जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, July 25, 2010

ज्याचे त्यालाच......

आमचे चाळीतले घर होते तिसऱ्या मजल्यावर, पूर्व पश्चिम. खोल्या फक्त दोनच अन रस्त्याच्या बाजूला छोटीशी गॅलरी व आतल्या बाजूला सामायिक गॅलरी. जेमतेम २५० फरशांचा काय तो तुकडा, तोही भाड्याचा. आम्हा सगळ्यांना छप्पर देणारा-सुखात ठेवणारा, फक्त आमचाच. अजून धड उजाडलेही नव्हते. लाल-केशरी मध्येच पिवळसर तर कुठे रात्रीच्या खुणा रेंगाळणारे काळसर राखाडी रंगाचे पुंजके आपापल्या परीने आसमंत नटवत होते. सूर्याच्या आगमनाची जोरदार ललकारी देणारी किरणे ढगांमधून अवखळपणे घुसत होती. पक्ष्यांची किलबिल, चोची, पंजे घासून पुसून पंख फडफडवून नवीन दिवसाची पहिली भरारी त्यांनी मारलेली. चित्रा सिनेमाच्या शेजारीच असलेल्या रामाच्या मंदिरातल्या घंटेचा नाद अर्धवट झोपेतही जाणवत होता. रोजची ही वीस पंचवीस मिनिटे म्हणजे जाग व डोळ्यात ठाण मांडून बसलेल्या निद्रेच्या आंदोळ्यांवर झुलणारी. चराचरातील उत्फुल्लता नकळत मनात घुसून ऊठ गं म्हणत असतानाच आळसटलेल्या गात्रातील अजून दहा मिनिटे झोप हवीच ची तीव्र मागणी. पांघरुणात गुरगटून पाय पोटाशी घेऊन मी स्वत:ला त्या दहा मिनिटांच्या हवाली करतेय तोच......

तुझ्या XXX XX, XXXXX....... भास वगैरे की काय हे वाटण्याच्या पलीकडचा तारस्वरातला आवाज व गटार तरी बरे अश्या हासडलेल्या कचकचीत शिव्यांची लाखोली ऐकू येऊ लागली. मी ताडकन उठून बसले. आई, कधीचीच उठलेली होती. भाजी चिरून कणीक भिजवून ती हंडा घेऊन पाणी भरायला उतरलेली. सहावी-सातवीतली मी व दोन वर्षांनी लहान भाऊ आम्हाला उचलवेल इतक्या कळश्या बादल्यातून पाणी भरत आईला मदत करायचा प्रयत्न करायचो पण बराचसा भार आईवरच पडत असे. शिव्यांचा भडिमार चालूच होता. त्याबरोबर आता, " ए चल चल, बाहेर नीघ. घरात काय लपून बसला आहेस? माझ्या पोरीला पळवून नेऊन कुठे ठेवलीस ते सांग....... " दुसऱ्या मजल्यावरील अम्माचा आवाज वाटला. दार उघडून कॉमन गॅलरीत डोकावले तो काय दारादारातून माणसे मशेरी, दातून, ब्रश घेऊन दात घासत तमाशाई झालेली. अम्मा दुसऱ्या मजल्यावरच्या सामायिक मोरीशी उभी राहून आमच्या समोरच्याच घरातील पंजाबी खानदानाचा उद्धार करीत होती. तर अम्माची दोन्ही पोरे हातात हे भले मोठ्ठे सुरे घेऊन तिसऱ्या मजल्यावर येण्यासाठी धावत होती. बिचारी धाकटी पोर त्या दोघांना अडवण्याचा निष्फळ प्रयत्न करत रडत होती. त्या सगळ्यांच्या चेहर्‍यावरून संपूर्ण रात्रभर हे प्रकरण पेटत होते आणि शेवटी आता त्याचा स्फोट झाल्याचे स्पष्ट कळत होते.

काय कोण जाणे पण आमच्या चाळीचे एक वैशिष्ट्य होते. कुठलेही भांडण, तंटा-बखेडा नेहमी भल्या पहाटे किंवा रात्री दहा वाजल्यानंतरच होई. अचानक शांततेला तडा जाऊन रणांगण तयार होई. काळोखात नक्की कोणाचा उद्धार होतोय, कोण कोणामागे धावतेय आणि कोण कोणाला मारतेय तेही सुरवातीला समजत नसे. अनेकदा तलवारी, सुरे घेऊन आमच्या घरावरून एरवी अगदी शांत दिसणारे काकालोक धावताना पाहिले की माझी पाचावर धारण बसत असे. रागाला डोळे नसतात या वाक्याचा खरा अर्थ त्यावेळी लक्षात येई. ही अशी, आतल्या आत धुमसत असलेली भांडणे दंग्यांचे स्वरूप धारण करून एक दोन जणांना जिव्हारी जखमा केल्याखेरीज कधीच शमत नसत. सरतेशेवटी पोलिस येत, धरपकड होई. दोन्ही घरातली आया-बाया पोलिसांच्या हातापाया पडत, अवो काही नाही झाले. उगाच मस्तीमस्करी करताना रागवारागवी - भांडाभांडी झाली. अशी मखलाशी करत पोरांना नवर्‍यांना वाचवायचा प्रयत्न करीत. शेजारी, हे काय रोजचेच असे म्हणत तमाशा पाहत आणि स्वत:च्या घरात असे घडले की शेजाऱ्यांचा जाहीर उद्धार करत.

ही सारी रणधुमाळी माजलेली ऐकूनही यातला शत्रुपक्ष एकदम चडीचूप होता. आणि अम्माची पोरगी व पंजाबणचा पोरगा संध्याकाळपासूनच कुठेसे पळालेले. थोडक्यात मुद्देमाल गायब होता व पंजाबी घरदार कानात बोळे घालून बसलेले. सरतेशेवटी दोन तीन दिवस हे युद्ध पेटत पेटत थकून व पोरगा-पोरगी घरी अजूनही न परतल्याने, आता त्यांचे काय झालेय? या चिंतेने घेरल्यामुळे एकदाचे थांबले. कालांतराने सगळे थंडावले. पोरगी अम्माच्या समोरून राजरोसपणे येऊ जाऊ लागली. लहान बहिणीशी मोरीच्या कट्ट्यापाशी थांबून मने मोकळी होत होती. राखी पौर्णिमेला त्याच मोरीच्या कट्ट्याशी दोघा भावांनी बहिणी कडून राखीही बांधून घेतली. रंगपंचमीला जावयाने अम्माला रंग लावून पाया पडून माफी मागितली. अम्माने तोंडाने नाही पण हाताने आशीर्वाद दिला. पुढे जणू काही घडलेच नाहीच्या थाटात दिवाळीत अम्माने चक्क जावयाला व पंजाबी खानदानाला जेवायला घातले, सूटाचे कापडही दिले. चला शेवट गोड तर सारेच गोड म्हणत सगळे शेजारी जरा निःश्वास टाकते झाले.

वर्ष संपलेले. नवीन वर्षाची सुरवातच मुळी पोर व जावयाच्या कुरबुरीने झाली. आता लग्न झालेय म्हटल्यावर थोडीफार पेल्यातली वादळे उठायचीच. असे म्हणत दोन्ही वडील धाऱ्यांनी थोडे दुर्लक्ष केले. कटकटी जास्तच होत आहेत पाहून समजावणे प्रकार सुरू झाले. एक दिवस छायागीत नुकतेच संपलेले. आम्ही जेवायला बसलेलो. पंजाबी कुटुंबाचे दार व आमचे दार समोरासमोर. मध्ये चौक. दोन घास कुठे घेतले असतील अम्माच्या पोरीची किंचाळी ऐकू आली. आई ताडकन उठली. दार उघडून ती व तिच्यापाठोपाठ आम्ही बाहेर आलो. तोवर समोरच्या घरात माळा व मेन खोली यात चाललेली पळापळ, जावयाचा टिपेचा आवाज- शिव्या व मधनच बायकोला घातलेले दणके. सासूचे मध्ये पडणे... टिपीकल फिल्मी सीन सुरू होता. फरक इतकाच हे प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडत होते.

अचानक काय झाले माहीत नाही पण घरात अर्धवट घुसलेले शेजारी, सासू, जावई सारेच घाबरून ओरडले. पाहिले तो काय, अम्माची लेक खिडकीत चढलेली. आई, अगं मंजू कुठे बसलीये पाहिलेस का? असे मी म्हणतच होते तोच मंजूने स्वत:ला खिडकीतून खाली झोकून दिले. ते कमी की काय म्हणून तिने उडी मारलेली पाहून जावईही चढला खिडकीत आणि उडी घेतो म्हणू लागला. कसे बसे त्याला खेचून खाली ओढले आणि सारे खाली पळाले. एकतर काळोख त्यात ती मागच्या गटारात पडलेली. नायलॉनच्या साडीत हवा भरल्यामुळे पहिल्या मजल्यापर्यंत पॅरॅशूटसारखी म्हणे खाली तरंगत गेले मग कांबळीच्या घराचा पत्राच मणक्यात घुसल्याने दाणकन आपटले. हे सारे रसभरित वर्णन पुढे मंजुच्याच तोंडून ऐकलेले. पुढचे वर्षभर ती हॉस्पिटलमध्ये अंथरुणाला खिळून होती. मणका, दोन्ही पाय मोडलेले. इतकी जिगरबाज व जबरी सहनशक्ती व इच्छाशक्ती असलेली ही अम्माची पोर वर्षाने स्वत:च्या पायावर चालत घरी आली.

दोन तीन वर्षे मध्ये गेली. एकदा आमच्या घरी ती आईशी बोलत असताना मी तिला विचारले, " मंजू, अगं तू तर पळून जाऊन लग्न केलेस. तुझ्या लग्नापायी किती मोठ्ठे रामायण झाले. तुझ्या किंवा राजच्या भावांचा जीव जाता जाता राहिला इतका राडा झाला. हे होणार हे तुला माहीत होतेच तरीही तू डरली नाहीस की अम्माला बधली नाहीस. मग राजशी लग्न केल्यानंतर त्याच्यापायीच तू जीव कशी गं द्यायला निघालीस? कुठे गेले तुमचे प्रेम, जिने-मरने की कस्मे, वगैरे वल्गना..... फारच विरोधाभास दिसतो यात. " मंजूने आईकडे पाहिले व माझ्याकडे पाहत वेदनेने पिळवटल्यासारखा चेहरा करून एक सुस्कारा सोडला व म्हणाली, " अम्माच्या घरात मी किती सुखी होते हे कळण्यासाठी व जिथे माझा स्वर्ग - आनंदाचा ठेवा आहे असे वाटत होते, तो नरक आहे हे कळण्याकरता प्रत्यक्ष भोगाची गरज होती ना. दुसर्‍याच्या आनंदाने आपल्याला आनंद नाही मिळाला तरी फारसे काही बिघडत नाही परंतु तुझे दु:ख मला कळतेय, वगैरे शाब्दिक सांत्वने किती खोटी असतात हे ते भोग स्वत: भोगल्याशिवाय समजत नाही. अम्माने मी असा अविचार करून दु:ख ओढवून घेऊ नये म्हणून कितीतरी प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला होताच नं. पण तेव्हा अम्माइतकी दुष्ट-मतलबी बाई कोणी नसेल असेच मला वाटे. जाऊ दे. हा भोग मीच ओढवून घेतलाय तेव्हा भोगायलाच हवा. विनातक्रार." असे म्हणून ती निघून गेली.

किती सहजपणे जीवनाचे सत्य तिने सांगितले. दु:ख - भोग वाटून घेता येत नसतात. ते ज्याचे त्यालाच शेवटापर्यंत भोगावे लागतात. मात्र बरेचदा ते निर्माण मात्र आपणच करतो. कधी समजत असून तर कधी चक्क स्वत:ला फसवून. आंधळे होऊन. मृगजळामागे लागून. भोग त्याचा शेर पुरेपूर वसूल करूनच संपतो. कधी कधी तर माणूस आधी संपतो आणि मग तो मेल्यामुळे त्याचे भोग संपतात. पुन्हा तक्रारीलाही वाव नाही. स्वनिर्मित दु;खाची अव्याहत उठणारी आवर्तने......

30 टिप्पणी(ण्या):

महेंद्र said...

एखाद्या सिनेमाची/नाटकाची स्टॊरी वाचतोय असे वाटत होते. मजा आली असेल न? मस्त जमलाय लेख.

Shubhangee said...

एक दाहक सत्य तुम्ही अतिशय परिणामकारक शब्दात मांडलय.आवडले.

श्रीराज said...

माणसांमध्ये एक गोष्टं जवळ जवळ सारखीच असते ना...लहान असताना आई-वडिलांचे सल्ले बहुतेकदा पटतच नाहीत...व्यक्ति-स्वातंत्र्यावर घाला घालणारे वाटतात...पण हीच मुलं पुढे पालक झाल्यावर तेच न पटणारे सल्ले देताना दिसतात. मला मुलं झाल्यावर मी कसा वागेन कुणास ठाऊक? :)

अनघा said...

'कधी कधी तर माणूस आधी संपतो आणि मग तो मेल्यामुळे त्याचे भोग संपतात.'

खरं आहे हे भाग्यश्री.

Bhagyashree said...

kharach!! khup mast lihilya apan!!!

Saglya goshti anbhvnyasathi aplya hatun kadhi chuka pan hotat pan nantar paschatap karun upyog nasto!

भानस said...

अगदी अगदी. सिनेमावाले विचार करत असतील दाखवताना, इतके कसे टोकाचे दाखवायचे.... म्हणून बिचारे घाबरून टाळत असतील. पण वास्तवात वाट्टेल ते घडू शकते या सत्याचे प्रचंड नमुने मी पाहिलेत.:D

कधी गंमत वाटे पण शेवट बरेचदा वाईट होत त्यामुळे खूप डिप्रेशन, उदास वाटत राही.

भानस said...

शुभांगी, अनेक धन्यवाद.

भानस said...

श्रीराज, दोन पिढीतला संघर्ष हा. भूमिका बदलली की लगेच संघर्ष घुमजाव करतो. शिवाय दरवेळी स्वत:च्या अनुभवाने दिलेले चटकेही त्या सल्ल्याची तीव्रता प्रखर करतात. बॉटम लाईन, पालकांना आपल्या मुलांनी नको ते त्रास ओढवून घेऊ नये असे वाटत असते परंतु ते त्रास स्वत: अनुभवल्याशिवाय मुलांना ते कळत नाहीत. चक्र चालूच... :D

भानस said...

अनघा, काही जीव खरेच दुर्दैवीच असतात. फक्त हाल आणि हालच... अशांना चटकन सुटकाही मिळत नाही. :(

भानस said...

भाग्यश्री, वेळ गेल्यावर पश्चाताप करूनही उपयोग नसतोच आणि अजूनही वेळ गेलेली नाही हे तेव्हां समजत नाही.

अभिप्रायाबद्दल अनेक धन्यवाद.

THE PROPHET said...

ताई,
एकदम जबरदस्त!
किती अंगावर काटा आणणारं वर्णन आणि नंतर एकदम जीवनाचं सत्य..
भारीच!

गणेश said...

Tai namsakar....
kahra aahe..dukh he aplya karmachech fal aaha.....ani he jyache tyalach bhogave lagte...vastav varnan agdi jaljalit vatle....

हेरंब said...

भयंकर वर्णन.. शेवटच्या ओळीत तिने हे दाहक सत्य एवढ्या सहजतेने स्वीकारलंय हे बघून तर अजूनच काटा आला !!

prajkta said...

खूप-खूप सुंदर झाले आहे. लिखाणामुळे प्रत्यक्ष प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. काही अनुभव घेतल्याशिवाय त्याची दाहकता समजत नाही हेच खरे. ही सारी दाहकता तुमच्या लिखाणातून समोर येते. मस्त लिहिले आहे. अगदी टची झालं आहे. अनुभव अगदी जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहिल असा लिहिला आहात.

भानस said...

विद्याधर, काही प्रसंग विसरलेच जात नाहीत.

भानस said...

गणेश, वास्तव कल्पनेपेक्षा भयंकरच असते. तरी लिहीताना काही गोष्टी वगळल्याच. ज्याचे त्यालाच... हेच उरते शेवटी.:(

भानस said...

हेरंब, काय करेल रे न स्विकारून. कितीही मनाने घेतले निघून जावे तरी तेही जमणे अशक्य आहे म्हटल्यावर, ’आलीया भोगासी असावे सादर ’.

भानस said...

प्राजक्त, धन्यवाद. स्मरणात इतके पक्के राहून गेलेत काही प्रसंग आणि त्यामागची कारणे व ती ती माणसे. जीवनात आजही फारसा फरक न पडलेली...

मनमौजी said...

श्री ताई...किती कटु वास्तव आहे ना...लिखाणातुनच याची दाहकता जाणवते आहे.

भानस said...

अत्यंत कटू वास्तव. :(
धन्यवाद योगेश.

प्रसाद साळुंखे said...

भाग्यश्री मॅम
मस्त लिहिलय,
खूप वर्षांनी चाळीतल्या भांडणातली उत्सुकता, गांभीर्य, कानागोळा आणि विचार ..विचार ... विचार ....
असा प्रवास करवल्याबद्दल धन्यवाद

भानस said...

असंख्य माणसे व त्यांची भिन्न विचारसरणी - वागणे. कधी अतिरेकी माया तर कुठे टोकाचा द्वेष. घरादाराबरोबर मनाचीही कवाडे उघडी... तर कुठे घागर पालथीच... प्रसाद, आभारी आहे.

THE PROPHET said...

ताई,
मी थोडासा आगाऊपणा करून तुला खो दिलाय...
संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी
http://samvedg.blogspot.com/2010/07/blog-post.html
आणि माझी आजची पोस्ट
http://thebabaprophet.blogspot.com/2010/07/blog-post_28.html

भानस said...

विद्या, हा नवीन खो खो सुरू झालाय का? आगाउपणा कसला आलाय त्यात? धन्यू रे. आता तुझी पोस्ट वाचते म्हणजे मला कळेल तरी... :D

अपर्णा said...

स्वनिर्मित दु;खाची अव्याहत उठणारी आवर्तने......:) Prasad +1

प्रभावित said...

khare aahe. secrets of life. Baghavi tevhach disatil.

भानस said...

धन्स अपर्णा. :)

भानस said...

सीमा, खूप दिवसांनी आलीस ब्लॉगवर. छान वाटले. धन्यवाद.

सौरभ said...

पुढच्यास ठेच मागचा शहाणा. पण कदाचित हे शहाणपण सर्वांकडे असेलच असं नाही. मग "ज्याचे त्यालाच..." हा प्रकार होणं स्वाभाविकच आहे.

भानस said...

सौरभ, हो ना. मात्र अगदी समोर भला मोठ्ठा खड्डा दिसत असूनही उडी मारायची म्हणजे... :(

कदाचित दुसर्‍याचा मोडलेला पाय वेदनेचा अनुभव देऊ शकत नाही म्हणून... :D