जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, February 16, 2010

माणुसकीचे आकाश.......


' माणुसकीचे आकाश ' हे ' कुसुमाग्रजांचे ' त्यांना देवाज्ञा झाल्यानंतर आलेले पहिले पुस्तक.

माननीय ति.स्व. कुसुमाग्रजांनी लिहून ठेवलेले परंतु अप्रकाशित असलेले बरेच साहित्य आहे. ते संकलित करून प्रसिद्ध करण्याचे कामही सुरू आहेच. १० मार्च, २००० साली आलेल्या ' माणुसकीचे आकाश ' मध्ये एकंदरीत सतरा लेख असून माननीय न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. प्रस्तावनेत ते म्हणतात, " हे पुस्तक आकाराने लहान आहे. पण, आकारसौंदर्यापेक्षा विचारसौंदर्य मनाला अधिक मोहिनी घालते. असे सॉक्रेटिसने बँक्वेट ( Banquet )- मध्ये म्हटले आहे. त्याचा अर्थ हे पुस्तक वाचताना समजेल अशी माझी धारणा आहे.' हे पुस्तक वाचताना ह्या वाक्याचा पदोपदी प्रत्यय येतो.

कुसुमाग्रजांच्या साहित्यातील महानतेचा आपण सगळेच कायमच अनुभव घेत आहोत आणि घेतच राहू. परंतु त्याव्यतिरिक्त ते कित्येक माणसांचे प्रेरणास्त्रोत, प्रेरणाशक्ती होते. मराठीतील श्रेष्ठ साहित्यिकाला दिला जाणारा, प्रतिष्ठित असा " जनस्थान पुरस्कार " व भारताच्या सांस्कृतिक व सामाजिक विकासात मोलाची भर घालणाऱ्या सहा क्षेत्रांतील नामवंतांना सन्मान म्हणून दिला जाणारा, " गोदावरी गौरव " पुरस्कार, जो चित्रपट-नाट्य, समाजसेवा, संगीत-नृत्य-ज्ञान-विज्ञान, क्रीडा-साहस, चित्र-शिल्पकला यासाठी देण्यात येतो, त्या मागची प्रेरणाही कुसुमाग्रजच होते. त्यांची या पुरस्कारांमागची भूमिकाही विनम्रतेची होती. ते म्हणत, " हा पुरस्कार नसून नमस्कार आहे. आपल्या क्षेत्रात स्मरणीय कामगिरी करून देशाच्या सांस्कृतिक जीवनाची उंची ज्यांनी वाढविली, अशा थोर श्रेष्ठांना केलेले हे कृतज्ञतेचे अभिवादन आहे. "

तळागाळातही वाचनसंस्कृती रुजावी-वाढावी म्हणून मागास भागातही बालवाचकांसाठी वाचनालये, फिरती वाचनालये, सामाजिक समस्यांचा वेध घेणारी चर्चासत्रे, व्याख्यानमाला, कविसंमेलने, विज्ञानविषयक व आकाशदर्शन, तसेच हुंड्यासारख्या समाजातील अनिष्ट रूढीला विरोध करणारे उपक्रम यांसारख्या सगळ्या कार्यक्रमांची रूपरेषाही ते स्वत:चा आखत. " जी मंडळी आज सावलीत आहेत, त्यांनी उन्हात तिष्ठत रहाव्या लागणाऱ्या लोकांसाठी काही केले पाहिजे. ज्यांचे पोट भरलेले आहे, त्यांनी ज्यांच्या ताटात काही नाही अशांच्यासाठी काही केलेच पाहिजे, ती आपणा सर्वांची जबाबदारी आहे. " असे ते मानीत.

पुस्तकाची सुरवातच, " ती सोनेरी मध्यरात्र " या लेखाने होते. त्यात कुसुमाग्रज म्हणतात, " नऊ ऒगस्ट १९४२ रोजीचा स्वातंत्र्याच्या ऐतिहासिक दिवसाचा उष:काल पाहण्याचे सदभाग्य, तोही मुंबईत पाहण्याचे भाग्य मला लाभले. मध्यरात्रीपासून मध्यरात्रीपर्यंत असा हा स्वातंत्र्यसंपादनाचा प्रवास होता. त्याकाळी मी धनुर्धारी मध्ये सहसंपादक म्हणून काम करीत होतो. नंतर पाच दिवसांनी एक अनोखा दिमाख मनाला जाणवत असतानाच पंधरा ऑगस्टचा सुवर्णदिन उगवला. देशातील कोट्यावधी लोक ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण सूर्य होऊनच क्षितिजाअवर अवतरला होता. मात्र स्वातंत्र्याचा प्रमुख शिल्पकार दिल्लीतील उत्सवाकडे पाठ फिरवून, म्हाताऱ्या काठीचा आधार घेऊन बंगालमधील रस्त्यांवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकाकी वाटचाल करीत होता. ही एकच अणकुचीदार सळई वारंवार घुसत होती व रक्त काढत होती. "

" माणुसकीची भिंत " मध्ये अण्वस्त्र व त्यामुळे होणारा विनाश याचे विश्लेषण करून केवळ संस्कृतीची, माणुसकीची आणि सतधर्माची ही भिंत भक्कम व अभेद्य असेल तर हा संहार पुढे कधीच होणार नाही याची दक्षता सगळ्याच देशांनी कशी घ्यायला हवी त्याची उकल करतात. सातपुड्याच्या परिसरातील " एक प्रकाशाचे बेट " मध्ये माननीय व्यंकटअण्णा रणधीर ( आडनाव धोबी ) यांच्या महान कार्याची ओळख करून देतात तर " यशवंतराव: काही आठवणी " त माननीय यशवंतरावांची एक वेगळीच छबी पाहायला मिळते. " मातीची मागणी आकाशापर्यंत पोचविणारा महामानव "यात, पूजनीय बाबा आमटे या महान माणसाची व कार्याची ओळख व दाद देतात.

" नानासाहेब आणि नटसम्राट ", " माननीय प्रबोधनकार ठाकरे ", ठसठशीत नावाची मुद्रा लखलखणारे वसंत कानेटकर-" एकाग्र तपश्चर्येचा गौरव ", " अभिजात साहित्याकडे नेणारी पायवाट " श्री. मुरलीधर सायनेकर या अंध व्यक्तीने अतिशय एकात्म निष्ठेने अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही केलेला साहित्याचा व्यासंग व निर्मिती याचे भारलेपणाने केलेले वर्णन असून " सुवर्णाच्या प्रदेशात " या मुरलीधर सायनेकरांच्या पुस्तकाची प्रस्तावनाही लिहितात.

आज गेले दोन महिने जो प्रश्न ऐरणीवर आला आहे. सगळ्यांच्या हृदयात खोलवर घाव घालतो आहे तोच प्रश्न, " थांबवा ही कत्तल! " मध्ये कुसुमाग्रजांनी अतिशय मुद्देसूद व कळकळीने मांडला आहे, त्याचा परामर्ष घेताना ते म्हणतात, " शालान्त परीक्षा झाली. निकाल लागले. साधारण दहा-बरा लाख मुलं नापास होतात. म्हणजेच त्यांचे खच्चीकरण होते. प्रतिष्ठित जीवनासाठी नालायक ठरतात. भवितव्याच्या दृष्टीनं काळोखाच्या अंतहीन दरीत लोटली जातात. आणि हे सगळे कशासाठी? शिक्षणमहर्षींच्या अथवा या शासनाच्या हे ध्यानात येत नाही का? "

या पुस्तकातील सर्वच्या सर्व लेख म्हणजे त्या प्रत्येक महान व्यक्तिमत्त्वांबद्दल तात्यासाहेबांना वाटणारे आत्यंतिक प्रेम दर्शविणारे एक एक सोनेरी पानच आहे. जरूर वाचण्यासारखे व संग्रही ठेवण्यासारखे कुसुमाग्रजांचे अंत:करण उलगडून दाखविणारे सुंदर पुस्तक. ते नेहमी म्हणत, " नदीप्रमाणेच साहित्य उगमापाशी थांबत नाही. नदीप्रमाणेच आत्मतेची शीव ओलांडून ते लोकजीवनात प्रवेश करते. हा सफल प्रवेश होणे म्हणजेच जे एकाचे आहे ते अनेकांचे होते, आत्मविष्काराचे रुपांतर सामाजिक संवादामध्ये होते. " असा सामाजिक संवादच या पुस्तकांतील लेखांमुळे साधला जातो याचाच प्रत्यय वाचताना येतो.


( पुस्तकातील व प्रस्तावनेतील काही भाग येथे नमूद केला आहे. )

6 comments:

  1. हम्म...वाचायला पाहिजे! काल सिंधूताई सपकाळ यांनी एका सभेत काढलेले उद्गार वाचले, "आपल्याकडे माणूस मेल्यावरच मोठा होतो." मनाला बोचले, पण खरे आहे ते. मात्र कुसुमाग्रजांबद्दल ते हयात असताना व त्यांच्या निधनानंतरही सर्वत्र अपार स्नेह, आदर व प्रेम आढळून येते.....

    अरुंधती

    Sing, Dance, Meditate, Celebrate!
    http://iravatik.blogspot.com/

    ReplyDelete
  2. अरुंधती, दुर्दैवाने ते खरेच आहे. पुस्तकात अनेक हृद्य आठवणी सांगितलेल्या आहेत. जरूर वाच.

    ReplyDelete
  3. छान लिहिलं आहेत. मस्तच पुस्तक आहे हे. माझं सगळ्यात आवडतं म्हणजे 'विशाखा'

    ReplyDelete
  4. चला...विश लिस्ट मध्ये अजुन एक पुस्तक वाढल. . धन्यवाद!!!!

    ReplyDelete
  5. पुस्तक सुचविल्याबद्दल धन्यवाद, मिळवतो आता...

    ReplyDelete
  6. ह्या बाबतीत माझे वाचन कमी आहे ... वाढवायला हवे .. :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !