएटरमध्ये कदाचित जास्त सुस्पष्ट ऐकू येत असेल.

    ReplyDelete
  19. प्रसन्ना,तर काय.... काही चुका सहजी टाळता येण्यासारख्या होत्या. असो. मात्र चित्रपट आवर्जून पहावा असाच आहे. आभार.

    ReplyDelete
  20. गोड शेवटाच्या नादात सिनेमा उरकला हे तर नक्की...
    बाकी तेव्हडा एक दोष सोडला तर सिनेमा उत्तम आहे यात वादच नाही.
    एकदम परफेक्ट समिक्षा..

    ReplyDelete
  21. आनंद, प्रतिक्रियेबद्दल आभार. सिनेमा पाहायला हवाच .:)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !